Wednesday 29 May 2019

हा ABP, माझा नाही..

हा ABP, माझा नाही..

भारताच्या स्वतंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची किंमत स्वातंत्र्योत्तर भारतात किती आहे? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे ABP माझावरील २८ मे रोजी झालेली चर्चा. २८ मे म्हणजे स्वतंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. कदाचित २ ऑक्टोबर इतकी फेमस नसल्याने कुठल्याही वृत्तपत्रात त्याची बातमी नसेलच हे अपेक्षितच होतं. कारण सावरकर म्हटलं की या कणा नसलेल्या लोकांच्या लेखण्या खुंटतात आणि तोंडं सुटतात आणि हाच प्रकार केला ABP माझाने. सावरकर - नायक की खलनायक? यावर एक चर्चा आणि प्रसन्न जोशी सारखे पत्रकार असले की समजून जायचं की चर्चा एकांगी होणार. प्रसन्न सोबत नम्रता वागळे पण होत्या पण "नमस्कार मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या माझा विशेष मध्ये आपलं स्वागत आहे... etc एवढंच बोलण्यापुरतं त्यांचा सहभाग होता. असो तो मुद्दा नव्हे. मुद्दा हा की एबीपी माझाला या चर्चेसाठी जो मुहूर्त मिळाला त्याचं टायमिंग आणि कार्यक्रमाचे मुद्दे.

आज एबीपी माझा म्हणतंय की "कार्यक्रमातून सावरकरांचा अपमान करायचा हेतू नव्हता, सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणं हा उद्देश नव्हता इ." मूळातच कार्यक्रमाच्या शीर्षकातूनच (सावरकर - नायक की खलनायक) सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेतला गेला. जर एबीपी माझाने सावरकरांचे कार्य दाखवणारे कार्यक्रम दाखवले होते आणि त्यांच्या मनात सावरकरांच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंका नव्हती तर "नायक की खलनायक" हे शीर्षक का? आणि यातून शंका उत्पन्न करायची नव्हती? आणि जर एबीपी माझाच्या (प्रसन्नच्या किंवा त्यांच्या इतर पत्रकारांच्या) मनात शन्का होती तर त्यांनी ती शंका सावरकर वाचून दूर करायला हवी होती, त्याचा जहीर कार्यक्रम घेण्याची काय गरज? कोणत्या प्रेक्षकाने एबीपी माझाकडे मागणी केली की "भौ आमची माहिती अपूर्ण आहे तर कार्यक्रम घेऊन पूर्ण करा.''? जर अशी कोणती मागणी नाही, तुम्हाला शंका घ्यायची नव्हती (जाहीर केलेल्या पत्रकाप्रमाणे), तर असा जाहीर कार्यक्रम घेण्याची गरजच नव्हती.

दुसरा मुद्दा. कार्यक्रम सावरकरांवर होता ना? मग सावरकर नायक की खलनायक हा प्रश्न विचारत प्रसन्न जोशी शेवटी हिंदूराष्ट्रवाद या त्याच्या आवडत्या विषयाकडे वळला आणि भाजपच्या प्रवक्त्याला "तुम्ही हे मान्य करा की त्यांचा हिंदुत्ववाद, हिंदूराष्ट्रवाद तुम्हाला मान्य नाही की मान्य आहे.." मुळात कार्यक्रम सावरकरांच्या विषयाचा असताना भाजपाच्या प्रवक्त्याला हा प्रश्न का विचारला गेला? याचं उत्तर एबीपी माझा ने द्यावं. आणि जेव्हा स्वतः गांधीवादी प्रवक्ते सावरकरांच्या हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना जे बरोबर बोलले ते ऐकून सुद्धा त्याविरुद्ध प्रश्न हिंदुत्ववादी प्रवक्त्याला प्रसन्न जोशी एकांगीपणे विचारत असताना एबीपी माझाला सावरकरांच्या कोणत्या कार्याचा आदर करायचा होता?

आज पत्रक काढून त्यावर आपली बाजू मांडणाऱ्या एबीपी माझाने असाच कार्यक्रम २ ऑक्टोबरला घेण्याची हिंमत करावी. कारण जसे काही लोक सावरकर आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत तसेच काही जण गांधीवाद न मानणारे सुद्धा आहेत, म्हणून त्याचीही "चिकित्सा" एबीपी माझाने जाहीर कार्यक्रम घेऊन करावी. आणि प्रसन्न जोशीने एकाच प्रश्नाच उत्तर द्यावं की जर तू फक्त अहिंसाच परमोधर्म मानतो तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःचे बलिदान देणाऱ्या भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांचे योगदान तुम्ही अमान्य करणार का? कारण भारताला स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालं नाही हेही तितकंच सत्य आहे.

असल्या टुकार चर्चा बघितल्या की आपल्या क्रांतिकारकांच्या बलिदानाकडे बघून कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवतात,

नाचविता ध्वज तुझा, गुंतले शृंखलेत हात..
तुझ्या यशाचे पवाड गाता, गळ्यात ये तात..
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार,
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर..
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार,
आई वेड्यांना आधार..
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार..!

या ओळींनीसह सर्व क्रांतिकारकांना वंदन करून या लेखाचा शेवट करतो. जय हिंद.

प्रथमेश श. तेंडुलकर