Sunday 14 January 2018

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग २

पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे,  इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.

विश्वासराव पेशवे, महादजी शिंदे


विश्वासराव आणि महादजी हे दोघेही पानिपतावर होते. अब्दालीच्या प्रचंड सैन्यासमोर मराठे उभे होते. त्यात भाऊसाहेब, इब्राहीमखान गारदी यांच्या सोबत अजून रणधुरंधर होते, विश्वासराव पेशवे आणि महादजी शिंदे. विश्वासराव हे अत्यंत तरुण होते म्हणजे अगदी १७-१८ वर्षाचे होते. विश्ववासराव हे दिसायला अत्यंत देखणे होते. त्यांच्या देखणेपणाबद्दल आजही बोललं जातं की "स्त्रियांमध्ये देखणी मस्तानी आणि पुरुषात देखणे विश्वासराव." यावरुन आपण अंदाज बांधू शकतो कि विश्वासराव दिसायला किती सुंदर असतील. पानिपतच्या युद्धात विश्वासरावांनी शौर्य गाजवलं पण त्यात ते धारातीर्थी पडले. विश्वासरावांचा देह जेव्हा अफगाणी सैनिकांनी पाहिला तेव्हा ते इतका तरुण, सुंदर देह मृत्यू पावलेला पाहून हळहळले. त्यांनी अब्दालीला सांगितलं, "आपण हा देह घेऊन अफगाणिस्तानला जाऊया. आणि या शरीरात पेंढा भरून त्याच जतन करूया." विश्वासरावांचा, त्यांच्या सौंदर्याचा मोह अफगाणांनासुद्धा आवरला नाही. महादजी शिंदे हे सुद्धा पानिपतच्या लढाईत होते पण ते जिवंत परत आले. त्यांच्या पायाला तलवार लागल्याने थोडी इजा झाली होती पण महादजी शिंद्यांच नाव एवढ्यासाठीच इथे घ्यावं की पानिपताच्या युद्धानंतर जवळपास १५-२० वर्ष महादाजीबाबांनी दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हे ठरवलं. महाराष्ट्र पानिपत युद्धानंतर खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरला.


इब्राहीमखान गारदी


पानिपतच्या युद्धाला काही लोक धार्मिक रंग देतात जसे पानिपतचे युद्ध हे हिंदू विरुद्ध मुस्लिम असे होते पण मुळात ते युद्ध परकीय आक्रमक विरुद्ध भारतीय असे होते. हिंदू विरुद्ध मुस्लिम युद्ध असतं तर इब्राहीमखान भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढला असता का? पानिपत युद्धाच्या पराक्रमी वीरांची सुरवात जर भाऊसाहेब पेशव्यांपासून सुरु होत असेल तर इब्राहीमखानाचे नाव घेतले नाही तर यादी अपूर्णच राहील. इब्राहीमखान हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तो आधी फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा. कुकडी नदीच्या युद्धात नानासाहेब पेशवे आणि भाऊसाहेब यांनी इब्राहीमखानाचा पराक्रम स्वतः बघितला म्हणून त्याला या युद्धात आपल्यासोबत घेतले होते. इब्राहीमखानाचा तोफांचा मारा इतका जबरदस्त होता की पानिपतचे युद्ध सुरु झाले आणि पुढल्या तास-दोन तासातच अब्दालीच्या सैन्याला खिंडारं पडली. विजयश्रीची माळ मराठयांच्या गळ्यात पडणार असं वाटत होतं पण मराठे त्यावेळी मान थोडी उंचावायला कमी पडले आणि माळ तुटली.


इब्राहीमखानाला अब्दालीने युद्धाच्या आधीच तू आमच्या पक्षात ये (पक्षांतर कर) असा सल्ला दिला होता पण त्याने तो साफ धुडकावून लावला. इतकंच नाही तर इब्राहीमखानाला कैद करून अब्दालीसमोर पेश करण्यात आले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. पण त्यावर फार सुंदर उत्तर इब्राहीखानाने अब्दालीला दिले. तो म्हणाला "आलंपना, भाऊसाहेब, आमचे धनी, यांनी पानिपतावर निघण्यापूर्वी मला वचन दिलेले की मी तुझासोबत मातीत पाय रोवून युद्धात उभा राहीन. माझे धनी वचनाला जागले, इतकंच नाही तर त्यासाठी धारातीर्थी पडले. आणि त्यांच्या पश्चात मी त्यांच्याशी प्रतारणा करू? नाही जमणार." इब्राहीमखानाचे हे बाणेदार उत्तर ऐकून अब्दालीने त्याला सोडून दिले. इब्राहीमखान परत जात असतानाच अब्दालीने त्याला थांबवले आणि विचारले, "इब्राहीम, तुम्हारे सारे सैनिक, सरदार मारे गाये. अब वापस जाकर क्या करोगे?" इब्राहीमखान म्हणाला, "कुछ नही हुजूर, परत जाईन, पुन्हा सैन्य गोळा करेन आणि अल्लातालाने मदत केलीच तर माझ्या धन्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानावर हल्ला करेन, तुमच्यावर हल्ला करेन. आणि बदला घेईन." इब्राहीमखानाचे हे उत्तर ऐकून अब्दाली प्रचंड चिडला आणि त्याने इब्राहीमखानाला कैद करून त्याची खांडोळी करण्याचा हुकूम दिला. त्यानंतर इब्राहीमखानाच्या शरीराचे बारीकबारीक तुकडे करून गिधाडांना घालण्यात आले.


पानिपतमध्ये मराठे जरी हरले तरी २२-२३ वर्षाच्या दत्ताजीचे बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर जितके बाणेदार आहे, ज्यात शौर्य अमाप भरलेलं आहे तसंच इब्राहीमखानाच्या या उत्तरात त्याची भाऊंप्रती, मराठा साम्राज्याप्रती असलेली निष्ठा दिसून येते. अशी निष्ठा, शेवटपर्यंत साथ देणारी माणसं लाभणं ही मराठा साम्राज्याची, भाऊंची पुण्याई होती. यांची चरित्रे आपल्याला सदैव प्रेरणा देतील हे निश्चित.

Saturday 13 January 2018

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १

पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १



पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, शमशेर बहाद्दर, इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.

दत्ताजी शिंदे

१० जानेवारी १७६०, यमुनाकाठी मराठयांची छावणी लागली होती. मराठी सैन्य दैनंदिन काम करत असतानाच गिलच्यांनी मराठयांवर हल्ला चढवला. तोफा, बंदुका यांचा प्रचंड मारा होत होता. त्या मानाने मराठी सैन्याकडे शस्त्रे आधुनिक नव्हती. मराठी सैन्याच प्रमुख शस्त्र म्हणजे तलवारी, भाले आणि बंदुका पण त्या खूप कमी सैनिकांकडे होत्या. अचानक आलेल्या शत्रूला मराठे कडवा प्रतिकार करत होते. बुर्हाडी घाटावर जानराव वाबळे यांची तुकडी होती पण शत्रूच्या प्रचंड माऱ्यामुळे जवळपास १००-१५० सैनिक धारातीर्थी पडले. मराठी सैन्याची पीछेहाट होत होती आणि तेव्हाच दत्ताजी आपली फौज घेऊन आले, त्वेषाने लढू लागले. दत्ताजी शिंदेंचा कडवट प्रतिकार आणि अमर्याद शौर्य बघून कुतुबशाह आणि नजीबखान यांनी दत्ताजीला लक्ष केले.

दत्ताजी जरी त्वेषाने लढत असले तरी कितीवेळ लढणार बरं? शत्रूच्या गोळ्या लागून दत्ताजी घायाळ होऊन खाली पडले आणि शत्रूसैन्याने त्यांना चहूबाजूने घेरले. कुतुबशाह आणि नजीब हसत हसत त्याच्या समोर आले कारण एक शूर मराठा योद्धा पकडला गेला होता. कुतुबशाहने घायाळ दत्ताजीला हसत हसत विचारले, "क्यू पटेल... और लढोगे?" यावर दत्ताजी गरजले, "क्यू नाही... बचेंगे तो और भी लढेंगे..." त्यांच्या याउत्तरावर नजीबाने चिडून खाली उतरून दत्ताजींचं शीर धडावेगळं केलं. दत्ताजी धारातीर्थी पडले. त्या दिवशी अनेक मराठी सैनिकांची कत्तल झालेली. शत्रू समोर असतानासुद्धा, मृत्यू जवळ उभा असताना सुद्धा मराठी मुलखाचा स्वाभिमान, अभिमान, शौर्य दत्ताजीने दाखवले. "बचेंगे तो और भी लढेंगे" हे नाजिबाला आणि कुतुबशाहला दिलेलं नुसतं उत्तर नव्हतं तर मराठे शत्रूपुढे मायभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला मागेपुढे बघणार नाहीत हा संदेश होता. अशा या शूर योध्याला शतशः प्रणाम.

भाऊसाहेब पेशवे

सध्या पेशवे, पेशवाई हे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय पद्धतीने घेतले जातायत. राजकारण सोडलं तर पानिपतच्या युद्धात भाऊसाहेब पेशवे म्हणजेच सदाशिवरावभाऊ पेशवे यांनी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं आहे. सदाशिवरावभाऊ पेशवे म्हणजे पानिपतवरील मराठी सैन्याचे प्रमुख नेतृत्व. पानिपतचे युद्ध म्हणजे विशेषतः तरुणांचं युद्ध होतं. भाऊसाहेब पेशवे साधारण तिशीच्या घरात होते, इतकच काय तर मराठयांचा शत्रू अहमदशाह अब्दाली सुद्धा तीस-पस्तिशीचा होता. विश्वासराव तर अगदीच तरुण, कोवळ्या वयाचे. भाऊसाहेब हे अत्यंत हुशार आणि युद्धशास्त्रात निपुण होते आणि म्हणूनच त्यांच्यावर पानिपतच्या युद्धाची जबाबदारी देण्यात आली होती. भाऊसाहेबांचा अजून एक वाखाणण्यायोग्य गूण म्हणजे दूरदृष्टी. पानिपतच्या युद्धातील पराभवाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे सैन्यासोबत असलेले व्यापारी, बाजारबुणगे इत्यादी लोकं आणि हेच कारण ओळखून मोहिमेच्या सुरुवातीलाच भाऊसाहेबांनी सैन्यसोडून इतर कोणालाही सोबत घेण्यास विरोध केलेला होता. पण भाऊसाहेबांचं न ऐकणं पुढे याच मराठी फौजेला महागात पडलं.

सदाशिवरावभाऊंना माणसांची अचूक पारख होती. इब्राहिमखान गारदी हा त्यापैकीच एक. इब्राहीमखान हा फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा आणि जुन्या एका लढाईत भाऊंना इब्राहीमखानाच्या तोफांनी जेरीस आणले होते. आणि म्हणूनच भाऊसाहेबांनी इब्राहीमखानाला त्याच्या तोफखान्यासकट आपल्यासोबत घेतले होते. याचा अर्थ हाच होता कि मैदानी लढाई करावी लागली तर त्याची पूर्वतयारी भाऊसाहेबांनी आधीच केलेली. पानिपतावर मैदानी लढाईला पर्याय नव्हता, कारण गनिमी कावा पद्धतीने लढण्यासाठी दऱ्या-डोंगर यांचा आडोसा घ्यावा लागतो आणि असे दरी-डोंगर पानिपतावर नाहीत. पानिपतच्या लढाईत भाऊंनी गोल पद्धतीच्या लढाईची व्यूहरचना केली होती आणि अब्दालीने तिरकस फळी , साधारण अर्ध-चंद्रकोरीच्या पद्धतीची व्यूहरचना केली होती. भाऊसाहेब पेशवे हे प्रत्यक्ष लढाईत सहभागी होते. लीड फ्रॉम द फ्रंट अशाप्रकारचं नेतृत्व भाऊसाहेबांचं होतं आणि अब्दाली मात्र रणांगणापासून ५-६ किलोमीटर लांबून दुर्बिणीने युद्ध पाहात होता. प्रत्यक्ष लढाईमध्ये जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा मोठे मोठे, मातब्बर सरदार माघारी फिरले आणि त्यांनी भाऊसाहेबांना रणांगण सोडायचा सल्लादेखील दिला. पण आपली प्रजा, आपले सैनिक, आपले लोक मृत्यूच्या दाढेत सोडून जाणं जरी सहज शक्य असलं तरी भाऊसाहेबांना ते पटलं नाही. पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भाऊसाहेब स्वतः घोड्यावर स्वार होऊन शत्रूवर तुटून पडले होते. अगदी मोजकीच ५०-६० माणसांना घेऊन भाऊसाहेब लढत होते आणि त्यादरम्यान इब्राहीमखान गारदी जखमी होऊन पडला होता. ऐन युद्धात लढताना शत्रूच्या तोफेचा एक गोळा भाऊसाहेबांच्या मांडीवर लागला आणि भाऊसाहेब कोसळले. पण लगेचच भाल्याचा आधार घेऊन ते पुन्हा उठून लढू लागले. तेव्हा त्यांना शत्रुसैन्यातील ५ लोकांनी घेरले होते. जखमी अवस्थेतील भाऊसाहेबांनी त्या अवस्थेतसुद्धा ४ सैनिकांना कंठस्नान घातले आणि त्यावेळी भाऊसाहेब धारातीर्थी पडले.

नेतृत्व कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब पेशवे. पानिपतच्या लढाईत महाराष्ट्राने अनेक वीर गमावले पण भाऊंसारखा कुशल सेनानी गमावण ही मराठी फौजेची कधीच न भरून येणारी हानी होती. भाऊसाहेब पेशवे दिलेल्या शब्दाला किती जागणारे होते याचं एक उत्कृष्ट उदाहरण पानिपत पुस्तकात आहे. युद्ध संपल्यानंतर अब्दालीच्या सैन्याने इब्राहीमखान गारदीला अटक करून दरबारात पेश केले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. त्यावर इब्राहीमखानाने जे उत्तर दिले त्यातून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंचा शब्दाला पक्के असण्याचा स्वभाव दिसतो. इब्राहीमखान म्हणाला, " आलमपनाह, भाऊसाहेबांनी मला युद्धाला निघताना वचन दिलेलं. काहीही झालं तरी पाय मातीत रोवून ते युद्धात उभे राहतील आणि आमची साथ सोडणार नाहीत. माझ्या धान्याने त्याचा शब्द पाळला, इतकंच नाही तर त्यासाठी आपला जीव सुद्धा पणाला लावला. आणि त्या पश्चात मी त्यांच्याशी गद्दारी करू? नाही जमणार." इब्राहीमखानाच्या या उत्तरावरून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंची दिलेल्या वाचनाला जगण्याची वृत्ती दिसून येते. अशा या पराक्रमी, वीर सुपुत्राला मानाचा मुजरा.

Monday 8 January 2018

चैतन्य - चला देऊ मदतीचा हात..... करू कुपोषणावर मात....

पौष्टीक खाऊ उपक्रम

२०१७च्या बालदिनानिमित्ताने १२ नोव्हेंबर २०१७ पासून चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या पालघर जिल्ह्यातील आदिवासी विभागातील शाळेत पौष्टीक खाऊ देण्याचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला आता २ हिने पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने घेतलेला आढावा.

पौष्टीक खाऊ उपक्रम का व कोणासाठी ?

सप्टेंबर २०१७ मध्ये आम्ही चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरातील इतर मुला-मुलींसाठी मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. या शिबिराचा मूळ उद्देश आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या लोकांची तपासणी करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि आरोग्यसेवेबद्दल विश्वास निर्माण करून जनजागृती करणे हा होता.


या उपक्रमातून आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली, त्यातीलच एक म्हणजे शाळेतील असलेल्या मुला-मुलींमध्ये ८०% पेक्षा जास्त मुलांची वजन हे कमी होते (BMI calculation नंतर). अनेक मुला-मुलींमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण जास्त होते. याची दोन प्रमुख कारणं होती, १) सकस-पोषणयुक्त आहाराचा अभाव आणि २) भुकेल्यापोटी काही किलोमीटर शाळेसाठी केलेला प्रवास. शाळेला सरकारी अनुदान नसल्याने शाळेत पोषण आहार योजना नव्हती आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे पोषण आहार नाही पण मधल्या सुट्टीत त्यांना पौष्टीक खाऊ देण्याचा विचार आम्ही केला. शाळेतील शिक्षकांनीसुद्धा यासर्वांसाठी आम्हाला सहयोग दिला आणि बालदिनाचे औचित्य साधून १२ नोव्हेंबर २०१७ पासून या उपक्रमाला सुरवात झाली.

पौष्टीक खाऊ उपक्रमाचे स्वरूप

पौष्टीक खाऊ उपक्रम करताना आम्ही चैतन्य ग्रूपमधील सर्व डॉक्टर्स आणि काही माझे आहारतज्ञ मित्र यांच्या सल्ल्यानुसार त्या मुला-मुलींना खाऊ म्हणून काय देता येईल याचा एक तक्ता तयार करण्यात आला. यामध्ये गूळ-चणे (कडधान्य), गूळ-शेंगदाणे, खजूर, केळी, ग्लुकोज बिस्किट्स इ. अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवशी मुलांना त्याचे वाटप करण्यात आले.




उपक्रमाचे फलीत - उपक्रमाचे यश

कोणतीही चांगली गोष्ट घडायची असेल तर त्याला थोडा वेळ जावा लागतो. या उपक्रमाची सुरवात आम्ही १२ नोव्हेंबर २०१७ रोजी केली. त्यानंतर २४ डिसेंबर २०१७ रोजी पुन्हा सर्व मुलांचे वजन आणि इतर प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणीतून काही निष्कर्ष जे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून नोंदवण्यात आले ते पुढील प्रमाणे :-
१) शाळेतील विद्यार्थ्याचे वजन सरासरी २ किलोने वाढले. 
२) शाळेतील विद्यार्थ्यामध्ये दररोज कोणाला तरी चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार व्हायचे कारण त्या मुलांनी उपाशीपोटी केलेला प्रवास. पौष्टीक खाऊ उपक्रम सुरु केल्यानंतर चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार बंद झाले.
३) दिवसभर उपाशी असल्याने विद्यार्थ्याचं अभ्यासात लक्ष न लागणे असे अनेक प्रकार शिक्षकांच्या लक्षात आले होते पण या उपक्रमामुळे ते कमी झाले.
४) सर्वात महत्वाचं, शाळेत विद्यार्थ्याच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली. आजकाल मराठी शाळा त्यात खेड्यातील शाळा बंद होत असताना या शाळेत मात्र मुलांची उपस्थिती वाढताना दिसली.

आभार :-

उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला अनेकांची मदत झाली.

१) सर्वात आधी आभार मानावे तर प्रगट विघ्नेश शाळेतील शिक्षकांचे. शाळेतील शिक्षक हे स्वेच्छेने, एकही रुपया मानधन, पगार न घेता तिथे काम करत आहेत. त्यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. अनेक चांगले उपक्रम अयोग्य नियोजन आणि अयोग्य अंमल बजावणी यामुळे पूर्ण होत नाहीत पण शाळेतील शिक्षकांनी योग्य नियोजन करून हा उपक्रम पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
२) त्यानंतर अनेक लोकांनी या उपक्रमासाठी आम्हाला आर्थिक मदत केली. संयुक्त कोंकणी सभा पुणे या ग्रूपमधून अनेकांनी मदतीचा हात देऊ केला. प्रत्येकाची नावं इथे मी देऊ शकत नाही पण त्या सर्वांचे मनापासून आभार.
३) त्यासोबतच श्री. शशिधर भट, श्री. संतोष कुमार शानभाग, श्री. गुजर सर इ. अनेकांनी काही मुलांचा खर्च स्वतः उचलला आणि मदतीचा हात दिला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 
४) आणि चैतन्य ग्रूपच्या टीमच नाव घेतल्याशिवाय हि यादी पूर्ण होणारच नाही. टीम चैतन्य म्हणून काम करताना सर्वानी एकत्रित प्रयत्न करून हा उपक्रम पूर्ण केला त्याबद्दल चैतन्य ग्रूपला शुभेच्छा.

पुढील वाटचाल :-

पौष्टीक खाऊ  उपक्रमासोबतच विद्यार्थी, पालक आणि श्री प्रगट विघ्नेश विद्यालय यांच्या सहमतीने आणि सहकार्याने जानेवारी महिन्यापासून प्रत्येक आठवड्यातून एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना खिचडी सुद्धा देणार आहोत. या उपक्रमात आम्हाला सौ. अमुल्या मंगेश तेंडुलकर, श्री. राजाध्यक्ष सर आणि श्री. गवाणकर सर यांची मोलाची मदत झाली आहे. खिचडी हा उपक्रम आम्ही जानेवारी आणि फेब्रूवारी हे दोन महिने राबवणार आहोत. तसेच शाळेतील परीक्षा कालावधी लक्षात घेता पौष्टीक खाऊ उपक्रम सुद्धा १५ मार्च २०१८ नंतर थांबवण्यात येईल.

जून २०१८ पासून हे दोन्ही उपक्रम (पौष्टिक खाऊ आणि खिचडी उपक्रम) पुन्हा राबवण्यात येतील.

हे दोन्ही उपक्रम जून २०१८ पासून, शाळा  सुरु झाल्यानंतर पुन्हा नियमितपणे सुरु होतील. आपणही या उपक्रमात  सहभागी होऊ शकता त्यासाठी मेसेजच्या शेवटी दिलेल्या क्र. वर संपर्क करू शकता. 

धन्यवाद.
 प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)
चैतन्य मित्रमंडळ

Visit our Fb page for more details....👇

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=bookmarks