Wednesday 28 August 2019

मंतरलेले दिवस

25 ऑगस्ट 2019ला आम्ही सांगली विभागातील एका गावाला (पूरग्रस्त गावाला) मदत देऊन आलो. या लेखातून गेल्या 15 दिवसांचा माझा अनुभव मांडणार आहे. मदत करताना आणि त्याआधीचे सर्व अनुभव या लेखातून मांडणार आहे. म्हणून हा लेख कदाचित थोडा मोठा, दोन टप्प्यात होईल. कसा आहे ते नक्की कळवावे.

बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या बातम्या पाहत होतो, त्याने झालेलं नुकसान पाहत होतो. पण काही कारणाने चैतन्यतर्फे हा उपक्रम करावा असा विचार नव्हता. इतकं मोठं नुकसान आणि आपली मदत कोणापर्यंत आणि किती पुरी पडणार याचा काहीच अंदाज नव्हता. 7 ऑगस्टला संध्याकाळी बातम्यांमध्ये पुराची बातमी पाहिली आणि तिथली एकूण परिस्थिती बघून कोणाचं मन हेलावलं नसेल असा माणूस कदाचित दुर्मिळ असेल. म्हणून हा उपक्रम थोड्या प्रमाणात का होईना पण करायचाच असं ठरवलं आणि 8 ऑगस्ट 2019ला आमच्या कमिटीमधील सदस्यांना कल्पना देऊन या उपक्रमाची तयारी सुरु केली केली. सर्वात महत्वाचे होते की नक्की मदत कुठे करायची? सांगली कोल्हापूर सारखाच एक पूर कोकण विभागात आला होता. दुसरा प्रश्न हा होता की स्थानिक पातळीवर योग्य मार्गदर्शन कोण करेल? हे पहिले दोन महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात आधी मी माझ्या संपर्कांत असलेल्यांपैकी काही विश्वासू व्यक्तींना (सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागातील) संपर्क केला. त्यांच्याशी बोलल्यानंतर अजून एक समजलं की सांगली कोल्हापूर विभागातील पुराचे प्रमाण आणि त्यातून झालेले नुकसान सर्वात जास्त होते. आणि त्यातच डॉ. महेशकुमार ढाणे सरांची ओळख झाली. त्यांनी सांगली विभागातील लोकांना नक्की कोणत्या गोष्टीची गरज आहे, काय करावं लागेल याची सर्व माहिती दिली. "तुम्ही इथलं माझ्यावर सोडा, आपण नक्की काहीतरी चांगलं करू" असं म्हणणारे डॉक्टर ढाणे सांगलीच्या भिलवडी आणि भुवनेश्वरवाडीच्या लोकांसाठी देवदूतापेक्षा कमी नव्हते. अशी सर्व तयारी झाल्यावर 9 ऑगस्ट 2019 पासून या उपक्रमाची सुरवात झाली.

सुरवातीला आम्ही सॅनिटरी नॅपकिन आणि ORS पावडर जमा करण्याकडे भर दिला. लोकांनी सुद्धा भरभरून सपोर्ट केला. लोकांचा चैतन्यवरील विश्वास पाहून हा उपक्रम नक्की पूर्ण होईल हा आत्मविश्वास आला. एका मित्राची बोलकी प्रतिक्रिया होती. त्याने त्याचं नावं गोपनीय ठेवावं म्हणून सांगितलं म्हणून ते इथे लिहीत नाही पण तो म्हणाला की, "मला मदत करायची होती पण कशी करू आणि कुठे करू हेच समजत नव्हतं. तुझी पोस्ट वाचली आणि मार्ग सापडला. तुम्ही योग्य ठिकाणीच मदतीचं वाटप कराल ही खात्री आहे." लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे याचं हे उदाहरण होतं. सॅनिटरी नॅपकिन आणि ORS पावडर यांची गरज पूर्ण होते न होते तोच डॉ. ढाणे यांनी एका गावाची माहिती दिली. भुवनेश्वरी देवीच्या मंदिराला लागूनच वसलेलं गाव, भुवनेश्वर वाडी. साधारण 70 कुटुंबांचं हे गाव. या सर्वांना शक्य तेवढी मदत पोहोचवायचं आम्ही ठरवलं आणि डॉक्टरांकडून मिळालेल्या माहिती नुसार सामान आणि सामानासाठी लागणारे पैसे जमा करण्यासाठी सुरवात झाली. या मदतीत प्रत्येक कुटुंबाला एक फॅमिली पॅक द्यायचा ठरला ज्यात काही दिवस पुरेल इतकं अन्नधान्य, ब्लॅंकेट, चटई, लहान मुलांचे डायपर्स, ORS पावडर, रोजच्या वापरातल्या वस्तू, महिलांना साड्या, सॅनिटरी नॅपकिन अश्या वस्तू देण्यात आल्या. सोबतच प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांना शाळेसाठी दप्तरासकट शालेय साहित्य देण्यात आले. एका कुटुंबाला मदत करताना घरातील मुलांचं शिक्षण मागे पडू नये म्हणून केलेला हा एक प्रयत्न होता.

खरंतर चैतन्यतर्फे अश्या अस्मानी संकटात सापडलेल्यांना मदत करायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे मदत कशी जमवायची हा एक खूप मोठा प्रश्न होता. पण चांगल्या कामासाठी अनेक हात आपोआप जोडत जातात तसेच हात आमच्या सोबत जोडले गेले. आणि 70 कुटुंबांना करायची मदत हळू हळू जमा झाली आणि वाटायची तारीख ठरली 25 ऑगस्ट 2019. पण खरं आव्हान तर पुढे होतं. सर्व सामान तर जमा झालेलं पण त्याचं व्यवस्थित पॅकिंग करणं बाकी होतं, फॅमिली पॅक करायचे होते आणि असं बरंच काम होतं आणि तेही लवकरात लवकर करायचं होतं. अशावेळी चैतन्यच्या तीन मुली स्वतःहून पुढे आल्या आणि त्यांनी हे सर्व काम हाती घेतलं. स्नेहाली आणि पूजाच्या घरी सर्व सामान जमा केलं. स्नेहालीने 70 शालेय साहित्याचे पॅकिंग केलं. पूजा, स्नेहाली आणि दिपालीने मिळून सर्व फॅमिली पॅक तयार केले. 14 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत स्वतःचा जॉब सांभाळून, घरची कामं सांभाळून रात्री 12-1 वाजेपर्यंत जागून आम्ही चौघांनी हे सर्व पॅक तयार केले. पॅक तयार होईपर्यंत कोणालाच भूक, झोप आठवत नव्हती. स्वतःसाठी प्रत्येकजण करतो पण हे दुसऱ्यासाठी करत होते हे विशेष. यांच्यासोबत विशेष कौतुक करावं ते यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांचं. स्नेहाली आणि पूजाच्या घरी बरंच सामान उतरवलं तरी त्यांच्या सदस्यांनी यासाठी मदत केली, कुठलीही तक्रार न करता. उलट स्नेहालीच्या घरी पॅकिंग करताना खायला काय हवं नको ते सुद्धा तीची आई बघत होती. चांगलं काम करताना माणूस एकटा नसतो हेच खरं. इतकी मेहनत घेतल्यावर काम पूर्ण झालंच पाहिजे होतं आणि ते आम्ही केलंच. 9 तारखेपासून 24 तारखेपर्यंतचे हे दिवस आमच्यासाठी मंतरलेले होते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच विषय डोक्यात, "बाकी वस्तू कश्या जमवायच्या इ.". सुरवातीला आम्ही हे सामान टेम्पो मधून पाठवणार होतो पण प्रत्यक्ष हा अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही ठरल्या प्रमाणे 24-25 तारखेच्या रात्री 12 वाजता हा प्रवास सुरु केला, तो प्रवास आणि सांगलीतील अनुभव पुढील लेखात मांडणार आहे. नक्की वाचा.

प्रथमेश श. तेंडुलकर
Mob. N0. - 9869371580

*सामानाचे पॅकिंग करतानाचे आणि इतर फोटो सोबत जोडत आहे


पूजाच्या घरी उतरवलेलं सर्व अन्नधान्य, चटई, ब्लॅंकेट आणि इतर सामान


स्नेहालीच्या घरी जमा केलेलं "शैक्षणिक साहित्य"


फॅमिलीपॅक तयार करताना दीपाली आणि स्नेहाली.


दीपाली, स्नेहाली, पूजा यांच्या मेहनतीने तयार  झालेले फॅमिली पॅक