Monday 25 June 2018

Trek to Lohagad -- लोहगड - माझ्या नजरेतून

महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या गर्द हिरव्या वनराईत २ किल्ले मराठ्यांची शौर्यगाथा सांगत उभे आहेत. एक म्हणजे किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगड. हे दोन किल्ले म्हणजे २ मित्रच. या दोन किल्ल्यांच्या मधून एक अरुंद खिंड जाते, ती म्हणजे शेलार खिंड. त्यातल्याच एका किल्ल्याला भेट द्यायचा योग आला. तो म्हणजे किल्ले लोहगड.

मुंबई पासून साधारण १२० किलोमीटर वर लोणावळ्याच्या निसर्ग सौंदर्यात वसलेला हा किल्ला. इथे येण्यासाठी जर तुम्ही ट्रेन ने येत असाल तर माळवली स्टेशन पासून येता येते. आम्ही आमच्या गाडीने येथे आलो. किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ आहे. त्याला लोहगड वाडी असे नाव आहे. सहसा किल्ल्याची पेठ ही किल्ल्याच्या मध्यावर किंवा माथ्यावर असते, पण लोहगडवाडी पायथ्याशी आहे. पावसाळा आणि त्यात रविवार म्हणजे असंख्य पर्यटक लोहगडाला भेट द्यायला आले होते.

पायथ्यापासून आम्ही किल्ला चढायला सुरवात केली. जोराचा वारा आणि बारीक पाऊस असं एकंदरीत वातावरण होतं. किल्ल्यावर चढताना काही गोष्टी कायम लक्षात राहतात. सर्वप्रथम मला जाणवल्या त्या किल्ल्याच्या पायऱ्या.
किल्ल्याच्या पायऱ्या रुंद होत्या पण तितक्याच उंच होत्या. प्रत्येक पायरी चढताना जरा जास्तीची मेहनत घ्यावी लागत होती. अश्या पायऱ्या (चढायला कठीण) असण्याचं काय कारण असावं याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शत्रूसैन्याला गडावर हल्ला करताना गड चढणे कठीण जावे हाच यामागचा हेतू असावा. पायऱ्या असून सुद्धा त्या उंच पायऱ्या आणि उभी चढण आपल्याला दमवते. हजारो वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला नक्की कोणी बांधला याबद्दल अजून ठाम सांगता येत नाही. येथे राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य, यादव अश्या राजवटी होत्या. तिथून पुढे जाताना अजून एक वैशिष्ट्य लक्षात येते ते म्हणजे किल्ल्याचे दरवाजे. किल्ल्याची मजबुती ही त्याच्या दरवाज्यांवरून लक्षात येते. ५-६ फूट रुंद आणि १४-१५ फूट उंच असे अवाढव्य दरवाजे बघताना किल्ल्याचा भव्यपणा जाणवतो. सर्वात पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे "गणेश दरवाजा". दरवाजाच्या इथे गणपती बाप्पाची एक सुंदर छोटी मूर्ती आहे. म्हणूनच त्या दरवाज्याला गणेश दरवाजा असे नाव पडले असावे. गणेश दरवाज्यातून वर आल्यावर एक प्राचीन शिलालेख आढळतो. यात किल्लेदाराचे नाव कोरलेले आहे. त्यांचं नाव हे धोंडोपंत नित्सुरे, हे नाना फडणवीसांचे कारभारी होते. १४४९ मध्ये यादवांनंतर मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली आणि तेव्हा लोहगडावर यावनी सत्ता आली. अहमद नगरचा दुसरा बुऱ्हाणशहा इथे कैदेत होता. १६४८ मध्ये लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि मराठ्यांचा भगवा गडावर फडकला. नंतर पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांना देण्यात आला. १६७० मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात घेतला. या किल्ल्याचं आणखी एक ऐतिहासिक महत्व म्हणजे शिवरायांनी औरंगजेबाचं नाक ठेचून सुरत लुटून जी संपत्ती होती ती लोहगडावर ठेवली होती. लोह म्हणजे लोखंड, आणि लोखंडासारखा मजबूत असा हा लोहगड.

गणेश दरवाजातून पुढे मजल दरमजल करत आम्ही आलो. महादरवाजा, नारायण दरवाजा असे पार करत करत शेवटचा दरवाजा म्हणजे "हनुमान दरवाजा". दरवाज्याच्या डाव्या बाजूला द्रोणागिरी पेललेल्या हनुमानाची मूर्ती आहे. हनुमान दरवाजा हा सर्वात जुना दरवाजा. बाकी दरवाजे हे पेशव्यांच्या काळात नाना फडणवीसांनी बांधल्याचे कळते. दरावाज्यातून पुढे येताना एक शिवमंदिर दिसते. गडावर ४५ पाण्याच्या टाक्या आहेत. सर्व बघता आल्या नाहीत पण एक सर्वात मोठी टाकी दिसली. ती टाकी पेशव्यांच्या काळात फडणवीसांनी बांधली असल्याचा शिलालेख त्यावर आहे. गडाच्या माथ्यावर आल्यावर म्हणजे साधारण २५००-३००० फुटांवर ढग अगदी जवळ होते. "ढगांवर स्वार होणे " या म्हणीचा प्रत्यय अशावेळी येतो.

आम्हाला विंचूकाटा बघायचा होता पण ढगांची गर्दी, सोसाट्याचा वारा आणि पडणारा पाऊस हे दृश्य विलोभनीय होतं. विसापूर किल्ल्याच्या माथ्यावर ढगांची गर्दी बघता किल्ल्याला ढगांचा शिरपेच घातला असं वाटत होतं. पेशव्यांकडून जेव्हा लोहगड ब्रिटिशांनी जिंकला तेव्हा सर्वात आधी त्यांनी विसापूर जिंकला आणि विसापूर वरून लोहगडावर तोफा डागल्या. त्यामुळे लोहगड ब्रिटिशांना जिंकता आला.

असा हा दणकट किल्ला, ज्याने वर येताना सर्वाना खूप दमवलं पण वर आल्यावर निसर्गाचं देखणं रूप कदाचित मस्तानीच्या देखणेपणापेक्षा सुंदर असावं असं होतं. हा प्रवास माझ्या आणि आमच्या ग्रूपमधील सहकार्याच्या नेहमी लक्षात राहील.

प्रथमेश तेंडुलकर
९८६९३७१५८०



फोटो :- लोहगडावरून नजर ठेवण्याची जागा. खालून येणाऱ्या शत्रूला थोपवता यावं म्हणून वापरण्यात येत असे. 


फोटो :- लोहगडावरील दिशादर्शक फलक
 फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र


 फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र

फोटो :- चैतन्य ग्रूप

Tuesday 5 June 2018

वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

आज ५ जून, जागतिक पर्यावरणदिन. सहसा असे दिवस फक्त एका दिवसापुरतेच साजरे केले जातात. पर्यावरणदिनाच्या दिवशी अनेक जण फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण कार्यक्रम करतात पण त्याच्यापुढे काय? लावलेल्या झाडांची योग्य काळजी घेतली जाते का? लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगतात हा कदाचित संशोधनाचा मुद्दा असेल. आज यावर लेख लिहिण्याचं कारण इतकंच की चैतन्य मित्रमंडळाच्या माध्यमातून गेले २ वर्ष आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने जे काम करतोय ते ठळकपणे आज दिसू लागलंय आणि तेच सर्वांसमोर यावं हाच या लेखामागचा उद्देश.

चैतन्य ग्रूपतर्फे सामाजिक उपक्रम राबवताना पर्यावरणपूरक कोणते उपक्रम राबवता येतील यावर एक विचार झाला. वात्सल्य सोबत काम करताना सराफ काकांनी एक कल्पना सुचवली. बदलापूर येथे एक प्रस्तावित वृद्धाश्रमाची जागा होती. त्या जागेवर त्यांना वृक्ष लागवड करून त्यामध्ये वृद्धाश्रम बांधून त्या आजी-आजोबांचे शेवटचे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात जावे ही कल्पना होती. मग त्या जागेवर वर्ष २०१६ मध्ये साधारण ६० झाडांचे रोपण तिथे करण्यात आले. चैतन्य सोबत अजून २ ग्रूप आमच्या सोबत होते. पण ६० झाडांचे रोपण करताना त्यांची योग्य काळजी घेणं आणि त्यांना वाढवणं ही आमची जबाबदारी होती. चैतन्य ग्रूपने ही जबाबदारी गेली २ वर्ष निस्वार्थीपणे सांभाळली आहे. मध्यंतरीच्या काळात पाण्याच्या अभावाने २-३ रोपे मरण पावली पण इतर सर्व झाडे अत्यंत जोमाने वाढली. झाडांच्या वाढीसाठी लागणारे खत व इतर गोष्टी वेळेवर पुरवल्या गेल्या आणि २०१८ मध्ये वाढलेली झाडे बघता केलेल्या कामाचे, कष्टाचे चीज झाले. काही झाडांना तर छोटी छोटी फळं सुद्धा लागली होती. मध्यंतरी सराफ काकांनी तिथे एक आरोग्यसुविधा सुरु केली होती आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला बोलावले होते. तेव्हा सर्वांना आवर्जून ते त्या झाडांबद्दल सांगत होते. आम्ही ती झाडे कशी लावली, कोणत्या अडचणी आल्या, झाडांची काळजी कशी घेतली याच्याबद्दल बोलताना चैतन्यचं आणि माझं कौतुक करणाऱ्या सराफकाकांना ऐकलं की आमच्या कामाला अजून कोणाच्या पावतीची गरज वाटत नाही.

२०१७ मध्ये चैतन्य ग्रूपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात काही झाडांचे रोपण करण्यात आले. त्यावेळी तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे, झाडांचे महत्व समजावून सांगण्यात आले, झाडांची काळजी कशी घ्यायची याची माहिती देण्यात आली. ठराविक विद्यार्थयांमागे एक झाड या प्रमाणात झाडांचे रोपं करून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्या मुलांवर सोपवण्यात आली. यातून २ गोष्टी आम्ही साध्य केल्या. एक म्हणजे वृक्षारोपण केले आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या पिढीला वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. आमच्यासोबतच आमचे हे बालमित्र पुढील काळात पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक राहतील याची काळजी आम्ही घेतली.

५ जूनला एक दिवस पर्यावरण दिवस एका दिवसापुरता साजरा न करता वर्षातले ३६५ दिवस पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे.

प्रथमेश श. तेंडुलकर
चैतन्य मित्रमंडळ
(९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)

** वृक्षारोपण करताना आणि २ वर्षांनंतर झालेली झाडांची वाढ याचे फोटो देत आहे.