Friday 13 October 2017

दिवाळी आणि फटाके

जसं दिवाळी आणि दिवे, दिवाळी आणि रांगोळी, दिवाळी आणि फराळ ह्याच अतूट नातं आहे तसंच दिवाळी आणि फटाक्यांच सुद्धा एक अतूट नातं आहे. लहानपणी अजिबातच फटाके वाजवले नाहीत असे फारच कमी लोक सापडतील. लहान मुलांना फटाक्यांच एक विशिष्ट आकर्षण असतं, मला सुद्धा होतं. माझ्या लहानपणी बाबा मस्जिद बंदरवरुन होलसेल रेट मधे फटाके घेऊन यायचे आणि मग घरी आम्हा दोन भावांमध्ये समसमान वाटणी व्हायची. फुलबाज्या, अनार, भुईचक्र आणि लवंगी एवढेच काय ते फटाके आम्ही वाजवले. खूप मजा यायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर, पहाटे उठा, अभ्यंगस्नान करा, देवाची पूजा करा, देवासमोर फराळ ठेऊन मग त्यावर यथेच्छ ताव मारा. एवढ सगळं झालं की मग फटाके घेऊन फोडायला आम्ही मोकळे. एक वेगळाच आनंद मिळायचा त्यात. बरं तुम्ही म्हणाल आज ह्यावर का बोलतोय ? कारण इतकंच आहे की फटाकेबंदीचा निर्णय आला आणि एक विचार सहज डोक्यात आला की आमच्या लहानपणी अशी बंदी असती तर? ह्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आम्ही घेतला असता का? उत्तर "नाही" असंच आहे.

दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीमधे दिवाळीचे ५ दिवस आणि नंतर काही दिवस (१०-१५ दिवस) फटाके वाजवणे आणि निवासी भागात फटाके विकणे ह्यावर बंदी केली. आणि ह्याच बंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा असा कायदा करायचा सरकारचा विचार असल्याचे आपले मंत्री म्हणाले. मुळातच सरसकट बंदीला माझा विरोध आहे. कुठलीही बंदी सरसकट असू नये. हो त्यावर काही निर्बंध असावेत जेणेकरून काही चुकीच्या गोष्टींना आवर घालता येईल. पण आजकाल आपण बघतोय सणांच्या वेळी, विशेषतः हिंदू सणांमध्ये काही चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी उत्सव साजरे करण्यावर बंदी येतेय आणि हेच चुकीचे आहे. विषय दिवाळीचा आहे तर तेवढ्यापुरतच बोलतो. आज ही बंदी येण्याच किंवा होईल भविष्यात, त्याच कारण काय, तर प्रदूषण (हवेच, आवाजाच), वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास. खरं आहे, दिवाळीच्या ५ दिवसात खूप फटाके फोडले जातात, खूप आवाज होतो, पण ह्यावर बंदी हा एकमेव पर्याय नाही ना. चायनीज फटाके आज बाजारात खूप स्वस्त आणि खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात. एका सर्वे नुसार चायनीज फटाके हे आपल्या देशी फटाक्यांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास दुप्पट प्रदूषण करतात. असे फटाके आज सर्रास विकले जातात. मुळातच चायनीज फटाके भारतात विकायला परवाना नाही तरी कायदा मोडून ते विकले जातात. ह्यावर कंट्रोल कोण करणार?

बरं प्रदूषण प्रदूषण आपण म्हणतोय तर त्यावर जरा बोलू. दिल्लीमधे प्रदूषण मंडळाने एक वर्ष सर्वे केला. त्यातून असे निष्पन्न झाले की सोमवार ते शुक्रवार ह्या दिवशी दिल्ली मधे सरासरी ८०% हवेचे प्रदूषण झाले. शनिवार-रविवार मिळून सरासरी ६०-६५% हवेचे प्रदूषण झाले. आणि दिवाळीच्या ५ दिवसात सरासरी ८४% हवेचे प्रदूषण झाले. ह्याचाच आधार घ्यायचा झाला तर दिवाळीतील हवेचे प्रदूषण हे सरासरी ४% ने वाढले. मग उरलेल्या ८०%च काय ? ते कमी करण्यासाठी आम्ही काय केलं ? आज डिजेल, पेट्रोलच्या गाड्या प्रदूषण करत नाहीत का? आज मुम्बई मधे अनेक सधन एका कुटुम्बामागे 2 चारचाकी व 1 दुचाकी वाहनाची नोंद होते. ह्याला आवर कोण घालणार? आज दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापरावर आपण निर्बंध घालू शकत नसताना फटाके बंदीची मागणी करणं म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे. वाहनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आज इलेक्ट्रिक कार किंवा बाईकचा पर्याय आहे, लहान अंतर सायकलने किंवा चालत जाऊ शकतो, असे अनेक उपाय करता येतील. प्रत्येक कुटुम्बावर गाडी खरेदी करताना निर्बंध घातले जाऊ शकतात, असे अनेक उपाय करु शकतो पण सरकारची ती इच्छाशक्ति आहे का? की ह्या गाड्या प्रदूषण करतात म्हणून त्यांच उत्पादन बंद करणार?

राहिला फटाक्यांचा प्रश्न, तर त्यावर तोडगा नाही निघू शकत ? जसं चायनीज फटाके जे जास्त प्रदूषण करतात, मोठ्या आवाजाचे फटाके जे ध्वनीप्रदूषण करतात, ह्यावर बंदी लादून इतर फटाके लोकवस्ती सोडून एखादं मैदान घ्यावं जिथे हे फटाके फोडावेत. हे आपण रेग्युलेट करु शकत नाही का? बाहेरच्या देशात (न्यूझीलँड इ.) फटाके वाजवायला एक मोकळं मैदान असतं, जिथे परवानगी असलेलेच फटाके फोडता येतात. मग हे आपल्या देशात आपण का करु शकत नाही? तत्सम गोष्टींना सरसकट बंदिचे नियम लावण्यापेक्षा काही मध्यममार्ग काढले तर पर्यावरण आणि लोकभावना दोन्हीचा समतोल राखता येईल, असं मला वाटत. कारण एका बाजूला विकास पाहिजे म्हणून मेट्रो साठी हजारो झाडे तोडायला निघालेले लोकांना पर्यावरण रक्षणाची शपथ देत फटाके बंदीची मागणी करतात तेव्हा हसावं की रडावं हाच प्रश्न उरतो. बाकी आपण सूज्ञ आहातच.

Thursday 31 August 2017

रोज मरे त्याला कोण रडे...

२६ जुलै २००५, मुम्बईच्या इतिहासातील एक काळा दिवस. मिठी नदीला आलेला पूर आणि सतत पडणारा पाऊस. जीवितहानि, वित्तहानि असं कितीतरी घडलं होतं त्या दिवशी. तब्बल ९००मीमी पाऊस पडला आणि कधी न मंदावणारी मुम्बई थाम्बली होती. आता तुम्ही म्हणाल की ह्या दिवसाची आठवण हा का बरं करून देतोय? ह्या दिवसाची आठवण कोणालाच नकोय पण २ दिवसापुर्वी म्हणजे २९ ऑगस्ट २०१७ रोजी असाच पाऊस इथे पडला आणि सर्वांना २६ जुलैची आठवण झाली. सकाळपासून पडत असलेल्या पावसाने दुपारी अगदी थैमान घातले आणि परिणामी मुम्बई भरली, पावसाच्या पाण्याने. ट्रेन थाम्बल्या, गाड्यांचा वेग मंदावला. दुपारी गुढगाभर असलेलं पाणी संध्याकळी कमरेपर्यँत आलं. नंतर पाऊस जसा थाम्बला तसं ते ओसरल पण तब्बल ८-९ तास ह्या पावसाच्या पाण्यात मुंबईकर अडकला होता.

दरम्यानच्या काळात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. जाती, धर्म विसरून सर्व एकमेकांना मदत करत होते ते फक्त मुंबईकर म्हणून. दुसऱ्या दिवशी मुम्बई पुन्हा त्याच वेगाने कामाला लागली. सर्वांनी मुंबईकरांच कौतुकसुद्धा केले. बघा, स्पिरिट बघा. मुंबईकरांच स्पिरिट ह्यावर रकानेच्या रकाने भरून लेख आले. पण कसले स्पिरिट आणि कसलं काय. खरंतर हा नाईलाज आहे मुंबईकरांचा. एक वर्ष दाखवा की मुम्बईमधे गुडघाभर पाणी साचल नाही, रस्त्यांना खड्डे नाहीत. असं एक वर्ष दाखवा फक्त. बरं भौगोलिक परिस्थिती आहे सर्व मान्य आहे पण आता जरा facts वर बोलुया. २००५ साली ९००मिमी पाऊस पडला आणि २९ ऑगस्ट २०१७ला जवळपास ३००मिमी. म्हणजे तब्बल ६००मिमी पाऊस कमी पडला. पण ह्या ३००मिमी पावसाने मुम्बई कमरेभर "भरून दाखवली" पण जर ९००मिमी पडला असता तर त्याने मुम्बई "बुडवून दाखवली" असती. ह्याची कल्पना करून बघा. असं काही झाल की एकतर भौगोलिक स्तिथि किंवा मग मुम्बईकर लोकांनी केलेला कचरा असं म्हणून त्यांच्यावर खापर फोडायला आम्ही मोकळे. कचरा हे एक कारण आहेच ह्या सर्वाचे पण त्यापेक्षाही जास्त ढिसाळ व्यवस्थापन आहे. जागोजागी मेट्रोमुळे पडलेले खड्डे, रस्त्यावर तर रस्ता तसाही दिसत नाही, खड्डेच खड्डे ह्यामुळे पावसामुळे त्रासलेल्या मुम्बईचा वेग खड्ड्यात गेला.

मग आपण म्हणणार की पाऊसच इतका पडला त्याला आम्हीतरी काय करणार? बरोबर ना साहेब. पावसाने त्याच्या पद्धतीने पडून दाखवलं पण त्या आधी व्यवस्थापन नीट करून आपण का नाही दाखवलं? आता पाऊस काय तुम्हाला विचारून पडणार का? की बाबा झाली का तयारी? पडू का आता? नाही ना? प्रत्येक शहराची एक आपत्ति व्यवस्थापन नावाचा प्रकार असतो. काही वर्षापूर्वी चेन्नई मधे असाच पाऊस पडला. चेन्नई अगदी पाण्याखाली गेलेलं. त्यानंतर ते चिखलफेक नाही करत बसले. त्यांनी एक अभ्यास कमिटी बसवली. त्या कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्यात म्हटले होते की हवामानात होणारे बदल ह्यामुळे आता पावसाचे प्रमाण वाढेल आणि किमान २००मिमी पाऊस दरवर्षी पडण्याची शक्यता वर्तवली होती. २००५ ते २०१७, तब्बल १२ वर्षे झाली तरी आपण ह्यातून काही धडा घेत नाही. ३५०००कोटी वार्षिक बजेट असलेली आमची महापालिका नक्की करतेय काय? आमच्या घरात डेन्ग्यूच्या अळ्या सापडल्या की आपण आमच्यावर कारवाई करणार मग रोज खड्ड्यात जाऊन येऊन ज्यांना मणक्याचे, पाठीचे आजार झालेल्या लोकांनी महापालिकेला का दोषी ठरवू नये. तुम्बलेल्या पाण्यातून लेप्टो सारखे आजार पसरून ज्यांना त्याचा त्रास होईल त्याची नैतिक जबाबदारी महापालिका घेणार काय?

बॉम्बस्फोट असो, आतंकवादी हल्ला असो किंवा हे कालसारखी तुम्बलेली मुम्बई असो, मुम्बईकर आपलं स्पिरिट नेहमीच दाखवतात. त्याबद्दल मुम्बईकरांना सलाम. पण किती वर्ष हे स्पिरिट दाखवायच? ह्या स्पिरिटमधे नाईलाज आहे. मुम्बईची ही अवस्था पाहता एकच म्हणावं लागेल, "रोज मरे त्याला कोण रडे?"

---- एक मुम्बईकर

Thursday 27 July 2017

आरोग्यम धन संपदा....

आरोग्यम धन संपदा

मागच्या एका ब्लॉग मध्ये मी पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात असलेल्या अंधश्रद्धेविषयी माहिती दिली होती. मेडिकल ट्रीटमेंटच्या अभावी कशाप्रकारे एका मुलीला आपला जीव गमवावा लागला ह्याची माहिती मी दिली होती. (त्या ब्लॉगची लिंक मी देत आहे दुर्दैव.... http://prathamesh10dulkar.blogspot.com/2017/07/blog-post.html ) ह्यावर आमच्या ग्रुप मार्फत काही करता येईल का हे मी पाहात होतो. त्यासाठी मी काही डॉक्टर्स सोबत चर्चा केली. काही सामाजिक संस्थांसोबत चर्चा केली. त्यानंतर एका निष्कर्षाप्रत मी पोहोचलो.

त्यातील आरोग्यासंबंधीचा मुद्दा मी आपल्या समोर मांडत आहे. सप्टेंबर महिन्यात आम्ही त्या विभागात एक आरोग्य शिबीर करणार आहोत. ह्या आरोग्य शिबिरात शाळेतील व गावातील इतर मुलांची तपासणी करण्यात येईल. त्याचे रेकॉर्डस् आमच्याकडे ठेवण्यात येतील. त्या रेकॉर्डस् नुसार तिथे एक फॉलोअप घेतला जाईल. त्यासाठी महिन्यातून एकदा डॉक्टर्स तिथे जातील आणि तपासणी करतील. काही मेजर आजार दिसला तर त्यांचे उपचार करण्यासाठी मदत करण्यात येईल. आरोग्य सोबतच त्या गावकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी काही वर्कशॉप्स, लेक्चर्स सुद्धा आम्ही करणार आहोत. साधारणतः मेडिकल ट्रीटमेंटला नकार हा ३ गोष्टींमुळे दिला जातो. १) अंधश्रद्धा, २) भीती आणि ३) उपचारांसाठी लागणाऱ्या पैशांची कमी. ह्यातील मुद्दा क्रमांक १ आणि २ ह्या दूर करण्यासाठी आपले लेक्चर्स, वर्कशॉप्स हे उपयोगी पडतील. तसेच मेडिकल ट्रीटमेंट नंतर जे काही लोक बरे होतील तसं त्यांच्या मनातून ह्या गोष्टी हळू हळू कमी होतील. पण ह्या गोष्टीला बराच वेळ द्यावा लागेल. राहिला मुद्दा क्रमांक ३, पैशांची कमतरता. आजूबाजूच्या विभागातले लोक हे दैनंदिन रोजावर काम करतात. वीटभट्टी वैगरे वरती ते कामाला आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे साधन हे अत्यंत कमी आहे. त्यासाठी म्हणून गावातील गरजूंना, विशेषकरून स्त्रियांच्या हाताला काम कसे मिळवून देता येईल ह्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरून त्यांनी बनवलेल्या वस्तूंना मुंबई, पुणे सारख्या शहरात मार्केट उपलब्ध करून देता येईल आणि त्यातून त्यांच्या उत्पन्नाची सुरुवात होईल. सुरवात हि अगदीच मोठी नसेल, पण काही दिवसातच हि लहानशी सुरुवात मोठी व्हायला वेळ सुद्धा लागणार नाही. 

हे काम आमच्या एका ग्रूपमार्फत करताना आम्हाला समाजातील विविध संस्थांची, व्यक्तींची गरज आहे. जे ह्या उपक्रमात आपापल्या परीने जी मदत करू शकतील ती मदत अपेक्षित आहे. आपण डॉक्टर असाल तर तुम्ही महिन्यातून १ दिवस (रविवार) ह्या कामासाठी देऊ शकता. आपण एखाद्या संस्थेचे सदस्य असाल तर संस्थे मार्फत आरोग्य शिबिराला मदत करू शकता. वैयक्तिकरित्या आपण आरोग्य शिबिरात होणाऱ्या, पुढील फॉलोअप मधील येणाऱ्या खर्चाचा वाटा तुमच्यापरीने उचलून, श्रमदान करून आम्हाला मदत करू शकता.

बाबा आमटेंचं एक फार सुंदर वाक्य ह्या निमित्त्ताने मला आठवलं. " निःस्वार्थ सेवा हा सामाजिक कार्याचा आत्मा असतो". आपली मदत हि आमच्यासाठी आणि त्यापेक्षाही जास्त समाजातील त्या दुर्बल घटकांसाठी अमूल्य असेल. आपल्याला आमच्यासोबत ह्या कार्यात सहभागी व्हायचं असेल तर मेसेजच्या शेवटी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.

धन्यवाद. 

प्रथमेश श. तेंडुलकर (चैतन्य मित्रमंडळ)
संपर्क :- ९८६९३७१५८० (Whatsapp वर उपलब्ध) / ७०३९४६४२९१

Sunday 23 July 2017

वृक्षवल्ली आम्हा सोयरी - २०१७...

#वृक्षवल्ली आम्हा सोयरी - २०१७...

चैतन्य मित्रमंडळातर्फे गेल्या 3 वर्षात अनेक उपक्रम करण्यात आले. त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे वृक्षारोपण. जुलै २०१६ मधे वात्सल्य ट्रस्टच्या व्रुद्धाश्रमाच्या जागेवर आम्बा, साग, वड अश्या एकूण ५५-६० झाडांचे रोपण आम्ही केले होते. हा आमच्या ग्रूप तर्फे केलेला पहिला वृक्षारोपण कार्यक्रम. तेव्हा सांगितल्याप्रमाणे वर्षभर आम्ही त्या झाडांची नीट काळजी घेतली आणि त्याचा परिणाम म्हणजे लावलेल्या झाडान्पैकी १००% झाडे जगली.

गेल्यावर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही ( चैतन्य मित्रमंडळ - बाळशिवाजी ग्रूप - स्वराज्य ग्रूपतर्फे ) २३ जुलै २०१७ रोजी वाशिन्द येथील रावतेपाडा येथील प्रगट वीघ्नेश माध्यमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जाम्भूळ, आम्बा, पारिजातक अश्या एकूण ५५ झाडांचे रोपण आम्ही केले. तीनही ग्रूप मिळून काम करतानाचा हा अनुभव खूप मस्त होता.

ह्या झाडांचे रोपण करताना एक अभिनव कल्पना आम्ही राबवली. प्रत्येक झाडाला शिवाजी महाराजांच्या एक एक गडाचे नाव आम्ही दिले. रोपण करताना आणि त्या आधी मुलांना प्रत्येक गडाबद्द्ल माहिती दिली गेली. गडांचा इतिहास आणि महत्व सांगण्यात आले. ह्याचा उद्देश एकच होता, तो म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास, गडकिल्ल्यांची माहिती एका पिढी कडून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहोचवणे आणि आपला वारसा, वैभव जतन करणे. गडकोट हे आपले वैभव आहे, महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. ह्याच गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मेसेज आम्ही लोकांना देण्याचा एक प्रयत्न केला.

वृक्षारोपण झाल्यावर पुढील उपक्रमाची आखणी व त्यावर चर्चा करण्यात आली. त्याबद्दल वेळोवेळी आपल्याला कळवले जाईलच. प्रत्येक उपक्रमात आमचा ग्रूप थोडा थोडा वाढतोय. प्रतिपदेचा चंद्र जसे कलेकलेने वाढतो तसंच चैतन्य मित्रमंडळ ह्या ३ वर्षात कलेकलेने वाढलय. सुरूवतीला १० हातांनी (५ व्यक्ती) होणारी मदत आज ३० हातांनी होतेय. ह्याच ३० हातांच बळ ३०० हातांच व्हावे म्हणून आपणही आमच्या उपक्रमात सहभागी व्हा ही नम्र विनंती.

सहभागी झालेल्या सर्व सहकार्याँचे मनापासून धन्यवाद. ह्यापुढेसुद्धा तुमची अशीच साथ मिळेल ही अपेक्षा. कोणाला आमच्या ग्रूप सोबत उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर मेसेजच्या शेवटी दिलेल्या नम्बर वर सम्पर्क करा.

चैतन्य मित्रमंडळ
सम्पर्क :- 9869371580 / 7039464291

*Please visit our fb page. Click on the link given bellow...

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/

Saturday 15 July 2017

दुर्दैव....

दुर्दैव....

चैतन्यचं काम करताना अनेक आदिवासी पाड्यांना भेट आम्ही देत असतो. त्या निमित्ताने आम्ही वासिंद जवळील रावतेपाडा येथे भेट देण्याचा योग्य आला. तिथल्या प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय येथे ई - लर्निंग सुविधा आम्हाला सुरु करायची होती. तेव्हा तिथल्या सरांकडून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीबद्दल मला समजलं. त्या मुलीला काहीतरी आजार झाला इतकंच मला समजलं होतं. मी माझ्या ओळखीतल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन यायला सांगितले. खरा प्रॉब्लेम तर इथून सुरु झाला होता. आदिवासी पाडा आणि तिथले लोक हे औषधं, डॉक्टर ह्यापासून चार हात नव्हे तर किंबहुना कोसो दूर असल्याचं आम्हाला दिसलं. कारण जेव्हा त्या मुलीच्या पालकांना त्या शिक्षकांनी डॉक्टरांकडे घेऊन जायची तयारी दर्शवली तेव्हा त्यांनी त्याला साफ नकार दिला. त्या विभागात फिरताना आम्हाला जवळपास एखादं हॉस्पिटल तर सोडाच पण साधा दवाखानासुद्धा दिसला नाही. सरकारी आस्थेच हे एक अपयशच म्हणावं लागेल. पण मुंबईसारख्या मेट्रोसिटी पासून काही किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा मूलभूत सुविधांचा अभाव हे सर्वांसाठीच लज्जास्पद आहे आणि सरकारसाठी जास्त.

आमच्या काही प्रयत्नांमुळे त्या मुलीचे पालक तिला के.ई.एम. हॉस्पिटलला घेऊन यायला तयार झाले. ९ जुलैला त्या मुलीचे पालक तिला घेऊन आले. तिची परिस्थिती बघवत नव्हती. तिचा एक पाय पूर्ण काळा पडला होता आणि ती वेदनेने कळवळत होती. ओळखीचे डॉक्टर तिथे होतेच. शाळेचे एक सर, आणि आमच्या ग्रुपचे मेम्बर्स तिथे प्रत्यक्ष हजर होते. डॉक्टरांनी ताबडतोब तिचं चेकअप केलं आणि त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या मी पुढे सांगेनच. पण तिला गँगरीन झाला होता आणि तो पसरला होता. तिचा पाय कापावा लागणार होता आणि पर्याय नव्हता. तिच्या पालकांनी ऑपेरेशन करायला साफ नकार दिला. डॉक्टरांनी त्यांना खूप समजावले आणि हे सुद्धा सांगितलं की जर हिच्यावर आता उपचार झाले नाहीत तर पुढील १५-२० दिवसात हिला जीव गमवावा लागेल. पण इतक ऐकून सुद्धा ते तयार झाले नाहीत. कारण त्यांचा डॉक्टर, हॉस्पिटल ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. शेवटी ते तिला घेऊन गेले घरी. आणि आज १५ जुलैला त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.

ह्या गोष्टीला जबाबदार कोण? त्या मुलीचे आई वडील? मूलभूत आरोग्य, शिक्षण न पुरवणारं सरकार? की त्यामुलीचं नशीब? कारण जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीचं चेकअप केलं तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी माझ्या समोर आल्या. त्या मुलीला गँगरीन झाला होता. आणि ह्या गोष्टीला १ महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलेला. आणि म्हणूनच ते विष त्या मुलीच्या शरीरात पसरत गेलं. मग एक महिना हे लोक करत काय होते? ह्या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न मी केला तेव्हा काही शक्यता समोर आल्या. त्या म्हणजे सगळ्यात आधी एखाद्या रोगाबद्दल तिथल्या लोकांचं असलेलं अज्ञान. दुसर म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव. तिसरं म्हणजे मूलभूत सोयी सुविधा जस आरोग्य सुविधांचा अभाव आणि जरी त्या उपलब्ध झाल्या तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या दळणवळणाच्या गोष्टींचा अभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा. लोक ताप खोकला ह्यासाठी सुद्धा बुवा-बाबाकडे जातात. स्वतःला पुरोगामी म्हणवणर्या आपल्या सर्वांसाठी ही एक चपराक आहे.

Whatsapp, फेसबुक ह्यासारख्या virtual जगात राहणाऱ्या आपल्या नेटकरी लोकांपर्यंत ह्या बातम्या क्वचितच पोहोचत असतील. अश्या कितीतरी मुली आपला जीव ह्यामुळे गमावत असतील. आता ह्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपतर्फे जे जे जमेल ते ते करणार आहोत. कारण निदान रावतेपाडा विभागात तरी पुन्हा कोणाची अशी अवस्था होऊ नये अशी अपेक्षा आहे. ह्याला आपण एक लढा म्हणू शकतो. हा लढा कुठल्या व्यक्ती विरुद्ध किंवा सरकार विरुद्ध नाही. हा लढा आहे विचारांचा. आपले विचार त्यांना पटवून देण्याचा. हे काम करताना, हा विचारांचा लढा लढताना, ह्या कामात आम्हाला आपल्या मदतीची सुद्धा गरज लागेल. निदान आत्तातरी ह्या व्हर्च्युअल जगातून बाहेर येऊया आणि सर्वांनी मिळून एक विचाराने ह्यासाठी काम करूया.

आमच्या चैतन्य ग्रुपची लिंक मी शेवटी देत आहे. ज्यांना आमच्या ग्रुप सोबत काम करायचे आहे किंवा आपले काही सजेशन असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. वाट बघतो आहे.

प्रथमेश श. तेंडुलकर
९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१

https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel

Saturday 29 April 2017

कुणी तूर घेता का रे तूर...


नटसम्राट नाटकात परीस्थीतीने गांजलेला आणि दैवाने साथ सोडलेला नट अगतीकतेने "कुणी घर देता का रे घर" असे विचारत फिरताना आपण पाहिलंय. तसच आधी आसमानी आणि आता सुल्तानी संकटाने ग्रासलेला आमचा शेतकरी "कुणी तूर घेता का रे तूर..." असा प्रश्न विचारतो आहे. निसर्ग कोपला की आसमानी संकट येते, ज्या संकटातून शेतकरी आधीच भरडला जात होता आणि आता निसर्गाने भरभरून दिलं तर आता सुल्तानी संकटात अडकला आहे.

आपल्याला आठवत असेल तर पहा, गेल्याच वर्षी तूरीचे भाव गगनाला भीड़ले होते. बाजारातून तूर गायब झाली होती. काही व्यापारांनि साठेबाजी करून क्रूत्रिम तूट निर्माण केली होती. मग सरकारने छापे घालून साठे बाहेर काढले आणि काही प्रमाणात तूर आयात केली तेव्हा कुठे तूरीचे दर काहीसे नियंत्रणात आले. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना तूरीचे उत्पादन घेण्यास प्रोत्साहित केले होते. त्याच सोबत तूर आयात सुद्धा केली. पण ते करताना ह्या वर्षी तुरीच उत्पादन किती होईल ह्याचा अंदाज घेण्यात सरकारी यंत्रणा पूर्णपणे निरुपयोगी ठरली. त्याचाच परिणाम तूर खरेदीवर झालेला दिसतोय. गेल्यावर्षी साधारणतः ४४ लाख क्विन्टल तूरीच उत्पादन घेण्यात आल होत आणि ह्यावर्षी तेच उत्पादन साधारण २०० लाख क्विन्टल इतक झालं. म्हणजेच गेल्यावेळेपेक्षा ५ पट जास्त. आता इतक उत्पादन झालं म्हणून शेतकरी आनंदाने तूर विकायला गेला पण तूरीचे भाव गडगडले. ९०००रु चा भाव मिळेल ह्या आशेवर गेलेला शेतकऱ्यांच्या हाती ३५००रु ची कोय ठेवली व्यापार्याँनी. ज्यांच्याकडे साठवून ठेवायला जागा होती त्यानी नंतर भाव वाढेल म्हणून तूर साठवली पण ज्यांच्याकडे जागा नव्हती त्यांनी कवडिमोल भावाने विकली. सरकारने आधीच तूर आयात केलेली असल्याने सरकारकडे सुद्धा साठवायला जागा नाही. त्यामुळे नाफेडच्या बाजारात जरी भाव ५०५०रु असला तरी तूर विकली जात नाही आहे.

ह्यावर्षी तूरीच किंवा इतर पिकांच उत्पादन किती होईल आणि जास्त झालंच तर साठवण करण्याची क्षमता किती आहे ह्याचा अंदाज घेण्यात सरकारी यंत्रणा सपशेल कुचकामी ठरल्या आहेत. आणि त्याचा फटका आज तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. भाव मिळत नाही म्हणून शेतकरी जेव्हा आपल उभ पीक जाळतो तेव्हा सरकारच्या नावाने एक दिवस सूतकच पाळत असतो हे सरकारला कधी कळणार ? निसर्गाने भरभरून दान दिले असताना सरकारी सहाय्य शेतकऱ्यांना मिळाले तर हे प्रश्न नक्कीच सुटू शकतात. ते सोडवण्याची इच्छाशक्ती सरकार कडे नक्कीच आहे. पण ती प्रत्यक्षात येईल का ? हा खरा प्रश्न आहे. नाहीतर हे शेतकऱ्यांसाठी तरी "अच्छे दिन" म्हणता येणार नाहीत.

प्रथमेश श. तेंडुलकर