Tuesday 6 November 2018

चैतन्यमय दिवाळी

चैतन्यमय दिवाळी



दिवाळीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. आणि त्याप्रमाणे ती दिवाळी साजरी करायची पद्धत बदलते. शाळेत असताना दिवाळीला 21 दिवसांची मोठी सुट्टी असायची. सहामाही परीक्षा संपवून एकदम मोकळ्या वातावरणात दिवाळी साजरी व्हायची. लहान असताना फटाक्यांची विशेष आवड होती. पण जसे जसे मोठे होत गेलो तसे काही आवडी निवडी बदलल्या. फटाक्यांची आवड हळूहळू कमी झाली. पण एक आवड मात्र तशीच आहे आणि पुढेही तशीच राहील, ती म्हणजे फराळ चोपून खायची. लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी यांची आवड वयासोबत वाढत गेली. पण जसं जसं इतर लोकांमध्ये मिसळत गेलो तेव्हा हेही कळलं की सगळ्यांची दिवाळी आपल्यासारखी नसते. आपण फराळ करतो, फराळ खातो पण आपल्यासारखी अनेक मुलं-मुली आहेत ज्यांना फराळ माहीतही नसतो. अनेकांच्या घरी फराळ बनतही नाही. म्हणून चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आम्ही या मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद निर्माण करायचा एक छोटा प्रयत्न केला. हा प्रयत्न करताना त्या मुलांना दिवाळीचा फराळ काय असतो आणि त्याचा एक वेगळा आनंद असतो याची एक जाणीव करून देण्याचा उद्देश आमच्यासमोर होता.

म्हणून आम्ही काही शाळांची निवड केली. वाडा तालुक्यातील एक आणि विक्रमगड मधील चार, अश्या एकूण पाच शाळांमध्ये आम्ही फराळ वाटायचे ठरवले. मग तयारी सुरु झाली. फराळ कुठे ठेवायचा इथपासून ते कोणत्या शाळेत किती वाजता जायचं इथपर्यंत सर्व प्लँनिंग सुरु झालं. फराळाची ऑर्डरसुद्धा आम्ही अश्या एका कुटुंबाला दिली की ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण दिवाळी सोबतच थंडीसुद्धा येते आणि या थंडीत त्या मुलांच्या अंगावर नीट चादर असली पाहिजे म्हणून आम्ही फराळासोबत ब्लँकेट द्यायचे ठरवलं. यासाठी वाडा येथील मालबीडी हे गाव आम्ही निवडलं आणि सोबतच विक्रमगड मधून 4 शाळांची निवड केली. हे सर्व आम्ही गावांत जाऊन सुद्धा वाटू शकत होतो पण आम्ही शाळांचीच निवड का केली याचं कारण म्हणजे या विभागात लोकांमध्ये शिक्षणाबद्दल असलेली उदासीनता. त्यामुळे मुलं शाळेत जात नाहीत. पण शाळेत कोणी खाऊ वाटणार आहेत किंवा काही वस्तू देणार या अपेक्षेने मुलं येतात. गेल्या काही उपक्रमांमधून आम्ही आणि शिक्षकांनी शाळेची पटसंख्या कमी न झाल्याचे अनुभवले आहे. शालेय साहित्य, फूटवेअर, वह्या इत्यादी वाटप केल्यामुळे मुलांचा शाळेकडे ओढा वाढला. काहीतरी खाऊ मिळतो या आशेने का होईना मुलं शाळेत यायला लागली. यासाठीच आम्ही शाळांची निवड केली. दिवाळीचा फराळ वाटायच्या आधी आम्ही काही जण राहुलच्या घरी जमलो, फराळ नीट पिशव्यांमध्ये भरला आणि मग दुसऱ्या दिवशी बसने प्रत्येक शाळेत जाऊन त्यांना फराळ आणि ब्लँकेट दिले. 
ZP School Vikramgad
या 5 शाळांमध्ये एक अनुभव समान होता. तो म्हणजे या विभागातील खूप कमी मुलांना फराळ काय असतो हे माहीत होतं. या विभागात गेल्या काही भेटींच्या अनुभवातून असे लक्षात आले होते की या मुलांना प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. तसेच आपण जसे सण साजरे करतो तसे हे करत नाहीत. म्हणूनच चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे यावर्षी या सर्व मुलांना फराळ वाटून ही दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. पण या फराळासोबत आम्ही प्रत्येकाला एक ब्लॅंकेट दिलं. मुळात नेहमी घालायलाही नीट कपडे या मुलांकडे नव्हते, त्यामुळे दिवाळी सोबत येणाऱ्या थंडीपासून यांचं संरक्षण व्हावं म्हणून हे ब्लॅंकेट वाटण्यात आले. आम्ही शाळेत फराळ वाटतोय हे बघून आजूबाजूच्या घरातील अनेक मुलं तिथे फराळ घ्यायला आली. काहीतरी नवीन खाऊ आपल्याला मिळणार याची एक अशा त्यांच्या डोळ्यात होती. खाऊच्या आशेने काय होईना कदाचित हीच मुलं उद्या शाळेत शिकायला पण येतील. पण या सर्वात एक विचार मनाला चटका लावून जातो तो म्हणजे मुंबई, ठाण्यासारख्या "developed" शहरांपासून 2-3 तासाच्या अंतरावर असणाऱ्या गावांत ही अवस्था असेल तर इतर आदिवासी भागांचा विचार करणे कठीण आहे.

या लेखाला मी "चैतन्यमय दिवाळी" असं नाव देण्याचं एकच कारण आहे. लहान असताना कंदील बनवणे आणि इतर मजा घेत आपण दिवाळी साजरी करायचो पण ती दिवाळी फक्त आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदापुरती मर्यादित होती. आज चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या सर्व परिवाराने एकत्र येऊन स्वतःच्या आनंदात या आदिवासी विभागातील मुलांना सामील करून घेतले याचा आनंद खूप आहे. आज हा उपक्रम पूर्ण करून घरी जाताना आमच्यापैकी प्रत्येकजण एक वेगळी दिवाळी साजरी केल्याचा अनुभव घरी घेऊन जाईल. चैतन्यचे सर्व सभासद आणि आमचे दाते यांच्या मदतीने त्या मुलांच्या आयुष्यातील ही दिवाळी चैतन्यमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. म्हणूनच ही दिवाळी आमच्यासाठी विशेष आहे.

धन्यवाद
प्रथमेश श. तेंडुलकर (9869371580)
चैतन्य सोशल वेल्फेअर फॉउंडेशन

Monday 25 June 2018

Trek to Lohagad -- लोहगड - माझ्या नजरेतून

महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या गर्द हिरव्या वनराईत २ किल्ले मराठ्यांची शौर्यगाथा सांगत उभे आहेत. एक म्हणजे किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगड. हे दोन किल्ले म्हणजे २ मित्रच. या दोन किल्ल्यांच्या मधून एक अरुंद खिंड जाते, ती म्हणजे शेलार खिंड. त्यातल्याच एका किल्ल्याला भेट द्यायचा योग आला. तो म्हणजे किल्ले लोहगड.

मुंबई पासून साधारण १२० किलोमीटर वर लोणावळ्याच्या निसर्ग सौंदर्यात वसलेला हा किल्ला. इथे येण्यासाठी जर तुम्ही ट्रेन ने येत असाल तर माळवली स्टेशन पासून येता येते. आम्ही आमच्या गाडीने येथे आलो. किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ आहे. त्याला लोहगड वाडी असे नाव आहे. सहसा किल्ल्याची पेठ ही किल्ल्याच्या मध्यावर किंवा माथ्यावर असते, पण लोहगडवाडी पायथ्याशी आहे. पावसाळा आणि त्यात रविवार म्हणजे असंख्य पर्यटक लोहगडाला भेट द्यायला आले होते.

पायथ्यापासून आम्ही किल्ला चढायला सुरवात केली. जोराचा वारा आणि बारीक पाऊस असं एकंदरीत वातावरण होतं. किल्ल्यावर चढताना काही गोष्टी कायम लक्षात राहतात. सर्वप्रथम मला जाणवल्या त्या किल्ल्याच्या पायऱ्या.
किल्ल्याच्या पायऱ्या रुंद होत्या पण तितक्याच उंच होत्या. प्रत्येक पायरी चढताना जरा जास्तीची मेहनत घ्यावी लागत होती. अश्या पायऱ्या (चढायला कठीण) असण्याचं काय कारण असावं याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शत्रूसैन्याला गडावर हल्ला करताना गड चढणे कठीण जावे हाच यामागचा हेतू असावा. पायऱ्या असून सुद्धा त्या उंच पायऱ्या आणि उभी चढण आपल्याला दमवते. हजारो वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला नक्की कोणी बांधला याबद्दल अजून ठाम सांगता येत नाही. येथे राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य, यादव अश्या राजवटी होत्या. तिथून पुढे जाताना अजून एक वैशिष्ट्य लक्षात येते ते म्हणजे किल्ल्याचे दरवाजे. किल्ल्याची मजबुती ही त्याच्या दरवाज्यांवरून लक्षात येते. ५-६ फूट रुंद आणि १४-१५ फूट उंच असे अवाढव्य दरवाजे बघताना किल्ल्याचा भव्यपणा जाणवतो. सर्वात पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे "गणेश दरवाजा". दरवाजाच्या इथे गणपती बाप्पाची एक सुंदर छोटी मूर्ती आहे. म्हणूनच त्या दरवाज्याला गणेश दरवाजा असे नाव पडले असावे. गणेश दरवाज्यातून वर आल्यावर एक प्राचीन शिलालेख आढळतो. यात किल्लेदाराचे नाव कोरलेले आहे. त्यांचं नाव हे धोंडोपंत नित्सुरे, हे नाना फडणवीसांचे कारभारी होते. १४४९ मध्ये यादवांनंतर मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली आणि तेव्हा लोहगडावर यावनी सत्ता आली. अहमद नगरचा दुसरा बुऱ्हाणशहा इथे कैदेत होता. १६४८ मध्ये लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि मराठ्यांचा भगवा गडावर फडकला. नंतर पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांना देण्यात आला. १६७० मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात घेतला. या किल्ल्याचं आणखी एक ऐतिहासिक महत्व म्हणजे शिवरायांनी औरंगजेबाचं नाक ठेचून सुरत लुटून जी संपत्ती होती ती लोहगडावर ठेवली होती. लोह म्हणजे लोखंड, आणि लोखंडासारखा मजबूत असा हा लोहगड.

गणेश दरवाजातून पुढे मजल दरमजल करत आम्ही आलो. महादरवाजा, नारायण दरवाजा असे पार करत करत शेवटचा दरवाजा म्हणजे "हनुमान दरवाजा". दरवाज्याच्या डाव्या बाजूला द्रोणागिरी पेललेल्या हनुमानाची मूर्ती आहे. हनुमान दरवाजा हा सर्वात जुना दरवाजा. बाकी दरवाजे हे पेशव्यांच्या काळात नाना फडणवीसांनी बांधल्याचे कळते. दरावाज्यातून पुढे येताना एक शिवमंदिर दिसते. गडावर ४५ पाण्याच्या टाक्या आहेत. सर्व बघता आल्या नाहीत पण एक सर्वात मोठी टाकी दिसली. ती टाकी पेशव्यांच्या काळात फडणवीसांनी बांधली असल्याचा शिलालेख त्यावर आहे. गडाच्या माथ्यावर आल्यावर म्हणजे साधारण २५००-३००० फुटांवर ढग अगदी जवळ होते. "ढगांवर स्वार होणे " या म्हणीचा प्रत्यय अशावेळी येतो.

आम्हाला विंचूकाटा बघायचा होता पण ढगांची गर्दी, सोसाट्याचा वारा आणि पडणारा पाऊस हे दृश्य विलोभनीय होतं. विसापूर किल्ल्याच्या माथ्यावर ढगांची गर्दी बघता किल्ल्याला ढगांचा शिरपेच घातला असं वाटत होतं. पेशव्यांकडून जेव्हा लोहगड ब्रिटिशांनी जिंकला तेव्हा सर्वात आधी त्यांनी विसापूर जिंकला आणि विसापूर वरून लोहगडावर तोफा डागल्या. त्यामुळे लोहगड ब्रिटिशांना जिंकता आला.

असा हा दणकट किल्ला, ज्याने वर येताना सर्वाना खूप दमवलं पण वर आल्यावर निसर्गाचं देखणं रूप कदाचित मस्तानीच्या देखणेपणापेक्षा सुंदर असावं असं होतं. हा प्रवास माझ्या आणि आमच्या ग्रूपमधील सहकार्याच्या नेहमी लक्षात राहील.

प्रथमेश तेंडुलकर
९८६९३७१५८०



फोटो :- लोहगडावरून नजर ठेवण्याची जागा. खालून येणाऱ्या शत्रूला थोपवता यावं म्हणून वापरण्यात येत असे. 


फोटो :- लोहगडावरील दिशादर्शक फलक
 फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र


 फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र

फोटो :- चैतन्य ग्रूप

Tuesday 5 June 2018

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

आज ५ जून, जागतिक पर्यावरणदिन. सहसा असे दिवस फक्त एका दिवसापुरतेच साजरे केले जातात. पर्यावरणदिनाच्या दिवशी अनेक जण फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण कार्यक्रम करतात पण त्याच्यापुढे काय? लावलेल्या झाडांची योग्य काळजी घेतली जाते का? लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगतात हा कदाचित संशोधनाचा मुद्दा असेल. आज यावर लेख लिहिण्याचं कारण इतकंच की चैतन्य मित्रमंडळाच्या माध्यमातून गेले २ वर्ष आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने जे काम करतोय ते ठळकपणे आज दिसू लागलंय आणि तेच सर्वांसमोर यावं हाच या लेखामागचा उद्देश.

चैतन्य ग्रूपतर्फे सामाजिक उपक्रम राबवताना पर्यावरणपूरक कोणते उपक्रम राबवता येतील यावर एक विचार झाला. वात्सल्य सोबत काम करताना सराफ काकांनी एक कल्पना सुचवली. बदलापूर येथे एक प्रस्तावित वृद्धाश्रमाची जागा होती. त्या जागेवर त्यांना वृक्ष लागवड करून त्यामध्ये वृद्धाश्रम बांधून त्या आजी-आजोबांचे शेवटचे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात जावे ही कल्पना होती. मग त्या जागेवर वर्ष २०१६ मध्ये साधारण ६० झाडांचे रोपण तिथे करण्यात आले. चैतन्य सोबत अजून २ ग्रूप आमच्या सोबत होते. पण ६० झाडांचे रोपण करताना त्यांची योग्य काळजी घेणं आणि त्यांना वाढवणं ही आमची जबाबदारी होती. चैतन्य ग्रूपने ही जबाबदारी गेली २ वर्ष निस्वार्थीपणे सांभाळली आहे. मध्यंतरीच्या काळात पाण्याच्या अभावाने २-३ रोपे मरण पावली पण इतर सर्व झाडे अत्यंत जोमाने वाढली. झाडांच्या वाढीसाठी लागणारे खत व इतर गोष्टी वेळेवर पुरवल्या गेल्या आणि २०१८ मध्ये वाढलेली झाडे बघता केलेल्या कामाचे, कष्टाचे चीज झाले. काही झाडांना तर छोटी छोटी फळं सुद्धा लागली होती. मध्यंतरी सराफ काकांनी तिथे एक आरोग्यसुविधा सुरु केली होती आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला बोलावले होते. तेव्हा सर्वांना आवर्जून ते त्या झाडांबद्दल सांगत होते. आम्ही ती झाडे कशी लावली, कोणत्या अडचणी आल्या, झाडांची काळजी कशी घेतली याच्याबद्दल बोलताना चैतन्यचं आणि माझं कौतुक करणाऱ्या सराफकाकांना ऐकलं की आमच्या कामाला अजून कोणाच्या पावतीची गरज वाटत नाही.

२०१७ मध्ये चैतन्य ग्रूपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात काही झाडांचे रोपण करण्यात आले. त्यावेळी तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे, झाडांचे महत्व समजावून सांगण्यात आले, झाडांची काळजी कशी घ्यायची याची माहिती देण्यात आली. ठराविक विद्यार्थयांमागे एक झाड या प्रमाणात झाडांचे रोपं करून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्या मुलांवर सोपवण्यात आली. यातून २ गोष्टी आम्ही साध्य केल्या. एक म्हणजे वृक्षारोपण केले आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या पिढीला वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. आमच्यासोबतच आमचे हे बालमित्र पुढील काळात पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक राहतील याची काळजी आम्ही घेतली.

५ जूनला एक दिवस पर्यावरण दिवस एका दिवसापुरता साजरा न करता वर्षातले ३६५ दिवस पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे.

प्रथमेश श. तेंडुलकर
चैतन्य मित्रमंडळ
(९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)

** वृक्षारोपण करताना आणि २ वर्षांनंतर झालेली झाडांची वाढ याचे फोटो देत आहे.







Saturday 31 March 2018

प्रोजेक्ट :- अभ्यासिका

प्रोजेक्ट :- अभ्यासिका
अभ्यासिका आणि वर्गखोल्यांचे नूतनीकरण

चैतन्य मित्रमंडळातर्फे आम्ही जमेल तशी मदत आदिवासी पाड्यांमध्ये करत असतो. अशाच एका आदिवासी पाड्यातील शाळेला भेट देण्याचा योग २०१७ मध्ये आला. श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय, रावतेपाडा या शाळेत सर्व शिक्षक विनावेतन गेले १२ वर्ष आजूबाजूच्या गरीब मुलांना शिकवत आहेत. शाळेत मुलं ४-५ किलोमीटर लांबून पायी प्रवास करत येतात. या शाळेत भेट दिल्यावर आम्हाला अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. आम्ही सर्व ज्या शाळेत शिकलो (कोणी मराठी माध्यमात तर कोणी इंग्रजी, वैयक्तिक मी मराठी माध्यमात शिकलो) तर शाळा म्हणजे वेगवेगळ्या वर्गखोल्या, बसायला बेंचेस, लाईट-पंखा याची सोय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष इ. सोयी सुविधा असलेली, अभ्यासाला पोषक वातावरण असलेली शाळा आम्हाला अपेक्षित होती. पण या शाळेत आम्ही भेट दिल्यावर अनेक सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवला. वर्गांमध्ये बसायला बेंचेस कमी होते, पंखा-लाईट नव्हती, फ्लोरिंग खराब झाली होती असे अनेक प्रॉब्लेम होते.

म्हणून चैतन्य ग्रुपतर्फे शाळेतील वर्गखोल्या आणि अभ्यासिकेच्या नूतनीकरणाचे काम आम्ही हाती घेतले. साधारण एका महिन्याच्या कालावधीत आम्ही शाळेतील एक अभ्यासिका आणि ३ वर्गखोल्यांचे पुनरुज्जीवन केले. अभ्यासिकेत मुलांना वाचण्यासाठी ५० मराठी पुस्तके देण्यात आली. वर्गखोल्यांच्या फ्लोरिंग, कलरिंग सोबतच वर्गांमध्ये पंखे उपलब्ध करून दिले. सोबतच सर्वात महत्वाचं, शाळेत इ-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. खालील चित्रांमध्ये आपण ते पाहू शकता.



शाळा जरी आदिवासी विभागातील असली तरी तिथल्या मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. उनातून, पावसातून वाट काढत ४-५ किमी पायी प्रवास करून शाळेत येऊन शिकण्यासाठी जिद्द लागते, ती जिद्द त्या मुलांमध्ये आहे. आणि म्हणूनच चैतन्य ग्रुपतर्फे ज्या सोयीसुविधा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला त्यातून नक्कीच मुलांच्या शिक्षणासाठी आणि एकूणच सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. हा उपक्रम सफल व्हावा म्हणून चैतन्य ग्रुपला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे शतशः आभार.

प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)
चैतन्य मित्रमंडळ

*आपल्यापैकी कोणालाही आमच्यासोबत पुढील उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर ९८६९३७१५८० या क्रमांकावर संपर्क करावा. Whatsapp मेसेज केला तरी चालेल.
** अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या ( https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=bookmarks )

Monday 19 March 2018

मदतीचा हात..

प्रोजेक्ट :- आरोग्यम धनसंपदा

पौष्टीक खाऊ उपक्रम

चैतन्य ग्रूपतर्फे आम्ही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये मदत करतो. त्यातीलच एक पाडा म्हणजे रावतेपाडा. २०१७ मध्ये चैतन्य ग्रूप तर्फे पालघर जिल्ह्यातील या पाड्यामध्ये एक मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. आरोग्यसेवेबद्दल या लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करणे हा या शिबिरामागचा हेतू होता.
पण या शिबिरात अजून काही समस्या आम्हाला समजल्या. जसं की अनेक मुलं-मुली ४-५ किलोमीटर लांबचा प्रवास करून शाळेत येतात. गरिबी असल्यामुळे योग्य सकस आहार त्यांना मिळत नसल्याने कुपोषण संबंधी आजार आम्हाला त्या शिबिरात दिसून आले. यातून अशक्तपणा, अशक्तपणामुळे चक्कर येणे असे प्रकार होत होते. आणि या काही कारणांमुळे शाळेत यायचे प्रमाण कमी झाले होते. आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे आम्ही या विषयावर काम करायचे ठरवले.

आमच्या ग्रूपमधील डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही शाळेतील सर्व १९५ विद्यार्थ्यांसाठी पौष्टीक सत्व असलेला खाऊ देण्याचा आठवडी तक्ता बनवला. सोमवार ते शनिवार प्रत्येक मुलाला-मुलीला एकएक खाऊ देण्याचे आम्ही ठरवले. समाजातील अनेक व्यक्तींनी या कल्पनेला साथ दिली. आणि १४ नोव्हेंबर २०१७ रोजी बालदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरवात झाली. प्रत्येक दिवशी मुलांना काही ना काही खाऊ देण्यात आला. गूळ-चणे, गूळ-शेंगदाणे, केळी, खजूर, उकडलेली अंडी यासोबतच पारले-जी चे बिस्कीट इ. खाऊ देण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमात श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य आम्हाला लाभले. स्वतःच काम सांभाळून त्यांनी आम्हाला या उपक्रमात मदत केली.
 
त्यानंतर १ जानेवारी २०८ पासून आम्ही शाळेच्या सहकार्याने या सर्व विद्यार्थ्यांना खाऊसोबतच आठवड्यातून एक दिवस खिचडी देण्याचा उपक्रम सुरु केला. नोव्हेंबर २०१७ पासून सुरु झालेला हा उपक्रम ४ महिन्याच्या अविरत कार्यानंतर आता एक टप्पा पूर्ण करून या उपक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमातून नक्की काय साध्य झाले? नक्की कोणता फरक पडला? या सर्वाची चिकीत्सा करणारा हा लेख लिहून आम्ही आमचे कार्य तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.


उपक्रम सुरु करताना आम्ही १९५ विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची मोजली होती. सोबतच त्यांची आरोग्य तपासणी केली होती.

४ महिन्याच्या या उपक्रमानंतर आम्ही पुन्हा वजन मोजले असता आणि आरोग्य तपासणी केली असता आम्हाला जे आढळले ते पुढील प्रमाणे :-

१) विद्यार्थ्यांचे सरासरी वजन २.५ किलो ने वाढले.
२) अशक्तपणाशी निगडित आजार, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे इ. कमी झाले होते.

डॉक्टरांशी बोलल्यानंतर हे वरील निष्कर्ष आमच्या समोर आले. त्याव्यतिरिक्त अनेक शिक्षकांशी बोलल्या नंतर अजून काही गोष्टी आम्हाला समजल्या.

१) ४-५ किलोमीटर उपाशीपोटी पायी प्रवास केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चक्कर यायची. खाऊ आणि खिचडी यामुळे ते प्रमाण बंद झाले.
२) अशक्तपणामुळे अभ्यासात लक्ष न लागणे इ. प्रकार कमी झाले.
३) अनेक विद्यार्थी जे शाळेला दांडी मारायचे, असे विद्यार्थी शाळेत नियमित येऊ लागले. त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी होती ती वाढायला मदत झाली.

वरील सर्व निष्कर्ष पाहिल्यावर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की एक गोष्ट पूर्ण केली असता किती फरक दैनंदिन आयुष्यात पडतो. प्रोजेक्ट आरोग्यम धनसंपदा पूर्ण करणे हा चैतन्य ग्रूपसाठी एक आव्हान होते. तुलनेने मोठा प्रोजेक्ट यशस्वीरीत्या हाताळताना मला अनेक लोकांची मदत झाली स्नेहा, वृषाली, गणेश इ. आमचे चैतन्यचे टीममेम्बर्स आणि त्यासोबतच शशिधर भट, मंगेश तेंडुलकर, अमुल्या तेंडुलकर इ. समाजातील अनेक व्यक्तींची झालेली मदत, तसेच श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय आणि सर्व शिक्षक यांचे सहकार्य, यामुळेच हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला.

ज्यांची ज्यांची या उपक्रमाला मदत झाली त्या सर्वांचे आभार. चैतन्यतर्फे असेच उपक्रम भविष्यात होत राहोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना. त्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची, सहकार्याची आणि आशीर्वादाची गरज आहे. आपल्यापैकी कोणाला आमच्या ग्रूपसोबत या व इतर कामात सहभागी व्हायचं असेल तर ९८६९३७१५८० या क्रमांकावर संपर्क (WhatApp केलं तरी चालेल) करा. तसेच आमच्या फेसबूक पेज ला भेट देऊ शकता.

धन्यवाद. 

प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)
चैतन्य मित्रमंडळ

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/

Sunday 14 January 2018

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग २

पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे,  इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.

विश्वासराव पेशवे, महादजी शिंदे


विश्वासराव आणि महादजी हे दोघेही पानिपतावर होते. अब्दालीच्या प्रचंड सैन्यासमोर मराठे उभे होते. त्यात भाऊसाहेब, इब्राहीमखान गारदी यांच्या सोबत अजून रणधुरंधर होते, विश्वासराव पेशवे आणि महादजी शिंदे. विश्वासराव हे अत्यंत तरुण होते म्हणजे अगदी १७-१८ वर्षाचे होते. विश्ववासराव हे दिसायला अत्यंत देखणे होते. त्यांच्या देखणेपणाबद्दल आजही बोललं जातं की "स्त्रियांमध्ये देखणी मस्तानी आणि पुरुषात देखणे विश्वासराव." यावरुन आपण अंदाज बांधू शकतो कि विश्वासराव दिसायला किती सुंदर असतील. पानिपतच्या युद्धात विश्वासरावांनी शौर्य गाजवलं पण त्यात ते धारातीर्थी पडले. विश्वासरावांचा देह जेव्हा अफगाणी सैनिकांनी पाहिला तेव्हा ते इतका तरुण, सुंदर देह मृत्यू पावलेला पाहून हळहळले. त्यांनी अब्दालीला सांगितलं, "आपण हा देह घेऊन अफगाणिस्तानला जाऊया. आणि या शरीरात पेंढा भरून त्याच जतन करूया." विश्वासरावांचा, त्यांच्या सौंदर्याचा मोह अफगाणांनासुद्धा आवरला नाही. महादजी शिंदे हे सुद्धा पानिपतच्या लढाईत होते पण ते जिवंत परत आले. त्यांच्या पायाला तलवार लागल्याने थोडी इजा झाली होती पण महादजी शिंद्यांच नाव एवढ्यासाठीच इथे घ्यावं की पानिपताच्या युद्धानंतर जवळपास १५-२० वर्ष महादाजीबाबांनी दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हे ठरवलं. महाराष्ट्र पानिपत युद्धानंतर खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरला.


इब्राहीमखान गारदी


पानिपतच्या युद्धाला काही लोक धार्मिक रंग देतात जसे पानिपतचे युद्ध हे हिंदू विरुद्ध मुस्लिम असे होते पण मुळात ते युद्ध परकीय आक्रमक विरुद्ध भारतीय असे होते. हिंदू विरुद्ध मुस्लिम युद्ध असतं तर इब्राहीमखान भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढला असता का? पानिपत युद्धाच्या पराक्रमी वीरांची सुरवात जर भाऊसाहेब पेशव्यांपासून सुरु होत असेल तर इब्राहीमखानाचे नाव घेतले नाही तर यादी अपूर्णच राहील. इब्राहीमखान हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तो आधी फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा. कुकडी नदीच्या युद्धात नानासाहेब पेशवे आणि भाऊसाहेब यांनी इब्राहीमखानाचा पराक्रम स्वतः बघितला म्हणून त्याला या युद्धात आपल्यासोबत घेतले होते. इब्राहीमखानाचा तोफांचा मारा इतका जबरदस्त होता की पानिपतचे युद्ध सुरु झाले आणि पुढल्या तास-दोन तासातच अब्दालीच्या सैन्याला खिंडारं पडली. विजयश्रीची माळ मराठयांच्या गळ्यात पडणार असं वाटत होतं पण मराठे त्यावेळी मान थोडी उंचावायला कमी पडले आणि माळ तुटली.


इब्राहीमखानाला अब्दालीने युद्धाच्या आधीच तू आमच्या पक्षात ये (पक्षांतर कर) असा सल्ला दिला होता पण त्याने तो साफ धुडकावून लावला. इतकंच नाही तर इब्राहीमखानाला कैद करून अब्दालीसमोर पेश करण्यात आले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. पण त्यावर फार सुंदर उत्तर इब्राहीखानाने अब्दालीला दिले. तो म्हणाला "आलंपना, भाऊसाहेब, आमचे धनी, यांनी पानिपतावर निघण्यापूर्वी मला वचन दिलेले की मी तुझासोबत मातीत पाय रोवून युद्धात उभा राहीन. माझे धनी वचनाला जागले, इतकंच नाही तर त्यासाठी धारातीर्थी पडले. आणि त्यांच्या पश्चात मी त्यांच्याशी प्रतारणा करू? नाही जमणार." इब्राहीमखानाचे हे बाणेदार उत्तर ऐकून अब्दालीने त्याला सोडून दिले. इब्राहीमखान परत जात असतानाच अब्दालीने त्याला थांबवले आणि विचारले, "इब्राहीम, तुम्हारे सारे सैनिक, सरदार मारे गाये. अब वापस जाकर क्या करोगे?" इब्राहीमखान म्हणाला, "कुछ नही हुजूर, परत जाईन, पुन्हा सैन्य गोळा करेन आणि अल्लातालाने मदत केलीच तर माझ्या धन्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानावर हल्ला करेन, तुमच्यावर हल्ला करेन. आणि बदला घेईन." इब्राहीमखानाचे हे उत्तर ऐकून अब्दाली प्रचंड चिडला आणि त्याने इब्राहीमखानाला कैद करून त्याची खांडोळी करण्याचा हुकूम दिला. त्यानंतर इब्राहीमखानाच्या शरीराचे बारीकबारीक तुकडे करून गिधाडांना घालण्यात आले.


पानिपतमध्ये मराठे जरी हरले तरी २२-२३ वर्षाच्या दत्ताजीचे बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर जितके बाणेदार आहे, ज्यात शौर्य अमाप भरलेलं आहे तसंच इब्राहीमखानाच्या या उत्तरात त्याची भाऊंप्रती, मराठा साम्राज्याप्रती असलेली निष्ठा दिसून येते. अशी निष्ठा, शेवटपर्यंत साथ देणारी माणसं लाभणं ही मराठा साम्राज्याची, भाऊंची पुण्याई होती. यांची चरित्रे आपल्याला सदैव प्रेरणा देतील हे निश्चित.

Saturday 13 January 2018

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १



पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, शमशेर बहाद्दर, इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.

दत्ताजी शिंदे

१० जानेवारी १७६०, यमुनाकाठी मराठयांची छावणी लागली होती. मराठी सैन्य दैनंदिन काम करत असतानाच गिलच्यांनी मराठयांवर हल्ला चढवला. तोफा, बंदुका यांचा प्रचंड मारा होत होता. त्या मानाने मराठी सैन्याकडे शस्त्रे आधुनिक नव्हती. मराठी सैन्याच प्रमुख शस्त्र म्हणजे तलवारी, भाले आणि बंदुका पण त्या खूप कमी सैनिकांकडे होत्या. अचानक आलेल्या शत्रूला मराठे कडवा प्रतिकार करत होते. बुर्हाडी घाटावर जानराव वाबळे यांची तुकडी होती पण शत्रूच्या प्रचंड माऱ्यामुळे जवळपास १००-१५० सैनिक धारातीर्थी पडले. मराठी सैन्याची पीछेहाट होत होती आणि तेव्हाच दत्ताजी आपली फौज घेऊन आले, त्वेषाने लढू लागले. दत्ताजी शिंदेंचा कडवट प्रतिकार आणि अमर्याद शौर्य बघून कुतुबशाह आणि नजीबखान यांनी दत्ताजीला लक्ष केले.

दत्ताजी जरी त्वेषाने लढत असले तरी कितीवेळ लढणार बरं? शत्रूच्या गोळ्या लागून दत्ताजी घायाळ होऊन खाली पडले आणि शत्रूसैन्याने त्यांना चहूबाजूने घेरले. कुतुबशाह आणि नजीब हसत हसत त्याच्या समोर आले कारण एक शूर मराठा योद्धा पकडला गेला होता. कुतुबशाहने घायाळ दत्ताजीला हसत हसत विचारले, "क्यू पटेल... और लढोगे?" यावर दत्ताजी गरजले, "क्यू नाही... बचेंगे तो और भी लढेंगे..." त्यांच्या याउत्तरावर नजीबाने चिडून खाली उतरून दत्ताजींचं शीर धडावेगळं केलं. दत्ताजी धारातीर्थी पडले. त्या दिवशी अनेक मराठी सैनिकांची कत्तल झालेली. शत्रू समोर असतानासुद्धा, मृत्यू जवळ उभा असताना सुद्धा मराठी मुलखाचा स्वाभिमान, अभिमान, शौर्य दत्ताजीने दाखवले. "बचेंगे तो और भी लढेंगे" हे नाजिबाला आणि कुतुबशाहला दिलेलं नुसतं उत्तर नव्हतं तर मराठे शत्रूपुढे मायभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला मागेपुढे बघणार नाहीत हा संदेश होता. अशा या शूर योध्याला शतशः प्रणाम.

भाऊसाहेब पेशवे

सध्या पेशवे, पेशवाई हे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय पद्धतीने घेतले जातायत. राजकारण सोडलं तर पानिपतच्या युद्धात भाऊसाहेब पेशवे म्हणजेच सदाशिवरावभाऊ पेशवे यांनी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं आहे. सदाशिवरावभाऊ पेशवे म्हणजे पानिपतवरील मराठी सैन्याचे प्रमुख नेतृत्व. पानिपतचे युद्ध म्हणजे विशेषतः तरुणांचं युद्ध होतं. भाऊसाहेब पेशवे साधारण तिशीच्या घरात होते, इतकच काय तर मराठयांचा शत्रू अहमदशाह अब्दाली सुद्धा तीस-पस्तिशीचा होता. विश्वासराव तर अगदीच तरुण, कोवळ्या वयाचे. भाऊसाहेब हे अत्यंत हुशार आणि युद्धशास्त्रात निपुण होते आणि म्हणूनच त्यांच्यावर पानिपतच्या युद्धाची जबाबदारी देण्यात आली होती. भाऊसाहेबांचा अजून एक वाखाणण्यायोग्य गूण म्हणजे दूरदृष्टी. पानिपतच्या युद्धातील पराभवाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे सैन्यासोबत असलेले व्यापारी, बाजारबुणगे इत्यादी लोकं आणि हेच कारण ओळखून मोहिमेच्या सुरुवातीलाच भाऊसाहेबांनी सैन्यसोडून इतर कोणालाही सोबत घेण्यास विरोध केलेला होता. पण भाऊसाहेबांचं न ऐकणं पुढे याच मराठी फौजेला महागात पडलं.

सदाशिवरावभाऊंना माणसांची अचूक पारख होती. इब्राहिमखान गारदी हा त्यापैकीच एक. इब्राहीमखान हा फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा आणि जुन्या एका लढाईत भाऊंना इब्राहीमखानाच्या तोफांनी जेरीस आणले होते. आणि म्हणूनच भाऊसाहेबांनी इब्राहीमखानाला त्याच्या तोफखान्यासकट आपल्यासोबत घेतले होते. याचा अर्थ हाच होता कि मैदानी लढाई करावी लागली तर त्याची पूर्वतयारी भाऊसाहेबांनी आधीच केलेली. पानिपतावर मैदानी लढाईला पर्याय नव्हता, कारण गनिमी कावा पद्धतीने लढण्यासाठी दऱ्या-डोंगर यांचा आडोसा घ्यावा लागतो आणि असे दरी-डोंगर पानिपतावर नाहीत. पानिपतच्या लढाईत भाऊंनी गोल पद्धतीच्या लढाईची व्यूहरचना केली होती आणि अब्दालीने तिरकस फळी , साधारण अर्ध-चंद्रकोरीच्या पद्धतीची व्यूहरचना केली होती. भाऊसाहेब पेशवे हे प्रत्यक्ष लढाईत सहभागी होते. लीड फ्रॉम द फ्रंट अशाप्रकारचं नेतृत्व भाऊसाहेबांचं होतं आणि अब्दाली मात्र रणांगणापासून ५-६ किलोमीटर लांबून दुर्बिणीने युद्ध पाहात होता. प्रत्यक्ष लढाईमध्ये जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा मोठे मोठे, मातब्बर सरदार माघारी फिरले आणि त्यांनी भाऊसाहेबांना रणांगण सोडायचा सल्लादेखील दिला. पण आपली प्रजा, आपले सैनिक, आपले लोक मृत्यूच्या दाढेत सोडून जाणं जरी सहज शक्य असलं तरी भाऊसाहेबांना ते पटलं नाही. पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भाऊसाहेब स्वतः घोड्यावर स्वार होऊन शत्रूवर तुटून पडले होते. अगदी मोजकीच ५०-६० माणसांना घेऊन भाऊसाहेब लढत होते आणि त्यादरम्यान इब्राहीमखान गारदी जखमी होऊन पडला होता. ऐन युद्धात लढताना शत्रूच्या तोफेचा एक गोळा भाऊसाहेबांच्या मांडीवर लागला आणि भाऊसाहेब कोसळले. पण लगेचच भाल्याचा आधार घेऊन ते पुन्हा उठून लढू लागले. तेव्हा त्यांना शत्रुसैन्यातील ५ लोकांनी घेरले होते. जखमी अवस्थेतील भाऊसाहेबांनी त्या अवस्थेतसुद्धा ४ सैनिकांना कंठस्नान घातले आणि त्यावेळी भाऊसाहेब धारातीर्थी पडले.

नेतृत्व कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब पेशवे. पानिपतच्या लढाईत महाराष्ट्राने अनेक वीर गमावले पण भाऊंसारखा कुशल सेनानी गमावण ही मराठी फौजेची कधीच न भरून येणारी हानी होती. भाऊसाहेब पेशवे दिलेल्या शब्दाला किती जागणारे होते याचं एक उत्कृष्ट उदाहरण पानिपत पुस्तकात आहे. युद्ध संपल्यानंतर अब्दालीच्या सैन्याने इब्राहीमखान गारदीला अटक करून दरबारात पेश केले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. त्यावर इब्राहीमखानाने जे उत्तर दिले त्यातून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंचा शब्दाला पक्के असण्याचा स्वभाव दिसतो. इब्राहीमखान म्हणाला, " आलमपनाह, भाऊसाहेबांनी मला युद्धाला निघताना वचन दिलेलं. काहीही झालं तरी पाय मातीत रोवून ते युद्धात उभे राहतील आणि आमची साथ सोडणार नाहीत. माझ्या धान्याने त्याचा शब्द पाळला, इतकंच नाही तर त्यासाठी आपला जीव सुद्धा पणाला लावला. आणि त्या पश्चात मी त्यांच्याशी गद्दारी करू? नाही जमणार." इब्राहीमखानाच्या या उत्तरावरून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंची दिलेल्या वाचनाला जगण्याची वृत्ती दिसून येते. अशा या पराक्रमी, वीर सुपुत्राला मानाचा मुजरा.

Monday 8 January 2018

चैतन्य - चला देऊ मदतीचा हात..... करू कुपोषणावर मात....

पौष्टीक खाऊ उपक्रम

२०१७च्या बालदिनानिमित्ताने १२ नोव्हेंबर २०१७ पासून चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या पालघर जिल्ह्यातील आदिवासी विभागातील शाळेत पौष्टीक खाऊ देण्याचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला आता २ हिने पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने घेतलेला आढावा.

पौष्टीक खाऊ उपक्रम का व कोणासाठी ?

सप्टेंबर २०१७ मध्ये आम्ही चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरातील इतर मुला-मुलींसाठी मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. या शिबिराचा मूळ उद्देश आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या लोकांची तपासणी करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि आरोग्यसेवेबद्दल विश्वास निर्माण करून जनजागृती करणे हा होता.


या उपक्रमातून आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली, त्यातीलच एक म्हणजे शाळेतील असलेल्या मुला-मुलींमध्ये ८०% पेक्षा जास्त मुलांची वजन हे कमी होते (BMI calculation नंतर). अनेक मुला-मुलींमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण जास्त होते. याची दोन प्रमुख कारणं होती, १) सकस-पोषणयुक्त आहाराचा अभाव आणि २) भुकेल्यापोटी काही किलोमीटर शाळेसाठी केलेला प्रवास. शाळेला सरकारी अनुदान नसल्याने शाळेत पोषण आहार योजना नव्हती आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे पोषण आहार नाही पण मधल्या सुट्टीत त्यांना पौष्टीक खाऊ देण्याचा विचार आम्ही केला. शाळेतील शिक्षकांनीसुद्धा यासर्वांसाठी आम्हाला सहयोग दिला आणि बालदिनाचे औचित्य साधून १२ नोव्हेंबर २०१७ पासून या उपक्रमाला सुरवात झाली.

पौष्टीक खाऊ उपक्रमाचे स्वरूप

पौष्टीक खाऊ उपक्रम करताना आम्ही चैतन्य ग्रूपमधील सर्व डॉक्टर्स आणि काही माझे आहारतज्ञ मित्र यांच्या सल्ल्यानुसार त्या मुला-मुलींना खाऊ म्हणून काय देता येईल याचा एक तक्ता तयार करण्यात आला. यामध्ये गूळ-चणे (कडधान्य), गूळ-शेंगदाणे, खजूर, केळी, ग्लुकोज बिस्किट्स इ. अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवशी मुलांना त्याचे वाटप करण्यात आले.




उपक्रमाचे फलीत - उपक्रमाचे यश

कोणतीही चांगली गोष्ट घडायची असेल तर त्याला थोडा वेळ जावा लागतो. या उपक्रमाची सुरवात आम्ही १२ नोव्हेंबर २०१७ रोजी केली. त्यानंतर २४ डिसेंबर २०१७ रोजी पुन्हा सर्व मुलांचे वजन आणि इतर प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणीतून काही निष्कर्ष जे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून नोंदवण्यात आले ते पुढील प्रमाणे :-
१) शाळेतील विद्यार्थ्याचे वजन सरासरी २ किलोने वाढले. 
२) शाळेतील विद्यार्थ्यामध्ये दररोज कोणाला तरी चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार व्हायचे कारण त्या मुलांनी उपाशीपोटी केलेला प्रवास. पौष्टीक खाऊ उपक्रम सुरु केल्यानंतर चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार बंद झाले.
३) दिवसभर उपाशी असल्याने विद्यार्थ्याचं अभ्यासात लक्ष न लागणे असे अनेक प्रकार शिक्षकांच्या लक्षात आले होते पण या उपक्रमामुळे ते कमी झाले.
४) सर्वात महत्वाचं, शाळेत विद्यार्थ्याच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली. आजकाल मराठी शाळा त्यात खेड्यातील शाळा बंद होत असताना या शाळेत मात्र मुलांची उपस्थिती वाढताना दिसली.

आभार :-

उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला अनेकांची मदत झाली.

१) सर्वात आधी आभार मानावे तर प्रगट विघ्नेश शाळेतील शिक्षकांचे. शाळेतील शिक्षक हे स्वेच्छेने, एकही रुपया मानधन, पगार न घेता तिथे काम करत आहेत. त्यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. अनेक चांगले उपक्रम अयोग्य नियोजन आणि अयोग्य अंमल बजावणी यामुळे पूर्ण होत नाहीत पण शाळेतील शिक्षकांनी योग्य नियोजन करून हा उपक्रम पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
२) त्यानंतर अनेक लोकांनी या उपक्रमासाठी आम्हाला आर्थिक मदत केली. संयुक्त कोंकणी सभा पुणे या ग्रूपमधून अनेकांनी मदतीचा हात देऊ केला. प्रत्येकाची नावं इथे मी देऊ शकत नाही पण त्या सर्वांचे मनापासून आभार.
३) त्यासोबतच श्री. शशिधर भट, श्री. संतोष कुमार शानभाग, श्री. गुजर सर इ. अनेकांनी काही मुलांचा खर्च स्वतः उचलला आणि मदतीचा हात दिला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 
४) आणि चैतन्य ग्रूपच्या टीमच नाव घेतल्याशिवाय हि यादी पूर्ण होणारच नाही. टीम चैतन्य म्हणून काम करताना सर्वानी एकत्रित प्रयत्न करून हा उपक्रम पूर्ण केला त्याबद्दल चैतन्य ग्रूपला शुभेच्छा.

पुढील वाटचाल :-

पौष्टीक खाऊ  उपक्रमासोबतच विद्यार्थी, पालक आणि श्री प्रगट विघ्नेश विद्यालय यांच्या सहमतीने आणि सहकार्याने जानेवारी महिन्यापासून प्रत्येक आठवड्यातून एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना खिचडी सुद्धा देणार आहोत. या उपक्रमात आम्हाला सौ. अमुल्या मंगेश तेंडुलकर, श्री. राजाध्यक्ष सर आणि श्री. गवाणकर सर यांची मोलाची मदत झाली आहे. खिचडी हा उपक्रम आम्ही जानेवारी आणि फेब्रूवारी हे दोन महिने राबवणार आहोत. तसेच शाळेतील परीक्षा कालावधी लक्षात घेता पौष्टीक खाऊ उपक्रम सुद्धा १५ मार्च २०१८ नंतर थांबवण्यात येईल.

जून २०१८ पासून हे दोन्ही उपक्रम (पौष्टिक खाऊ आणि खिचडी उपक्रम) पुन्हा राबवण्यात येतील.

हे दोन्ही उपक्रम जून २०१८ पासून, शाळा  सुरु झाल्यानंतर पुन्हा नियमितपणे सुरु होतील. आपणही या उपक्रमात  सहभागी होऊ शकता त्यासाठी मेसेजच्या शेवटी दिलेल्या क्र. वर संपर्क करू शकता. 

धन्यवाद.
 प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)
चैतन्य मित्रमंडळ

Visit our Fb page for more details....👇

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=bookmarks