Saturday 12 June 2021

World Child Labor Dayच्या निमित्ताने...

World Child Labor Dayच्या निमित्ताने

१२ जून हा जागतिक बालकामगार विरोध दिन. हा दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं 19 वर्षापूर्वी पुढाकार घेतला. 14 वर्षाच्या आतील बालमजूरी संपवणे आणि त्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघटना कार्यरत आहेत. आजही जगभरात, विशेषकरुन भारतासारख्या विकसनशील देश आणि इतर मागासलेल्या देशात बालमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या देशांत बालकामगार विरोधी कायदे झाले असले तरी बालमजुरांच्या संख्येत म्हणावी तितकी घट झाली नाही. त्यावर जगभरात जागरुकता निर्माण करण्यासाठी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे.

मूळात बालकामगार निर्माण का होतात? इथपासून या विषयाचा विचार करण्याची गरज आहे. ज्या वयात चांगलं शिक्षण मिळण्याची गरज असते त्या वयात अनेकदा मेहनतीची कामं या मुलांना करावी लागतात. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी माझ्या समोर आली. दोन विद्यार्थी, एक सहावीला आणि एक आठवीला. काही वर्षांपूर्वी आपले वडील गमावले आणि आई मूक-बधिर असल्याने लहानसहान कामं करायची. त्यातच कोरोनामध्ये त्यांच्या आईचं कामही बंद झालं. लहान असले तरी घरातली परिस्थिती त्यांच्या समोर होती. तीन महिन्याचं घराचं भाडं थकलेलं, घरात पुरेसं रेशन नाही, म्हणून या दोघांनी कामं करायला सुरवात केली. एक हॉटेल मधून चहा वेगवेगळ्या दुकानात नेऊन द्यायचा आणि दुसरा बिल्डींग मध्ये साफसफाई करायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशातून यांच्या घराला थोडाफार हातभार लागायचा. ही घटना मला त्यांच्या एका शिक्षिकेकडून समजली. सर्वात आधी सर्व शिक्षकांनी मिळून त्यांचं घरभाडे दिले. मग चैतन्यतर्फे त्यांच्या घरी आम्ही किराणा साहित्य घेऊन गेलो होतो, मुलांना भेटलो, त्यांची प्रगती पुस्तकं बघितली. त्यानंतर त्या मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. इयत्ता दहावी पर्यंत दोघांनाही आम्ही चैतन्यच्या माध्यमातून मदत करणारच आहोत पण पुढील शिक्षणासाठीही साहाय्य करणार आहोत.

ही दोन मुलं म्हणजे एक उदाहरण आहे. मुळात गरिबीचं चक्र तुटायला मदत शिक्षण करतं. वेगवेगळ्या खेड्यात, आदिवासी भागात काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मुलांचे आई-वडील शिकलेले नसतात, त्यामुळे उत्पन्नाची साधनं मर्यादित आणि त्यामुळेच शिक्षणाबाबतची अनास्था. या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन हे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायच्या ऐवजी कामावर घेऊन जातात. तिथे पैसेही मिळतात आणि थोडफार खायलाही मिळतं. पण मुळातच हे चक्र काही संपत नाही. हे चक्र संपवण्यासाठी या मुलांना योग्य शिक्षण मिळणं गरजेचं आहे.

चैतन्यतर्फे काम करताना आम्ही याच गोष्टींवर विशेष लक्ष देत आहोत. योग्य वयात योग्य शिक्षण मुलांना कसं मिळेल, त्यांना सकस आहार कसा मिळेल, शैक्षणिक सोई सुविधा कशा मिळतील याकडे आम्ही लक्ष देतो. जेणेकरून ही मुलं व्यवस्थित शिकतील आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटेल आणि त्यामुळेच त्यांच्या येणाऱ्या पिढीला कामावर घेऊन जायच्याऐवजी ते त्यांना शिकवू शकतील. एकदा हे चक्र तुटलं की बालकामगार कमी होण्यासाठी मदतच होईल.

प्रथमेश श. तेंडुलकर
संस्थापक - चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशन

On the occasion of World Child Labor Day

On the occasion of World Child Labor Day

12 June is World Child Labor Protest Day. The International Labor Organization took the initiative 19 years ago to celebrate this day. The purpose of this day is to end child labor under the age of 14 and give those children their right to education. Many organizations are working nationally and internationally to help children achieve their childhood. Even today, child labor is rampant all over the world, especially in developing countries like India and other backward countries. Although anti-child labor laws have been enacted in these countries, the number of child laborers has not declined significantly. World Anti-Child Labor Day is being celebrated on June 12 to create awareness around the world.

We have to think on the Question of "Why are child laborers created?" At an age when they need to get a good education, these children often have to work hard. A similar incident occurred to me a few months ago. Two students, one was in std. sixth and one was in std. eighth. They lost their father a few years ago, and their mother unable to speak & hear. She lost her job in Covid. Though they are small, the situation at home was in front of them. The rent for the house was exhausted for three months, there was not enough ration in the house, so both of them started working. One would take the tea from the hotel to different shops and the other would clean the building. The money earned from it helped his family a little. One of their teachers told me about this. First of all, all the teachers paid their rent together. Then we took groceries to their house, & then we met the children, saw their progress books. We then decided to take care of those children academically. We are going to help both of them till their SSC & also for further education.

Basically education helps to break the cycle of poverty. In different villages, while working in tribal areas, one thing we realizes that the parents of the children are not educated, so their income are limited and hence its create the apathy towards education. As a result of all this, their parents take their children to work instead of sending them to school. There they get money and some food. But basically this cycle never ends. These children need to get proper education to end this cycle.

These are the things where we are paying special attention to them while working for Chaitanya Social Welfare Foundation. We pay attention to how children get the right education at the right age, how they get a healthy diet, how they get educational facilities. So that these children can learn properly and understand the importance of education and that is why they will educate their children instead of taking them to work for the next generation. Once this cycle is broken it will only help to reduce child labor.

Prathamesh S. Tendulkar

Founder - Chaitanya Social Welfare Foundation

Saturday 29 May 2021

स्वातंत्र्यवीर...

स्वातंत्र्यवीर...

काल २८ मे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती. त्याच्या १ दिवसांनंतर ही पोस्ट फेसबूकवर लिहिण्याचं कारण असं विशेष नाही पण काही विरोधी आणि अनेक सावरकर समर्थनार्थ पोस्ट वाचल्या आणि वाटलं उत्तर द्यावं.

छत्रपति म्हणताच जसे शिवराय आठवतात, लोकमान्य म्हणताच टिळक दिसतात तसेच स्वातंत्र्यवीर, हे नाव घेताच डोळ्यासमोर उभे राहतात ते सावरकर. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी जी स्वातंत्र्याची मशाल पेटवली त्या मशालीने ब्रिटिशांना होरपळून काढायचं काम सावरकरांनी केले. अखंड हिंदुस्तानचा पुरस्कार करणारे सावरकर हे त्यावेळी देशातील एकमेव नेते होते. हिंदुत्व हा जरी श्वास असला तरी सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि हाच फरक आजही अनेक आमच्या लोकांना कळला नाही याचं दुःख आहे. कर्मकांडापेक्षा देशसेवा हा धर्म त्यांनी मानला. "निश्चल देहाकडून देवाकडे जातानाच्या वाटेवर मधे माझा देश येतो, माझी मातृभूमी येते आणि तीची सेवा हाच माझा धर्म" या एका वाक्यातून सावरकर समजतात.

सावरकर वाचताना अनेक पैलू समोर येतात. मुळातच जहाल मतवादी असलेले सावरकर उत्तम लेखक आणि कवी होते. जहाल वाणी असलेला माणूस कविता पण करू शकतो हे विलक्षण. स्वातंत्र्यदेवतेचे गीत असो वा ने मजसी ने सारखी कविता, प्रत्येक शब्दातून देशभक्ती ओसंडून वाहते. स्वातंत्र्यदेवतेचे गीत ऐकताना अजूनही अंगावर शहरा येतो यातच सर्व येतं. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांना हेही माहीत होतं की देशाची फाळणी झाली तर स्वातंत्र्य मिळणे अवघड होईल. आपल्या लोकांनी कसं एकत्र राहिलं पाहिजे आणि एकजुटीने कसा लढा द्यावा हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधे स्पष्ट होतं. हिंदुत्व म्हणजे धर्मांध नव्हे, हिंदुत्व म्हणजे इतर धर्मांचा तिरस्कार नव्हे हे विचार मांडणारे सावरकर आजच्या लोकांना कळालेच नाहीत. विज्ञानाची कास धरल्या शिवाय पुढे आपली प्रगती होणार नाही हा सिधांत मांडणाऱ्या सावरकरांचे नाव आजचे नेते फक्त राजकारणासाठी घेतात.

सावरकर म्हटले की आठवते ती जगप्रसिद्ध उडी. पण सावरकर विरोधकांना दिसतात ते माफीनामे. सावरकरांनी तुरुंगातून लिहिलेले माफीनामे. पण आम्हाला वरवर बघायची सवयच आहे म्हणा, त्या मागचं राजकारण आम्ही बघत नाही. पण माफीनामे देऊन सुद्धा सावरकरांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला याचाच अर्थ माफीनामे ही एक खेळी होती. शिवरायांनी सुद्धा मस्तवाल अफजलखानाला अनेक पत्रं लिहिली होती ज्यातून शिवाजी महाराज खानाला घाबरले असा संदेश त्यांना द्यायचा होता पण खरंच ते घाबरले होते का? तर नाही. खानाला आपल्या टप्प्यात खेचण्यासाठी खेळलेली ती एक खेळी होती. इतका सारासार विचार करण्याची बौद्धिक क्षमता विरोधकांकडे असेल असे वाटत नाही.

ऐन तारुण्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेला सामोरे जाणाऱ्या सावरकरांवर जेव्हा अर्धवट माहितीच्या आधाराने आजचे काही तरूण टीका करतात तेव्हा त्यांना सावरकरांची महती एकाच वाक्यात सांगवी वाटते. गर्लफ्रेंडसाठी कविता करण्याच्या आणि पत्रं लिहिण्याच्या वयात सावरकर देशभक्तीपर कविता लिहीत होते. जेवढं आपलं वय नाही तेवढी वर्ष सावरकरांनी देशासाठी तुरुंगात शिक्षा भोगली आहे. आणि स्वतःला सावरकरवादी म्हणवणार्या माझ्या मित्रांनी एकदा सावरकर वाचून समजून घ्यावे. कारण "स्वातंत्र्यवीर" हे डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे.

धन्यवाद
प्रथमेश श. तेंडुलकर

#सावरकर #स्वातंत्र्यवीर

Friday 30 April 2021

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...

महाराष्ट्र, 1 मे हा महाराष्ट्र दिन, ज्यादिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिकांना मिळाला. यासाठी प्रचंड मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला.

महाराष्ट्राला फार जुना इतिहास आहे. एखाद्या राज्याच्या नावातच "राष्ट्र" असं उल्लेख असलेला महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य आहे. महाराष्ट्र या शब्दाचाच मुळात अर्थ हा की महान राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे असं राज्य की ज्या राज्यात राष्ट्रीयत्व समावण्याची क्षमता आहे. राष्ट्रावर, म्हणजेच हिंदुस्थानावर जेव्हा जेव्हा संकटं आली, परकीय आक्रमकांनी हल्ला केला तेव्हाही महाराष्ट्र सर्वात आधी राष्ट्राच्या संरक्षणार्थ मदतीसाठी गेला. महाराष्ट्राला जसा गौरवशाली इतिहास आहे तशीच साधू संतांची, मराठी साहित्याची मोठी परंपरा आहे. पण महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कधी रूढ झालं असावं? याचा विचार केला तर इतिहासात फार पूर्वीपासून "महाराष्ट्र" हा शब्द रूढ झाला होता आणि वापरला गेला आहे.

इसवीसन ५५० ते ७५३ पर्यंत महाराष्ट्रावर चालुक्यांनी राज्य केले. चालूक्योदय काळात “महाराष्ट्र” ही संकल्पना रूढ होत होती. पुढे महाराष्ट्र हाच शब्द रूळला गेला, ते चालुक्यांच्याच नंतरच्या काळातील शिलालेखावरून कळते. इ. स. १००८ मधिल सीताबर्डी येथिल स्तंभात चालूक्य राजा सहावा विक्रमादित्य याचा मांडलिक असेलेला नागपुर प्रांताचा  महासामंत स्वतःला “महाराष्ट्रकूट” म्हणवून घेतो. 

इ. स. ६३४, ऐहोळे येथिल लिहिलेल्या/कोरलेल्या शिलालेखात एक श्लोक आहे ज्यात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख येतो.

“अगदमदधिपतित्वं यो महाराष्ट्रकाणाम्।
नवनवतिसहस्त्रग्रामभाजां त्रयाणाम्।।" 

अर्थ: चालुक्यांचा राजा दुसरा सत्याश्रय पुलकेशी  हा तीनही महाराष्ट्रांचा सार्वभौम राजा झाला.

या श्लोकावरून दोन गोष्टी कळतात, एक तर महाराष्ट्र हा शब्द तेव्हा प्रचलित होता आणि त्यात तीन खंडमंडळे होती. आता ही तीन खंडमंडळे कोणती तर,
अपरांत - दंडकारण्य - म्हणजेच आजचे विदर्भ
कोकण - देश - वऱ्हाड होय.

याचाच अर्थ हा की मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिकांच्या राज्याचे "महाराष्ट्र" हे नाव साधारण ३००० वर्षांपासून नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहे. १ मे १९६० रोजी आपल्या राज्यास भारतीय संघराज्य शासनातर्फे अधिकृत मान्यता मिळाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आम्हाला मिळाला.

जय महाराष्ट्र.

प्रथमेश श. तेंडुलकर

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

संदर्भ - मराठी आमुची मायबोली.

#महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #मराठी

©prathameshtendulkar2021

Saturday 24 April 2021

"तेंडुलकर" नावाचा ब्रँड

"तेंडुलकर" नावाचा ब्रँड

सचिन तेंडुलकर, हे एक नाव नाही, हा एक ब्रॅंड आहे. माझ्या लहानपणी एखाद्याच नाव सचिन असेल आणि त्याला क्रिकेटची आवड असेल तर त्याला आमच्या Areaचा सचिन तेंडुलकर ह्या नावाने गौरवले जायचे. योगायोगाने माझ अडनाव सुद्धा तेंडुलकर असल्याने शाळेत असो वा कॉलेजमधे सगळीकडे Center of Attraction चा विषय असायचा. मग सचिन तुझा कोण रे? नातेवाईक का? असे अनेक प्रश्न विचारले जायचे. त्याची एक सवयच लागली नंतर मला. किंबहुना सचिनशी माझ नाव कोणत्यातरी कारणाने जोडलं जातंय या विचारानेच आपली "कॉलर टाईट" असायची.

अस म्हणतात की, "भारतात क्रिकेट हा जर धर्म असेल तर सचिन हा त्या धर्माचा देव आहे." माझे आई-वडील सुनील गावस्कर, कपिल देव, चेतन शर्मा, दिलीप वेँगसरकर "ह्यांना आम्ही खेळताना पाहिले" असं अभिमानाने सांगतात पण आम्ही गर्वाने सांगतो की, "आम्ही सचिनला खेळताना पाहिलं आहे." जेव्हापासून क्रिकेट हा खेळ समजायला लागला तेव्हापासून मी सचिनला खेळताना पाहिलंय. परिस्थिती कुठलीही असो, भारत जिंकणार याची एकमेव आशा म्हणजे सचिन. सचिन आउट झाला आणि वाटायच की,"गेली मॅच अता." सचिन बाद झाला की मग टीव्ही पटापट बंद व्हायचे कारण आता कोणाचा खेळ बघायचा? बघण्यासाठी उरलंच काय? हा प्रश्न नेहमी पडायचा. काय जादू होती ह्या माणसात काय माहीत पण त्याचा खेळ बघताना मजा यायची. सचिन आउट झाला की वाटायच आपणच हरलोय. सचिन ने शतक केलं की वाटायचं आपणच काहीतरी मोठ केलंय. त्याच्या बॅट मधून निघालेला प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार म्हणजे आम्हा सचिनवेड्या लोकांसाठी पर्वणीच असायची. सचिनची प्रत्येक खेळी ही प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी पर्वणी होती. एकदा वसीम अक्रमने एका मुलाखतीत म्हटलं की, "सचिनचं मैदानावरचं असणं हेच विरोधी संघाला भीतीदायक वाटायचं". हे वाक्य वाचताना मला सचिन महाभारतातल्या श्रीकृष्णासारखा वाटतो. म्हणजे कौरावांकडे लाखाची सेना आणि पांडवसैन्यात एकटा श्रीकृष्ण. सचिन शेवटपर्यंत मैदानावर असेल तर आपण नक्की जिंकू अशी आशा प्रत्येकाला असायची आणि विरोधी संघाला हरण्याची भीती. कधीकधी एखादा आजारी माणूस जर मरणासन्न अवस्थेत असेल तर डॉक्टर सुद्धा बोलतात की हे आता देवाच्या हाती आहे तसंच आमची मॅच हरायला आली की यातून फक्त सचिनच मॅच वाचवू शकतो, अशी काही प्रमाणात वेडी आशा आम्हाला असायची.

सचिनचा फक्त खेळच उत्कृष्ट होता असं नाही. त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या नम्र आणि शांत स्वभावाने त्याने त्याच्या विरोधकांना सुद्धा जिंकलं होत. आपण अनेकदा बघितलं आहे की अनेक दिग्गज पंचांच्या चुकीच्या निर्णयावर भर मैदानात चिडले आहेत. कोहली पासून ते कॅप्टन कूल धोनी सुद्धा पंचांसोबत भिडला. पण चुकीच्या निर्णयांचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो सचिनला. तब्बल ३९ वेळा सचिनला चुकीच्या निर्णयांचा फटका बसला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना जेव्हा एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला माघारी यावं लागतं तेव्हा काय वाटतं हे एखादा मनापासून क्रिकेट खेळणाराच सांगू शकतो. पण अनेकदा असं होऊनसुद्धा पंचांच्या निर्णयाचा आदर करत सचिनने ते सर्व निर्णय मान्य केले. यावरूनच कळतं की सचिन किती शांत असेल. एकदा ब्रेट लीच्या (ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज) गोलंदाजीवर ब्रेट ली कडून चुकून एक बॉल हातातून निसटून जोरात सचिनच्या खांद्यावर आदळला. चूक सचिनची नव्हती, चुकून तो बॉल निसटून सचिनला लागला. असं वाटलं की सचिन आता ब्रेट लीला रागात बोलतो की काय, पण पुढच्याच क्षणाला सचिनने ब्रेट ली सोबत हात मिळवला आणि खेळ पुन्हा सुरु झाला. त्याच्या शांत असण्याचं यापेक्षा वेगळं उदाहरण नको सांगायला.

माणूस म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीला देवपण सहज मिळत नाही, ते मिळवावं लागतं. सचिनने ते आपल्या कर्तुत्वाने मिळवले आहे आणि ही काही सामान्य गोष्ट नव्हे. मला सामाजिक विषयाकडे आकर्षित करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे सचिन. कॉलेजमध्ये असताना सतत कानावर यायचं की सचिन इतक्या गरीब मुलांचा शिक्षणाचा खर्च करतो, सचिन इतर काही सामाजिक कामं करतो, तेव्हा त्याच्यासारखं काहीतरी काम आपणही करावं अशी इच्छा मनात ठेऊन मी या क्षेत्रात उतरलो. आज सामाजिक क्षेत्रात कामं करणाऱ्या ज्या व्यक्तींना मी आदर्श मानतो त्यात सचिन एक आहे. मैदानावर संघ अडचणीत असताना मदतीला धावून जाणारा सचिन वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक गरजूंच्या मदतीला धावून गेला आहे. गरीब मुलांच्या शिक्षणापासून ते एखाद्या गावात वीज नेण्यासाठी सचिन नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे.

पण हे देवपण मिळताना अनेक कठीण प्रसंगांतून सचिन जाऊन आला. स्वतःचे वडील वारले असताना सुद्धा जो व्यक्ती वर्ल्डकप मधे सेंचुरी करून भारताला पुढे नेऊ शकतो ह्यातून त्याची त्याच्या खेळाविषयीची श्रद्धा दिसते. कुठल्याच आलोचकाला तोंडाने उत्तर न देता आपल्या खेळाने उत्तर देणाऱ्या सचिनचा आदर्श सर्वांनी घ्यावा असा आहे. स्वभावात नम्रता आणि खेळातील प्रामाणिकपणा ह्या सचिनच्या जमेच्या बाजू. आणि कोणत्याही प्रसंगात चेहऱ्यावर स्मितहास्य ही तर सचिनची खासियत. कुठलाही गाजावाजा न करता अनेक गरीबांना मदत करणारा, सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारा सचिन हा प्रत्येकासाठी आदर्शच म्हणावा असा आहे.

करोडो लोकांच्या अपेक्षा खांद्यावर घेऊन देशासाठी खेळत राहणं, त्यात प्रत्येकाला सेंच्युरीने आनंद द्यायचा आणि त्याचं प्रत्येक आउट होणं करोडो लोकांच्या मनाला चटका लाऊन जायचं. आजकाल लोक स्वतःच स्वतःला अनेक उपाधी लावून घेतात पण लोकांनी देवपण बहाल केलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेटच्या देवाचा आज वाढदिवस, वाढदिवसाच्या सचिनला खूप शुभेच्छा.

प्रथमेश श. तेंडुलकर

#sachintendulkar