Monday 15 December 2014

वात्सल्य, चैतन्य आणि मी…

आज एका वेगळ्या विषयावर Blog  लिहिण्याची संधी मळते आहे… सामाजिक कार्य (social work ) हा काही जणांचा चेष्टेचा विषय असतो आणि काहींच्या तो खूप जवळचा विषय असतो… काहींना वाटत कि एका विशिष्ट वयात हे काम करायचं असत पण माझा मते काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वयाची नाही तर इच्छेची गरज असते… अनेकांचा असाही गैरसमज असतो कि सामाजिक काम म्हणजे काही पैसे donate करणे म्हणजे सामाजिक कार्य…  माझामते हे पूर्णपणे चूकहि नाही आणि पूर्ण बरोबर हि नाही… सामाजिक काम २  प्रकारे करता येऊ शकत, १ वेळ देऊन आणि २ वेळ नसल्यास आर्थिक मदत करून…


हल्लीच आम्ही ( मी आणि माझ्या चैतन्य group मधल्या सर्वांनी) मुंबईत एका अनाथालयाला भेट दिली… वात्सल्य trust अस नाव त्या संस्थेच… माझ्या  आयुष्यातील एखाद्या अनाथालयाला भेट हि पहिलीच… तिथे जाउन काय करायचं, कोणाला भेटायचं कस वागायचं असे अनके प्रश्न घेऊन (सोबत group सुद्धा घेऊन) आम्ही तिथे पोहोचलो… सकाळी १०:३० वाजता तिथे पोहोचलो, आधी contact केल्या असल्यामुळे  तिथल्या काही लोकांना आम्ही येणार हि कल्पना होतीच… तेव्हा तेथील एका madamनी आम्हाला त्यांचासोबत घेऊन गेले आणि तेथील सर्व काम दाखवल… प्रत्येक वयोगटातील मुलांची खोली (रूम्स ) वेगळ्या होत्या…अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या लहान  मुलांपासून ते अगदी ८-९ वर्षाच्या मुलांपर्यंतची सोय तिथे होती… नुसती राहण्याची आणि जेवणाचीच नाही तर अगदी त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी तिथे घेत होते… पण वात्सल्य च काम तिथेच सीमित नाही तर त्यांनी मुलींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल सुरु केली आहे… नर्सिंग पासून ते अगदी ग्लास पेंटिंग पर्यंत वर्ग तिथे भरवले जातात आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याच हे एक महत्वाच पाउल आहे… असे बरेच उपक्रम तिथे राबवले जातात…

त्याची माहिती घेत घेत आमचे २ ते ३ तास कसे गेले हे मलाही कळल नाही… मग आम्हाला तिथे वात्सल्यचे trustee सराफ काकांना भेटण्याची संधी मिळाली… आमच्या उपक्रमाच कौतुक तर त्यांनी केलच पण "हे सगळ तुमचच आहे" अस सांगून त्यांनी आपण सर्व एका कुटुंबातील आहोत ह्याची जाणीव करून दिली…

३-४ तासांचा हा एक नवीन अनुभव घेऊन आम्ही तिथून बाहेर आलो ते पुढे काय करायचं ह्या विचारानेच… वात्सल्य visit हि कुठल्याही पिकनिक किंवा ट्रेक पेक्षा एक वेगळा आणि छान अनुभव होता… आजकाल कोणी आपल्या माणसांसाठी कोणी इतक करत नाही तिथे वात्सल्य सारखी संस्था हे चांगल काम करते आहे… माझ वैयक्तिक मत विचारलं तर अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम ह्यांची गरजच पडू नये…  मी ज्या लहान मुलांना पाहिलं ती तर इतकी गोंडस होती कि त्यांना सोडायची इच्छा त्या आई - वडिलांना तरी कशी होते हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही… आपल्या चुकांची शिक्षा त्या लहान मुलांना का द्यावी? असे अनेक प्रश्न नव्याने माझ्यासमोर आले पण वात्सल्य सारख्या संस्था आहेत तो पर्यंत ह्या मुलाचं भविष्य अंधकारमय नाही हे सुद्धा खर आहे…



"वात्सल्य म्हणजे एका आईच आपल्या मुलासाठीच असलेल निस्वार्थी प्रेम…" ह्या मुलांना देखील आईच्या प्रेमाची उब वात्सल्य मध्ये मिळते आहे आणि त्यात आमची मदत होते आहे हे आमच भाग्य आहे… देवाच्या कृपेने हि मदत अशीच सुरु राहील आणि आपली साथ सुद्धा माझ्या ह्या कामात मिळत राहील हि अपेक्षा…

आपला,

प्रथमेश तेंडूलकर

Thursday 11 December 2014

खानाच्या फौजेतील मराठी सरदार…?

आज ह्या विषयावर लिहिण्याचं कारण एकच… काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी          ( आणि विकासासाठी ) २ "मित्र" पक्ष एकत्र आले… विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर तुफान हल्ला चढवणारे आज मात्र एकत्र आहेत… तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरताना आणि अनेक कट्टर समर्थक असलेल्यांच्या भावना पाहताना अनेक गोष्टी लक्षात आल्या त्या आपल्या समोर मांडण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न…

अनेक दिग्गजांनी एकत्र येउन केलेली आणि हिंदुत्व हा समान धागा पकडून असलेली अनेक वर्षांची युती विधानसभेच्या निवडणुकी आधी काही दिवस संपली… युती तुटू नये हि अनेकांची भावना होती कारण पक्षांचे कार्यकर्ते युतीत मानाने एकत्र आले होते… एक भावनिक नात निर्माण झालं होतं… युती का तुटली, कोणामुळे तुटली ह्या वादात मला पडायचं नाही कारण त्याची कारणं अनेक आहेत… युती तुटली आणि मग दोन्ही मित्र (जुने मित्र ) एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे ठाकले… मग आरोप प्रत्यारोपांचे "बाण" सुटले… जुन्या मित्रांची तुलना अफजल खानशी झाली… कालपर्यंत एकमेकांसोबत प्रचार करणारे कार्यकर्ते आज मात्र एकमेकांना दोष देत होते… "पाठीत खंजीर खुपसला", "आता मनं तुटली आहेत ती जोडली जातील असा वाटत नाही " अशी अनेक वक्तव्य ऐकायला मिळाली… अश्या वातावरणात निवडणूक पार पडली… आणि निवडणुकीचे निकालही लागले…

निवडणुकीचे निकाल लागले आणि चित्र बदलल… निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाल नव्हत त्यामुळे खानाच्या फौजेला सत्तेसाठी कोणाची तरी गरज लागणार होती… मग भेटी सुरु झाल्या, गुप्त बैठका झाल्या… आज पाठींबा देणार, उद्या नाही अशा अफवा उठायला लागल्या … "आम्ही देऊ ते घ्या " अशा गोष्टी समोर आल्या… त्यात दोन गट पडले, एक होते सत्तेत जाऊ म्हणणारे आणि दुसरे होते ते सत्तेत न जाता आत्मसन्मान न गमावता विरोधात बसू म्हणणारे… पण बराच काळ विचार झाल्यानंतर निर्णय सत्तेत जाण्याचा झाला आणि बरेचसे जुने आणि निष्ठावंत सैनिक नाराज झाले… "गद्दारांना क्षमा नाही… " अस म्हणणाऱ्या मोठ्या साहेबांची आठवण आणि कमतरता  त्या निमित्ताने सर्वांना जाणवली…

ह्या घटनेने समर्थकांच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ज्यांनी मतदान केल त्यांना हा निर्णय फारसा पटला नाही… but Boss is Always Right ह्याप्रमाणे कदाचित नाईलाजास्तव हा निर्णय सर्वांनी हे मान्य केलेला आहे… पण ह्यात सरशी कोणाची झाली आणि कोण हरल ह्यापेक्षा मतदारंच्या भावना राजकारणी लोकांसाठी किती लवचिक असतात ह्याच दर्शन सर्वांना झाल… ह्यात  गोंधळाला तो मात्र मराठी माणूस आणि कट्टर सैनिक…

ह्या नंतर सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात पण अद्यानांत शहाणपण असते अस म्हणून आपल समाधान करून घ्यायचं एवढाच काय ते आपल्या हाती…

एक मराठी माणूस
जय महाराष्ट्र…

(** वरील लेखातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मात्र त्याबद्दल क्षमस्व...)

Tuesday 7 October 2014

पर्यटन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे

स्थानिक संस्कृती जोपासताना, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन आणि आर्थिक पातळी उंचावण्यासाठी पर्यटन


ज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली असे आज आपण अनेक देश पाहतो. सिंगापूर हे त्यातलंच एक उदाहरण. जिथे पर्यटन­विकास होऊ शकतो अशी महाराष्ट्रात अनेक स्थळं आहेत. या ऐतिहासिक, निसर्ग­ सौंदर्यानं नटलेल्या क्षेत्रांचा विकास आपण करायला हवा. इथल्या पर्यटनातून स्थानिक उद्योजक घडले पाहिजेत, स्थानिकांना आर्थिक उत्पन्नाचं एक साधन मिळालं पाहिजे. असं करत गेलो तर आपली संस्कृती टिकेल, जोपासली जाईल.

प्रश्नाचं स्वरूप


महाराष्ट्राला अनेक प्रकारचं वैभव लाभलं आहे. राज्याचा ७५० कि.मी. चा समुद्र किनारा घ्या, विविध प्रकारची जंगलं आणि प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास, समुद्रातले, डोंगरावरचे आणि बेटावरचे गड-किल्ले घ्या. थंड हवेची ठिकाणं, मंदिरे घ्या, बौद्ध आणि जैन धर्मियांच्या गुहा घ्या. हापूस आंबा घ्या, नागपूरची संत्रंबर्फी घ्या, राज्याच्या विविध प्रदेशातला खास असा महाराष्ट्रीय स्वयंपाक घ्या. पुणेरी काठाची साडी घ्या, पैठणची वैशिष्ट्यपूर्ण पैठणी घ्या, सोलापूरच्या सुती चादरी घ्या. गणपती उत्सव घ्या. अनेक लोकांनी उस्फूर्तपणे केलेले विविध वस्तूंचे, ग्रंथांचे संग्रह घ्या. आपल्याकडचे गोट्या आणि गंजिफ्यासारखे बैठे आणि दांडपट्ट्यासारखे लढाऊ खेळ घ्या. लेझीम, लावणी, ढोल-ताशा किंवा पेणचे गणपती घ्या.
कितीतरी वैशिष्ट्यं. आज देशातले आणि परदेशातले पर्यटक इथे येतात. आपल्याला, आपल्या समाजाला, मोठा इतिहास लाभला आहे आणि ही परदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात येणार्या भारतीय पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. पण तरीही आपली पर्यटन क्षमता आपण पाहिजे तेवढी वापरत नाही असं आम्हाला वाटतं. देशात कुठेही नाहीत असे गड-किल्ले महाराष्ट्रात आहेत. या प्रत्येक गडाला मोठा रोमांचकारक इतिहास आहे. आपल्याला मात्र महाराष्ट्रात नेमके किती गड–किल्ले आहेत हे सांगणारी निश्चित नोंद कुठेही सापडत नाही.
महाराष्ट्रात जगानं मान्य केलेली ११ भौगोलिक वैशिष्ट्ये (geographical indicators) आहेत – महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, सोलापूरची चादर, सोलापूरचा टेरी­टॉवेल, पैठणची पैठणी, नाशिकच्या खोर्यानतली वाईन, पुण्याची पगडी, नागपूरची संत्री, कोल्हापूरची चप्पल, वारली चित्र आणि कोल्हापूरचा गूळ. रत्नागिरीचा आणि देवगडचा हापूस तसंच बीडची सिताफळे यांसाठीचे अर्ज सध्या प्रलंबित आहेत . अजंठा, वेरूळ, भाजे, भेडसा, कार्ला, पांडवलेणी, पितळखोरं येथील गुहा पहायला तर आजही असंख्य पर्यटक येतात. पण त्याहूनही अधिक संख्येनं पर्यटक येऊ शकतात का? तिथे त्यांना आवश्यक असलेल्या सोयी मिळतात का? त्या पर्यटन स्थळाची शोभा वाढवण्यासाठी, त्यांचं वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी काय करता येईल?
या प्रश्नांची उत्तरं शोधताना आजपर्यंत आपल्या पर्यटनस्थळांचा म्हणावा तसा विचार आपण केलेला नाही असंच म्हणावं लागतं.
पर्यटनामुळे हाताला काम मिळतं, उत्पन्नात ही भर पडतेच; या निमित्तानं आपली संस्कृती जपली जायला मदत होते, इतिहासाला उजाळा देता येतो. पुढच्या पिढीसाठी आपला इतिहास जिवंत राहतो. पण पर्यटनाकडे निव्वळ मनोरंजन म्हणून पाहता कामा नये; आराम, बदल, नवीन पाहण्याची, अनुभवण्याची संधी अशी अनेक उद्दिष्टं त्यात आहेत, मात्र पर्यटकांना ती साध्य करता यायला हवीत.
महाराष्ट्रात पर्यटनाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गावातील आणि छोट्या शहरातील युवकांचं पुणं, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं स्थलांतर होत आहे. महाराष्ट्रात आज पर्यटनाला चालना मिळावी आणि अशा अनेक तरुणांना रोजगार मिळावा असं पोषक वातावरण आपण देऊ शकणार नाही का?

असं का होतं?


जुलै २०१२ मध्ये पश्चिम घाटातील एकूण ३९ ठिकाणांना एकत्रितपणे वारसा­स्थळांचा (heritage site) दर्जा मिळाला. या पैकी ४ ठिकाणं म्हणजे कास पठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना आणि राधानगरी येथील अभयारण्यं महाराष्ट्रात आहेत. या संधीचा खरंतर पर्यटनासाठी किती फायदा करून घेता येईल. पण दोन वर्षात आपण जेवढं करू शकत होतो तेवढं केलं का?
लोहगड किल्ल्याभोवतालचं ३०% जंगल गेल्या ५ वर्षात नष्ट झालं आहे आणि सुमारे ४० नैसर्गिक नाल्यांनी / पाण्याच्या प्रवाहांनी आपले मार्ग तरी बदलले किंवा ते बंद तरी झाले आहेत. ही बातमी जानेवारी २०१४ मध्ये काही अभ्यासकांनी दिली. ते ऐकून काय केलं आपण?
पुण्यात स. गो. बर्वे चौकात बांधण्यात येणार्या ग्रेड सेपरेटरमुळे राष्ट्रीय महत्व असलेल्या पाताळेश्वर गुहांना इजा पोचू शकते असं आपला पुरातत्वविभाग सांगतो आहे, त्याची नोंद तरी आपण घेतली का?
प्रवास­सुविधा, पर्यटन, स्वच्छता आणि आतिथ्य अशा वर्गवारीत महाराष्ट्र राज्य सतत मागे पडत आहे. राज्यात पर्यटनाला अतिशय वाव असूनही सरकारी यंत्रणेची अनास्था आणि उदासीनता आपण पर्यटन क्षेत्रात मागे पडण्यास सर्वस्वी कारणीभूत आहे. सक्षम रस्ते, रेल्वे गाड्या, पाणी, वीज, सार्वजनिक सुविधा, खाण्या-पिण्याची सोय, वैद्यकीय व्यवस्था, संपर्क साधनं या सोयी-सुविधा महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यायपर्यंत पोचलेल्या नाहीत हे ही त्यामागचं मोठं कारण आहे. पर्यटनाचा विकास करत असताना, स्थानिकांना विचारात घेणं अपरिहार्य आहे; मात्र तसं न करता त्यांचं गाव पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केल्यास अथवा काही योजना आखल्यास स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही. वास्तविक पाहता पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. आपलाही फायदा होतो आहे हे लक्षात आल्यावर स्थानिकांना पर्यटन स्थळाविषयीची आस्था वाटते आणि ते स्थळ सांभाळले जाते.
याच्या जोडीलाच पर्यटनाचा आनंद घेण्याविषयीच्या आपल्या कल्पनाही बदलायला हव्यात. एखाद्या ठिकाणी जाऊन केवळ आपले त्या ठिकाणी फोटो काढून घेणं या पलीकडे जाऊन त्या स्थळाचा आनंद कशा कशा प्रकारे लुटता येईल, तिथला अनुभव कसा घेता येईल हे आपण शिकायला हवं आहे. आपल्या वागण्यामुळे त्या पर्यटनस्थळाचं काही नुकसान होत नाही ना, तिथे आलेल्या इतर पर्यटकांना आपल्यामुळे काही त्रास होत नाही ना, इ. बाबत आपण जागरूक राहायला हवं.

काय करायला हवं?


सर्वात प्रथम म्हणजे पर्यटनाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलायला हवी. पर्यटन हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक महत्वाचा पैलू आहे, स्थानिकांना बसल्याजागी उत्पन्नाचं एक नवीन साधन निर्माण होईल आणि आपली संस्कृती टिकवायलाही मदत होईल. हा तिहेरी हेतू साध्य करण्यासाठी पर्यटनाचा विकास आपण करायला हवा.
पर्यटनवाढीत स्थानिक लोकांचा सहभाग जितका जास्त असेल तितका त्या गावाचा / नगराचा विकास लवकर होऊ शकतो. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मुलभूत सुविधा पर्यटनाच्या विकासाच्या विचाराने लवकरात लवकर पुरवता येऊ शकतील. स्थलांतर रोखल्यामुळे शहरावर अतिरिक्त ताण येणार नाही आणि युवकवर्ग आपापल्या ठिकाणीच राहिल्याने तिथला विकास होण्यासही मदत होईल.
हे सर्व पर्यटन विकासामुळेच घडू शकतं.
हे करत असताना काही मार्गदर्शक तत्वं मात्र आपण पाळायला हवीत –
  • पर्यावरणाचा समतोल राखला जाईल अशाच पद्धतीनं पर्यटनविकास केला जावा -
  • प्रत्येक पर्यटनस्थळाच्या मर्यादा ओळखून, सांभाळून मगच तिथलं पर्यटन विकसित करायला हवं. पर्यटकांच्या गर्दीमुळे अथवा नैसर्गिक कारणांमुळे ज्या स्थळांचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे त्या स्थळांना भेट देणार्याम पर्यटकांच्या संख्येवर हळूहळू मर्यादा घालायला हवी. अशा स्थळांवरचा पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी नवीन पर्यटनस्थळं विकसित करता येतील. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण. २००१ मध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयानं ते पर्यावरण-दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (eco-sensitive zone) म्हणून घोषित केलं आहे. महाबळेश्वरचं सौंदर्य आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवण्यासाठी कदाचित, तिथे येणार्या पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता तिथलं स्थानिक प्रशासन त्यावर मर्यादा आणण्याचा विचार करू शकेल. पश्चिम घाटातलाच आणखी एक पर्याय म्हणून आंबोलीचा विचार होऊ शकेल.
  • पर्यटनामुळे स्थानिक रोजगार निर्मिती व्हायलाच हवी -
  • वर्षानुवर्षे एकाच गावी राहणार्या् स्थानिक लोकांना आपल्या गावाबद्दल खडानखडा माहिती असते. ह्या माहितीचा उपयोग पर्यटन विकासासाठी उत्तमरीत्या करून घेता येऊ शकतो. इतिहासकार, पुरातत्वविभागातील संशोधक, त्या त्या विषयातील तज्ञ मंडळी इ. च्या मदतीनं प्रत्येक स्थळाविषयीची समग्र माहितीसुद्धा स्थानिकांनी एकत्र केल्यास पर्यटनस्थळाचं आकर्षण वाढू शकतं. तरुण, सुशिक्षित युवक-युवती पर्यटनदौर्यासचं सर्व व्यवस्थापन पाहण्याचं (tour operator) आणि वाटाड्या (guide) म्हणूनही प्रशिक्षण घेऊ शकतील. प्रेक्षणीय स्थळांचा इतिहास, सांस्कृतिक माहिती, त्या स्थळामुळे असलेलं त्या गावाचं भौगोलिक महत्व, इ. सारख्या गोष्टींचा अंतर्भाव या प्रशिक्षणात असावा. हा युवकवर्ग पर्यटकांसाठी आपल्या गावाचं प्रतीनिधित्व करू शकतो. तिथली स्थानिक आकर्षणं, खाद्यसंस्कृती, कला-कौशल्य, जैव-वैविध्य याची माहिती पर्यटकांना सांगू शकतो. ज्या मुला-मुलींमध्ये भाषाकौशल्य असेल ते एखादी परकीय भाषा शिकू शकतात, जेणेकरून त्यांना दुभाषे म्हणून काम करता येईल. या सर्वामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • स्थानिक व्यावसायिकतेला चालना आणि उद्योजकतेला वाव मिळायला हवा –
  • पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद देण्यासाठी स्थानिकांनी चालवलेली अल्पोपहार केंद्रं असावीत, घरोघरी केलेली निवासाची सोय (homestay) असावी, त्यांना स्थानिक पेहेराव, कला, क्रीडाप्रकार, नृत्य – संगीत इ. कलाप्रकारांचा आनंद लुटता यावा म्हणून नियोजित केलेले कार्यक्रम, इ. अनेक प्रकाराने स्थानिक जनता पर्यटनाशी निगडीत कुठल्यातरी व्यवसायात गुंतू शकते.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचं दर्शन पर्यटकांना देण्यात घरातील महिलेचा पुढाकार असू शकतो. त्यामुळे होणारा आर्थिक फायदा त्या महिलेला मिळेल आणि घरोघरी व्यावसायिक तयार होऊ शकतील. उदाहरणार्थ, कोकणात कोकण-मेवा (आंबा-पोळी, फणस-पोळी, कोकम सरबत, काजूची उसळ, इ.), खानदेशात बाकरवडी, पातोड्या तर देशावर ज्वारीपासून बनणारे विविध पदार्थ पर्यटकांचं आकर्षण बनू शकतील. शिवाय त्या त्या परिसरातली परिपूर्ण अशी जेवणाची मराठी थाळी आहेच.
याच धर्तीवर घरगुती निवासाची (homestay) कल्पना सुद्धा राबवता येऊ शकते. बर्याशच लोकांना, विशेष करून परदेशी पर्यटकांना स्थानिकांच्या जीवनशैलीबद्दल कुतूहल असतं. या पाहुण्यांना आपल्या सहलीतले एखाद-दोन दिवस स्थानिक लोकांसारखे राहण्याची सोय असू शकते. ही सोय गावातल्या लोकांच्या घरीच करता येईल. परदेशी पाहुण्यांना स्थानिकांसारखं खाणं-राहणं-पेहराव या साध्या सोप्या गोष्टीतून व्यवसायनिर्मिती होऊ शकते.
प्रत्येक गावाला / जिल्ह्याला आपली हस्तकला, शिल्पकला, नृत्य, संगीतसंस्कृती असते. ह्या कलेचं प्रदर्शन पर्यटकांसमोर करता येईल. पर्यटकांसाठी स्थानिक नृत्य, संगीत आणि लोककलेचे नमुने सादर करता येतील. स्थानिक लोकांनी केलेल्या हस्तकला, शिल्पकला, टिकाऊ खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू इ. चे विक्रीकेंद्र उभारता येऊ शकतं. त्या निमित्तानं स्थानिक कलाकारांना वाव मिळेल आणि स्थानिक कला जिवंत राहील.
ज्या पर्यटनस्थळी शेती असेल, तिथले शेतकरी शेतीपर्यटन (agro-tourism) आयोजित करू शकतील. शेतावर राहण्याची सोय, शेतातील कामाची झलक यासारख्या गोष्टी या माध्यमातून जगभर पर्यटकांना आकर्षित करत आहेत, हे लक्षात घेऊन संक्रांत, हुल्गा, नागपंचमी, त्रिपुरी पोर्णिमा, इ. सारख्या सणांमध्ये पर्यटकांना सहभागी करून घेता येऊ शकेल.
पर्यावरणाचा समतोल राखून, स्थानिक रोजगार निर्मिती, उद्योजकतेला वाव तसंच संस्कृती संवर्धन होईल, अशा पद्धतीनंच पर्यटनविकास व्हावा म्हणून ही ३ तत्वं आम्ही सुचवत आहोत.
ही ३ तत्वं लक्षात ठेऊन, महाराष्ट्रात पर्यटनाची क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी खालील गोष्टी करायला हव्यात –
  • पर्यटनस्थळांचा शोध – अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत; त्याबरोबरच माहीत नसलेलीही अनेक ठिकाणे आहेत. ज्या गावांना / नगरांना पर्यटनविकास करण्यात रस आहे त्यांना आपलं ठिकाण नोंदणीकृत करण्याची संधी देऊन राज्यातली शक्य तितकी पर्यटन स्थळं जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर टाकायला हवीत.
  • या प्रत्येक स्थळाचं वर्गीकरण – तिथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि पर्यटनप्रकार, असं दुहेरी वर्गीकरण करून त्या स्थळाची विकास योजना बनवायला हवी.
  • योजनेनुसार आणि स्थानिकांच्या मदतीनं प्रत्येक पर्यटनस्थळाचा विकास करायला हवा.
  • प्रत्येक स्थळाची उत्तमरीत्या जाहिरात करायला हवी, ते पर्यटकांपर्यंत पोचवायला हवं.
  • पर्यटनासाठी आवश्यक असं मनुष्यबळ राज्यात विकसित व्हावं म्हणून प्रशिक्षण संस्था सुरू करायला हव्यात.
  • महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांना भेटी देणार्याय, राज्यातील व देशातील पर्यटकांचं प्रबोधन करायला हवं.

महत्वाच्या कल्पना


  • स्थानिकांनी ठरवल्यास आणि त्यांच्या पुढाकारानं पर्यटनक्षेत्रविकास
  • महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन­नियामक आयोगात
  • मुंबईचे बॉलिवूड – पर्यटनाचे आकर्षण

कार्यक्रम


महाराष्ट्रातलं पर्यटन क्षमता असलेलं प्रत्येक ठिकाण शोधून, तपासून त्याच्या विकासाची योजना आखायला हवी. हे शक्यतो स्थानिकांच्या पुढाकारानंच व्हावं; काही पहिल्या दर्जाच्या पर्यटन स्थळांचा विकास शासनाच्या पुढाकारानं, पण स्थानिकांच्या आणि नागरिकांच्या सहभागानं केला जाऊ शकेल.
प्रत्येक पर्यटन स्थळाचे पर्यटन­क्षेत्र­प्रकारात वर्गीकरण केलं जावं. आम्ही पर्यटन स्थळाच्या प्रकारानुसार एकूण ७ नमुने किंवा प्रारूपे (Destination Prototype) विकसित केली आहेत. प्रत्येक पर्यटन स्थळाला 'पर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप' (Destination Development Prototype) याप्रमाणे विकसित करण्यात यावं असं आम्ही सुचवत आहोत (पहा परिशिष्ट १). महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटन स्थळ यापैकी एका पर्यटक­क्षेत्र­प्रकारातलं (destination prototype) असावं असं आम्हाला वाटतं.
ते ७ प्रकार असे -
  • सांस्कृतिक पर्यटन (Heritage / Cultural Tourism) - गड, किल्ले, वाडे, World Heritage Sites इ.
  • यात्रा-पर्यटन (Pilgrimage Destination) - देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधिस्थळ, इ.
  • साहस-पर्यटन (Adventure Tourism) - trekking, rappelling, para-gliding, डोंगर चढणं, इ.
  • शेती-पर्यटन (Agro-Tourism) - शेती आणि शेतीशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी.
  • निसर्ग­पर्यटन (Eco-Tourism) - जंगलं, अभयारण्यं, इ.
  • वैद्यकीय पर्यटन (Medical Tourism) - इस्पितळं, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय इत्यादी.
  • समुद्राकाठचं पर्यटन (Beach Destination) - महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा.

पर्यटन स्थळाच्या विकासाची योजना

पर्यटनवृद्धीतून आर्थिक समृद्धी आणायला काही गोष्टी अग्रक्रमानं करायला हव्यात. जिथे पहिल्यापसून पर्यटनाचा ओघ आहे ती स्थळं सक्षम करून मग नवीन स्थळांना वर आणायचं काम करण्यात यावं.
प्रत्येक पर्यटनस्थळ तिथे असलेल्या सोयीसुविधांनुसार विकसित करण्यात यावं. जिथे पायाभूत सुविधा पुरेश्या आहेत ते विकसित करायला प्राधान्य दिलं जावं. जिथे पर्यटन क्षेत्र आहे, पण पायुभूत सुविधांची सोय कमी आहे, त्या स्थळांचा प्राधान्यक्रम दुसरा असावा आणि ज्या स्थळांना पर्यटन संभाव्य आहे पण पायाभूत सुविधा अजिबात नाहीत, ती तिसर्या प्राधान्यक्रमानं विकसित केली जावीत. खालील आकृतीत पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम स्पष्ट केला आहे (पहा आकृती क्र. १)

पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम


पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी प्राधान्यक्रम आणि त्याचं प्रारूप ठरवावं

पर्यटन स्थळ विकास प्राधान्यक्रम

प्रत्येक पर्यटन स्थळाचं पर्यटन प्रकारात वर्गीकरण केलं जावं. या अंतर्गत प्रत्येक स्थळी खालील प्रमाणे किमान सोयी-सुविधा असाव्यात -
पर्यटन स्थळ विकास नमुना / प्रारूप किमान सोयी-सुविधा
  • पर्यटकांसाठी माहिती केंद्र - तिथल्या राहण्याच्या-खाण्याच्या सोयींबद्दल माहिती देणारं, त्या स्थळाचं ऐतिहासिक, भौगोलिक महत्व दर्शवणारं माहितीपत्रक, चित्रफिती पर्यटकांना उपलब्ध असाव्यात.
  • सर्व आर्थिक श्रेणीतल्या पर्यटकांना परवडतील अशी राहण्याच्या सोय असावी.
  • प्रशिक्षित स्थानिक वाटाडे (guides) उपलब्ध असावेत.
  • स्थानिक हस्तकला आणि खाद्य विक्रीचं अधिकृत केंद्र असावं.
  • केंद्रसरकारने सुचवलेल्या निकषांना(service level benchmarks) अनुसरून भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सुविधा असाव्यात.
  • ठिकठिकाणी पर्यटन स्थळाविषयी माहिती देणारे फलक, उदा. वेळापत्रक, सार्वजनिक सुविधा, दिशांचे माहिती फलक, इ. असावेत.
  • योग्य आरोग्यविषयक आणि मलनिस्सारण व्यवस्था (sewerage and sanitation system) असावी.
  • पर्यटनस्थळाचा विकास पर्यावरणसंवर्धनाच्या चौकटीतून व्हावा (carrying capacity and development control regulation)

पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग)

पर्यटनाचे विपणन (मार्केटिंग) दोन निकषांवर केलं जावं - पर्यटनस्थळाचा विकास प्राधान्यक्रम आणि तिथे येणारा पर्यटकवर्ग.
पर्यटक स्थळाचा विकास प्राधान्यक्रम तिथे असलेल्या मुलभूत सोयी-सुविधा, रस्ते, वाहतूक सुविधा इ. वर अवलंबून असल्यामुळे त्या त्या स्थळाचं मार्केटिंगचं तंत्र बदलेल. तसंच विविध पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी मार्केटिंगच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करायला हवा. आपल्याकडे येणारा पर्यटक राज्यातला, परराज्यातला किंवा परदेशी असू शकतो, त्याची खर्च करायची क्षमता वेगवेगळी असू शकते. तसंच त्याचं पर्यटनाचं प्रयोजनही वेगवेगळं असू शकतं, उदा. यात्रा, मौज-मजा, कामकाज, शैक्षणिक पर्यटन इत्यादी. ही विविधता लक्षात घेऊन जास्तीतजास्त पर्यटकांपर्यंत त्या स्थळाची माहिती पोचावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या संकेतस्थळावरूनच प्रवासाचे बेत आखता येऊ शकतात, तिकीटविक्री, रेल्वे गाड्यांचे बुकिंग इ. होऊ शकतं. याचा फायदा घेऊन पर्यटनाचं संकेतस्थळ विकसित करता येऊ शकेल.
पर्यटन प्रदर्शनातून महाराष्ट्राचं मार्केटिंग करता येऊ शकेल. म्हणून विविध ठिकाणी – राज्यांमध्ये तसंच परदेशी ­ अशा पद्धतीची प्रदर्शनं आयोजित केली जाऊ शकतात.
प्रत्येक रेल्वेस्टेशनावर, विमानतळावर आणि बसस्थानकांवर पर्यटक­माहिती­केंद्र असू शकेल. नियतकालिकं, वर्तमानपत्रं यातून महाराष्ट्रातल्या विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रसिद्ध करता येऊ शकते. महाराष्ट्र­पर्यटन­मार्गदर्शिका दर वर्षी प्रसिद्ध करता येईल. खासगी प्रवास / सहल आयोजकांबरोबर संलग्नपणे काम करता येईल.
शिवाय याचबरोबर भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून घोषित झालेल्या त्या त्या भागांतील सर्वोत्तम उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत विशेष स्थान मिळवून देता येईल. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षं आणि वाईन, नागपूरची संत्री, कोल्हापूरचा गूळ, रत्नागिरीचा आंबा, पुणेरी पगडी, पैठणी साडी, सोलापूरची चादर, वारली चित्रकला यासारख्या उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी एक स्वतंत्र कार्यालय उभारलं जाऊ शकेल, ज्याअंतर्गत या विशेष उत्पादनांचं प्रदर्शन व विक्री होईल. अशा प्रदर्शनांची व विक्री केंद्रांची शाखा प्रत्येक जिल्ह्यात उघडता येईल.

प्रशिक्षित मनुष्यबळ विकास

महाराष्ट्राला अव्वल दर्जाचं पर्यटनक्षेत्र म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्यासाठी लागणारं प्रशिक्षित मनुष्यबळ आपल्यालाच तयार करावं लागेल. पर्यटनासाठी लागणारं विशेष कौशल्य (माहिती सांगायचं कसब, सांस्कृतिक शिक्षण, परकीय भाषाशिक्षण इ.) पुरवू शकतील अशा प्रशिक्षणसंस्था उभ्या राहायला हव्यात. पर्यटन-क्षेत्र-प्रारुपाप्रमाणे योग्य असं मनुष्यबळ विकसित करायला हवं. सांस्कृतिक पर्यटन-क्षेत्राची ऐतिहासिक, भौगोलिक आणि स्थानिक हस्तकला, शिल्पकला इत्यादींविषयीची आवश्यक अशी माहिती या शिक्षणातून मिळवता येईल. साहसी पर्यटन-क्षेत्रातील गाईड्सना परिचिकित्सक प्रशिक्षण (paramedical skills) असणं आवश्यक असेल.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं रुपांतर पर्यटन नियामक आयोगात

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं (MTDC) समन्वयकाची भूमिका घ्यावी असं आम्हाला वाटतं. खासगी कंपन्यांबरोबरच्या स्पर्धेत उतरण्यापेक्षा विश्रामगृहांना, हॉटेलस्, resorts वगैरे विकसित करणार्याक कंपन्यांना मार्गदर्शक तत्वं, मानदंड आखून देऊन नियामक आयोगाची जबाबदारी महामंडळानं बजावावी. महामंडळाच्या अखत्यारीत येणारी विश्रामगृहं, हॉटेल इ. खासगी कंपन्यांना चालवायला द्यावीत.

पर्यटकांचं प्रबोधन

सर्व पर्यटनस्थळांवर माहितीफलकांद्वारे पर्यटकांचं प्रबोधन केलं जावं. मौजमजेबरोबरच पर्यटनस्थळी पाळायची शिस्त सुद्धा अधोरेखित केली जावी. स्वच्छता ठेवण्यासारखे नियम तर सगळ्याच ठिकाणी असावेत पण काही नियम त्या त्या ठिकाणच्या वैशिष्ट्यांना अनुसरून केले जावेत. जसं वन-पर्यटनाच्या वेळी बोलताना आवाज हळू ठेवावा, गाणी लावू नयेत इ. समुद्रपर्यटनक्षेत्रात भरतीच्या वेळी समुद्रावर जाऊ नये यासारखे नियम पर्यटकांकडून कसोशीनं पाळले जावेत म्हणून आग्रह धरायला हवा.
परिशिष्ट १ - पर्यटनक्षेत्रप्रकार आणि त्यानुरूप स्थळाचा विकास

१.सांस्कृतिक पर्यटन

(Heritage / Cultural Tourism): गड, किल्ले, वाडे, World Heritage Sites, इ.
१.१ केंद्रसरकारनं आखलेल्या "Model Heritage Regulations" ला अनुसरून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तूंचं संवर्धन केलं जावं; या वास्तूंजवळ अतिथिगृहं आणि विश्रामगृहं बांधावीत.
१.२ या वास्तूंच्या जतनासाठी पर्यटकांच्या आणि तिथं काम करणार्यांeच्या संख्येवर मर्यादा असावी.
१.३ सांस्कृतिक वास्तूच्या भोवताली पायवाटा विकसित करण्यात याव्यात.
१.४ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्याविषयी माहितगार असे गाईड उपलब्ध असावेत.
१.५ वास्तू ज्या काळातली आहे त्या काळातले कपडे, रोजच्या वापरातील वस्तू, खाद्य पदार्थ, जीवनशैली दर्शविणार्याक गोष्टींचं संग्रहालय असावं.
१.६ शाळा-महाविद्यालयातील अभ्यास-गट त्यांच्या इतिहास- प्रकल्पांसाठी इथे येऊ शकतील असं वातावरण असावं.
१.७ ऐतिहासिक महत्व सांगणार्याआ चित्रफिती, फिल्म, परिसंवाद आयोजित केले जावेत.
१.८ ऐतिहासिक काळात असायची तशी तलवारबाजी, घोडेस्वारी, पारंपारिक खेळाची प्रात्याक्षिकं असावीत. पर्यटकांना त्यात सहभागी करून घेतलं जावं.

२. यात्रा-पर्यटन

(Pilgrimage Destination) देऊळ, तीर्थक्षेत्र, समाधी स्थळ, इ.
२.१ तीर्थक्षेत्रं आणि त्याभोवतीचं संवर्धन development control regulation प्रमाणे व्हावे.
२.२ धर्मशाळा आणि राहण्याच्या व्यवस्था मुबलक असाव्यात.
२.३ भरपूर आणि स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्यात.
२.४ खाण्या-पिण्याच्या सोयी उत्तम पण स्वस्त दरात असाव्यात.
२.५ स्थानिक खाद्य विक्रीची आणि पूजा साहित्याची अधिकृत केंद्र असावीत.
२.६ उरूस, सण, जयंती, पुण्यतिथीनिमित्तानं होणार्याअ गर्दीच्या नियमनाची चोख व्यवस्था केली जावी. या ठिकाणी पोलीस यंत्रणा सक्षम असावी.
२.७. परिपक्व मलनिस्सारण व्यवस्था असावी.
२.८ बस आणि रेल्वे स्थानकावरून पर्यटकांना ने-आण करण्यासाठी बस-व्यवस्था (shuttle service) असावी.
२.९ पादत्राणं सुखरूप काढून ठेवायची व्यवस्था असावी.
२.१० प्रदक्षिणा घालायला, देवदर्शनाच्या रांगेत उभं राहतान ऊन-पावसापासून संरक्षण देणारं छत असावं. 

३. साहस-पर्यटन

(adventure tourism) trekking, rappelling, para-gliding, डोंगर चढणे, इ.
३.१ हिमालयन mountaineering institute च्या धर्तीवर सह्याद्री mountaineering institute ची स्थापना करण्यात यावी. येथं mountaineering चं प्रशिक्षण देता यावं.
३.२ अद्ययावत सुरक्षानियमावली कार्यरत असावी.
३.३ गाईडसना परिचिकित्सकाचं प्रशिक्षण देण्यात यावं (paramedical skills)
३.४ सह्याद्रीतलं जैव-वैविध्य जोपासून पायवाटांची आखणी करण्यात यावी.
३.५ स्वच्छ सार्वजनिक सोयी-सुविधा असाव्या.
३.६ तंबूत आणि गावातल्या घरांमध्ये राहण्याची सोय असावी.
३.७ Trekking and Camping चं साहित्य विकण्यासाठी अधिकृत केंद्र असावं.

४. शेती-पर्यटन

(agro-tourism) शेती आणि त्याच्याशी संबधित असलेल्या पर्यटनाच्या संधी
४.१ शेतावर राहण्याची उत्तम सोय असावी.
४.२ मराठी खाद्य संस्कृतीची ओळख इथे होऊ शकेल असं वातावरण असावे.
४.३ सार्वजनिक स्वच्छतेची उत्तम सोय असावी.
४.४ गाय, बैल, कोंबड्या, बकर्याीपालनाचं प्रात्यक्षिक व मार्गदर्शन व्हावं.
४.५ भाजीपाला, फळबागा, धान्यलागवडीची प्रात्याक्षिकं केली जावीत.
४.६ बैलगाडी आणि tractor मधून फेरी मारायची सोय असावी.
४.७ पर्यटकांना पारंपारिक खेळ खेळण्याची संधी मिळावी आणि प्रात्यक्षिकं दिली जावीत. उदा. विटी-दांडू, सूरपारंब्या इत्यादी.

५. निसर्ग-पर्यटन

(Eco-tourism) जंगलं, अभयारण्य
५.१ जैव-वैविध्यात प्रशिक्षण घेतलेले गाईड असावेत.
५.२ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी core zones, buffer zones and tourism zones आखण्यात यावेत.
५.३ वन्यजीवन माहिती कक्ष उभारण्यात यावा.
५.४ परिसरातील शेवटच्या १ किलोमीटरमध्ये फक्त पायी किंवा सायकलवरून जाता येईल आणि पर्यावरणाशी समतोल राखणार्या गाड्याच जाऊ शकतील अशी सोय असावी.
५.५ या परिसरातील हॉटेल, resorts ना green-star rating असल्यावरच परवानगी देण्यात यावी.
५.६ पर्यटनव्यवसायाकरिता लागणार्या सर्व वस्तू देशी, स्थानिक बनावटीच्या आणि पर्यावरणाला हानी न पोचवता बनवलेल्या असाव्यात.
५.७ पक्षी-निरीक्षण, वनस्पतींचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण, वन्यजीवन फोटोग्राफी यासारखे उपक्रम राबवले जावेत. 

६. वैद्यकीय-पर्यटन

(medical tourism) इस्पितळे, वैद्यकीय केंद्र, योगोपचार केंद्र, आयुर्वेदिक चिकित्सालय, इत्यादी
६.१. आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रप्राप्त (international certification) सोयी-सुविधा देण्यात याव्यात.
६.२ वैद्यकीय आचार-नीती कसोशीने पाळली जावी.
६.३ हॉस्पिटल आणि रोग्यांमध्ये दुवा साधणा-या प्रशिक्षित व्यक्ती कार्यान्वित असाव्यात.
६.४ रोग्यांच्या आप्तेष्टांना राहण्याची आणि जेवणाची आरामदायक व्यवस्था असावी.

७. समुद्राकाठचे पर्यटन

(beach destination) महाराष्ट्राचा ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा
७.१ प्रशिक्षित जीवन-रक्षक किनार्या लगत असावेत.
७.२ कोकण खाद्य-पर्यटनक्षेत्र विकसित व्हावे.
७.३ प्रत्येक आर्थिक स्तरातील लोकांसाठी त्यांना परवडेल अशी राहण्याची व्यवस्था केली जावी.
७.४ काही विशेष किनारे विकसित केले जावेत, उदा. आंबा किनारा -जिथे आंब्याची झाडे असतील, कासव किनारा - जिथे कासवे अंडी घालतात, जैव-वैविध्य असलेला किनारा इ. 

तळटीप


  • http://ipindia.nic.in/girindia/
  • http://ipindiaservices.gov.in/GirPublic/DetailsGIR.aspx

from... http://mnsblueprint.org/index.html

Monday 6 October 2014

गड-किल्ले संवर्धन :- महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे

गड-किल्ले संवर्धन

गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन

महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठीचा हा प्रयत्न.

प्रश्नाचं स्वरूप


एवढ्या मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात एकमेव असे राज्य आहे. राज्याच्या कोपर्‍या-कोपर्‍यात गड-किल्ले विखुरलेले आहेत. प्रत्येक गडाचा आणि किल्ल्याचा आपला स्वतंत्र असा एक इतिहास आहे. तसेच प्रत्येकाचे आपले एक भौगोलिक महत्व आहे. अशाच काही किल्ल्यांचे आणि गडांचे भौगोलिक महत्व जाणून एका सोळा वर्षाच्या युवकाने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली आणि इतिहास घडवला. या ध्येय्याने झपाटून अनेक मावळे लढले, कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी केवढे मोठे योगदान दिले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. हा इतिहास नुसताच पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा आपल्या मुलांनी बघितला पाहिजे. हे गड चढले पाहिजेत, तिथे फिरले पाहिजे, त्याच्या आजूबाजूचे वातावरण अनुभवले पाहिजे आणि स्थापत्त्यकलेचा नमुना अभ्यासला पाहिजे. कारण आजचा महाराष्ट्र हा याच इतिहासाच्या कर्तबगारीवर उभा आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक परंपरेतून बोध घेऊनच आपण आपले भविष्य घडवू शकतो आणि आपली पुढची पिढी कालचा हा उज्ज्वल इतिहास जाणूनच उद्याचे उज्ज्वल भविष्य घडवू शकते.
ज्या काळी, ज्या भौगोलिक अवस्थेत हे गड-किल्ले बांधले आणि तेव्हा असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता, हे गड-किल्ले चमत्कारापेक्षा काही वेगळे नाहीत. अशा वास्तूंचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे कारण आपल्या मराठी ऐतिहासिक संस्कृतीचे प्रतिक म्हणून या वास्तूंना अनन्यसाधारण महत्व आहे. पण नैसर्गिक आपत्तींमुळे आणि आपल्याच अनास्थेमुळे आज बर्‍याच गडांची दुरावस्था झाली आहे, त्यांची योग्य ती दखल घेतली गेलेली नाही. या ठिकाणी बहुतांश पर्यटक फक्त मौज-मजेसाठी येतात. इथे येण्याचा आनंद प्रत्येकाने घ्यावाच, पण त्याचबरोबर या पुरातन वास्तूंचे ऐतिहासिक महत्वही जाणून घ्यावे. आज तसे फारसे होत नाही, गडावर येणार्‍या पर्यटकांना, गिर्यारोहकांना ते सांगण्याची कुठलीच सोय आज उपलब्ध नाही. दुर्गम भागातल्या किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल तर बोलायलाच नको.

असं का होतं?


महाराष्ट्राची नैसर्गिक संपत्ती आपल्या भूगोलाची आणि पुरातन वास्तू या इतिहासाच्या ठेवी आहेत. या वास्तूंचे जतन हे आपण नाही केले तर दुसरं कोण करणार? अनेक व्यक्ती, गट यासाठी आज झटत आहेत पणे त्यांचे प्रयत्न आज एकाकी पडताना दिसतात. महाराष्ट्र म्हणून आपण या गोष्टीला पुरेसे महत्व दिलेले नाही. या प्रयत्नांना लागेल ती मदत करणं हे आपलं कर्तव्य आपण मानायला हवं.
असे अनेक हौशी गट आहेत ज्यांना गड संवर्धनाबद्दल आस्था आहे. ते नियमितपणे गड चढतात. त्या गडाचा इतिहास जाणून घेतात. त्यांच्यासारख्या इतर दुर्ग-प्रेमींना तिथल्या गड-किल्ल्यांबद्दल माहिती सांगतात. काही संस्था आहेत ज्या शाळा-महाविद्यालयाच्या मुलांना इतिहास अभ्यासासाठी गडावर नेतात. त्या काळातल्या गोष्टी सांगून, तसे वातावरण निर्माण करून इतिहास जिवंत करून सांगतात. पण हे प्रयत्न त्यांच्यापुरतेच मर्यादित राहतात. या दुर्ग-प्रेमींसाठी बर्‍याच गडांवर पुरेशी व्यवस्थाच नसते. सरकारकडून त्यांना पुरेसं सहकार्य किंवा आर्थिक सहाय्य मिळत नाही. अशा गटांची दखल सुद्धा घेतली जात नाही.
आपल्या गड आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आपल्या वारशाचे जतन हे आपणच करायला हवे असा विचार आता लोकांच्या मनामध्ये रुजतो आहे, तो बळावला पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहास समजून पुढे जाण्यासाठी आता ही जागरूकता लोकांमध्ये हळूहळू वाढत चालली आहे, ती अधिक वेगाने पसरली पाहिजे.
या वास्तूंची अशी दुरावस्था होण्याचे आणखी एक कारण आहे. जेव्हा जेव्हा या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा तेव्हा तो काही अपवाद वगळता तडीस जात नाही असा आज पर्यंतचा अनुभव आहे. बरेच गड हे पुरात्तव विभागाच्या (Archeological Survey of India - ASI) अखत्यारीत येत असल्याकारणाने ASI च्या गतीने आणि नियमांच्या चौकटीनुसार हे काम सुरु राहतं. जसा निधी मिळेल तसं जतन करायचं काम पूर्ण केलं जातं. शिवाय, ASI च्या कामामध्ये महाराष्ट्र राज्य काहीच हस्तक्षेप करू शकत नाही.

काय करायला हवं?


  • गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यट्न क्षेत्र प्रकार' घोषित करायला हवे.
  • 'महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ' स्थापन करायला हवे.

महत्वाच्या कल्पना


  • गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यटन क्षेत्र प्रकार' (Heritage Tourism Destination) असा दर्जा देणे
  • 'महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ' स्थापना

कार्यक्रम


महाराष्ट्रात इतके गड आणि किल्ले आहेत की त्यांची एक अधिकृत सूची तयार करायला हवी. अनेकांनी हा प्रयत्न केला आहे, ते सर्व प्रयत्न संकलित करून, इतिहासकारांकडून तपासून, त्यात अनेक प्रकारच्या माहितीची भर घालून एक कोषच बनवायला हवा. अशा प्रकारे एकत्र केलेली सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देता येईल. त्यात वेगवेगळ्या युगातील आणि कालखंडातील गडांची वर्गवारी असू शकेल. भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती तर असेलच पण सध्या तिथे पर्यटकांना जाण्यासाठी काय सुविधा आहेत, वाहतूक व्यवस्था कशी आहे हे सुद्धा कळू शकेल.
हे सर्व प्रयत्न पर्यटन विभागाच्या माध्यमातून आणि या विभागाच्या समन्वयानेच होतील.
गड-किल्ल्यांना 'सांस्कृतिक पर्यटक क्षेत्र प्रकार' (Heritage Tourism Destination) असा दर्जा सांस्कृतिक पर्यटन क्षेत्र विकसित करून गड-किल्ल्यांना या अखत्यारीत घेऊन मग त्यांचा विकास केला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची देखभाल आणि संवर्धन हे एक विशेष कौशल्य असणारे काम आहे. त्यासाठी कुशल कारागीर व प्रशिक्षित कामगारांची मदत घ्यावी लागेल. गडांचे आणि किल्ल्यांचे संवर्धन करून ते सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राच्या अमलाखाली येतील
प्रत्यके सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राला काही विशिष्ट मानदंड असायला हवेत. केंद्र सरकारच्या "Model Heritage Regulations" या मार्गदर्शक सूचीमध्ये सुचवल्याप्रमाणे ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करायचे आहे. या वस्तूंजवळ अतिथिगृह आणि विश्रामगृह बांधाव्यात असे त्यांनी सांगितले आहेच. इतरही काही मानक असावेत असं आम्ही सुचवत आहोत (पहा चौकट क्र. १.)
चौकट क्र. १ - सांस्कृतिक पर्यटन मानक (Heritage/Cultural Tourism norms):
  • या वास्तूंच्या जतनासाठी पर्यटकांच्या, तिथे काम करणार्‍या लोकांच्या संख्येवर मर्यादा असाव्यात.
  • सांस्कृतिक वास्तूच्या भवताली पायवाटा विकसित केलेल्या असाव्यात.
  • इतिहासात आणि संस्कृतीत पारंगत असे गाईड असावेत.
  • ती वास्तू ज्या काळातली आहे त्या काळातले कपडे, रोजच्या वापरातल्या वस्तू, खाद्य पदार्थ, जीवनशैली दर्शविणार्‍या गोष्टींचे संग्रहालय तिथे असावे.
  • शाळा-महाविद्यालयातले अभ्यास-गट इतिहास प्रकल्पांसाठी यावेत म्हणून प्रयत्न केले जावेत.
  • ऐतिहासिक महत्व सांगणार्‍या चित्रफिती, फिल्म, परिसंवाद त्या परिसरात आयोजित करण्यात यावेत.
  • ऐतिहासिक काळात असायची तशी तलवारबाजी, घोडेस्वारी, पारंपारिक खेळाची प्रात्यक्षिके आयोजित केली जावीत आणि पर्यटकांनी यात सहभागी होता यावे असे नियोजन असावे.

महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळाची स्थापना

महाराष्ट्रात आज अशा बर्‍याच वास्तू, किल्ले, बागा आहेत ज्यांची अपुर्‍या निधीपोटी, अनास्थेमुळे दुर्दशा झाली आहे. अशा वस्तूंचे संवर्धन करून त्यांना पुन्हा सुशोभित करून जनतेसाठी खुले करण्याचे काम आपण करायला हवे आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ या संस्थेची स्थापना करावी असे आपण सुचवत आहोत. या संस्थेचा हेतू गड-किल्ले, ऐतिहासिक वाडे, वास्तू, सांस्कृतिक जागा, बागा, डोंगर यांचे जतन करून त्यांना स्थानिक लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुल्या करून देणे असे असेल. या जागांचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व लक्षात घेऊन संवर्धन, पुनर्बांधणी आणि सुशोभीकरण करण्यात येईल. पर्यावरणाचा समतोल राखून, स्थानिक लोकांचे हित जपून हे संवर्धन केले जाईल.
या उपक्रमासाठी लागणारा निधी हा नागरिकांच्या मदतीनेच गोळा केला जावा असे आम्हाला वाटते. महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूसच या संवर्धनातील गुंतवणूकदार वा भागीदार (stakeholder) असेल. या कामासाठी लागणारे मनुष्यबळ सुद्धा स्वयंस्फूर्तच असेल. इतिहास प्रेमी, निसर्गप्रेमी, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य माणूस हे या उपक्रमात भाग घेऊ शकतील.
from.... http://mnsblueprint.org/index.html

Wednesday 1 October 2014

व्यवसाय शिक्षण - महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे

प्रश्नाचं स्वरूप


दहावी पूर्ण करायच्या आधीच सुमारे २५% विद्यार्थी शाळेच्या प्रवाहाबाहेर पडतात (पहा याच आराखड्यातले 'प्राथमिक शिक्षण'). हे विद्यार्थी मजूरीच्या कामाला तरी लागतात किंवा कुठल्यातरी व्यावसायिकासोबत मदतनीस म्हणून काम करतात. काम करता करता ते कुठलेतरी कौशल्य मिळवतात; त्यात ते तरबेजही होत असतील. पण अनौपचारिकरित्या हे कौशल्य मिळवल्यामुळे त्यांच्यावरचा शाळा सोडल्याचा धब्बा तसाच राहतो. परिणामी त्यांना त्यांच्या कौशल्याचा परतावा पाडून घ्यावा लागतो.
दहावी-बारावी पूर्ण केल्यावरही बहुतांश विद्यार्थी पुढचे शिक्षण चालू ठेवण्याऐवजी कामाला लागणे पसंत करतात. आज महाविद्यालयात प्रवेश घेणार्यां चा टक्का साधारण २०% आहे यावरून बारावीच्या पुढे शिक्षण घेणार्यां चे प्रमाण फारच कमी आहे हे आपल्याला लक्षात येते.
एका बाजूला ही परिस्थिती आहे, तर दुसर्याल बाजूला हवे तसे कामगार मिळत नाहीत अशी उद्योग क्षेत्राची ओरड आहे. उद्योगांना कामगारांना स्वत: प्रशिक्षित करावे लागते, त्यासाठी ज्यादा वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.
तरूणांना त्यांच्या योग्य व आवडीचे उत्तम प्रशिक्षण मिळत नाही आणि उद्योग-व्यवसायांना त्यांना हवे तसे कामगार-व्यवस्थापक मिळत नाहीत हे बेरोजगारीचे हे एक मोठे कारण आहे. उद्योग-व्यवसायांना हवं ते कौशल्य असलेलं, हव्या त्या संख्येने व हवं तेव्हा लागणारं मनुष्यबळ निर्माण करता आलं तर मागणी-पुरवठ्याचे हे गणित बसेल आणि रोजगार निर्मिती होईल. आज हे गणित महाराष्ट्रात तरी बिघडलेले दिसते. स्थानिक पातळीवर पुरवठा होऊ शकला नाही तर बाहेरून हे मनुष्यबळ आणावे लागते आणि स्थलांतराला प्रोत्साहन मिळते. स्थानिकांना हवे असलेले काम मिळत नाही आणि उद्योग-व्यवसायांना हवं तसं मनुष्यबळ मिळत नाही हा तिढा अतिशय नियोजित पद्धतीने आपण सोडवला पाहिजे.

असं का होतं?


व्यवसाय शिक्षणाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आणि मूळातच सध्या मिळत असलेल्या व्यवसाय शिक्षणाची गुणवत्ता अशा दुहेरी संकटात आपण अडकलो आहोत. कमी गुण मिळाले तरच विद्यार्थी व्यवसाय शिक्षणाकडे वळतात, पदवी न घेता केवळ व्यवसाय शिक्षण घेतले तर त्यात पुढच्या संधी कमी आहेत, पदवी घेतल्यावर अधिक उज्ज्वल भविष्य असतं, एखादा छंद जोपासायचा असेल तरच व्यवसाय शिक्षण घ्यावे – कमवण्यासाठी मात्र भक्कम पदवीचा आधार पाहिजे, इ. अनेक (गैर)समज रूढ झालेले आपण पाहतो. व्यवसाय शिक्षण कमी प्रतिष्ठेचे असं मानतो.
वास्तविक पाहता पदवी घेऊन बेरोजगार राहिलेल्यांची संख्या सुद्धा बरीच आहे हे आपण लक्षात घेत नाही.
व्यवसाय प्रशिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही अनेकांना आज माहिती नसते. त्यामुळे हे पर्याय तपासलेच जात नाहीत. व्यवसाय शिक्षण उत्कृष्ट दर्जाचे आहे याबद्दल खात्री वाटत नाही; ते केल्यावर पुरेसे कौशल्य मिळवता येते याची शाश्वती नसते. आणि त्यातून अर्थार्जन होईल याबद्दल साशंकता वाटते.
ही व अशी अनेक कारणे आहेत. यामुळे आपण बेरोजगारी कमी करण्याचा एक महत्वाचा मार्ग दुर्लक्षित करत आहोत.
आज आपल्याकडे उद्योजक बनण्यापेक्षा नोकरी करणे हा अधिक सुरक्षित पर्याय आहे असाही एक समज आहे. खरं म्हणजे उद्योजकता कुठल्याही समाजाच्या, राज्याच्या प्रगतीसाठी महत्वाची असते. त्यातूनच प्रयोगशीलता वाढते, नवीन शोध लागतात.
व्यवसाय शिक्षणाचा एक भाग उद्योजकतेला प्रोत्साहन देतो. या पर्यायाकडे आपण गांभीर्याने पहायला हवे.

काय करायला हवं?


प्राथमिक शिक्षण पूर्ण करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने पदवीपर्यंत वा पुढचे शिक्षण घ्यावे हे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या जीवनाची दिशा शोधायला आणि तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवायला मदत करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट जर चांगला नागरिक, व्यक्ती घडवणं हे आहे, तर तिथून पुढच्या टप्प्याचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे ध्येय शोधायला आणि मिळवायला मदत करणं हे असायला हवं.
व्यवसाय शिक्षणाबद्दलचे गैरसमजही दूर करायला हवेत. व्यवसाय शिक्षण घेता घेता काम, आणि काम करता करता व्यवसाय शिक्षण अशी सांगड घातली तरच उत्तम दर्ज्याचे व्यवसाय शिक्षण आपण देऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि नोकरी करणे किंवा स्वत:च उद्योजक बनणे या दोन्हींना प्रोत्साहन द्यायला हवं.
फिनलॅंड, नॉर्वे, फ्रॉंस, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, स्विझर्लंड या देशांनी व्यवसाय शिक्षणाचा पर्याय सर्मथपणे उभा करून आपल्या देशातली बेरोजगारी कमी करण्यात यश मिळवलं आहे. या देशांनी पदव्युत्तर शिक्षण व व्यवसाय शिक्षणाला समान महत्व दिले, प्रोत्साहन दिले. व्यवसाय शिक्षण व उच्च शिक्षणाची सांगड घातली, केव्हाही आवडेल त्या विषयाचा अभ्यास करता येईल ही मुभा दिली. बाजारात कुठल्या प्रकारच्या नोकर्यां ची गरज आहे हे लक्षात घेऊन अभ्यासक्रमात योग्य ते बदल करण्याची क्षमता ठेवली. आणि पालक-विद्यार्थ्यांच्या बैठका घेऊन व्यवसाय शिक्षणाचा पर्याय त्यांच्यापर्यंत पोचवला.
आपल्या राज्य आणि केंद्र सरकारनेही व्यवसाय शिक्षणाचे महत्व ओळखून पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने आपल्या अकराव्या तथा बाराव्या पंचवार्षिक योजनेत कौशल्य विकास (skill development) कार्यक्रमावर भर दिला आहे. तसेच केंद्राने २००९ साली आपले धोरण जाहीर करून व्यवसाय प्रशिक्षणाचे महत्व सांगितले आहे.
२०११ साली महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या व्यवसाय शिक्षण समितीने आपला अहवाल सादर केला . समितीने माध्यमिक, उच्च माध्यमिक, शाळेतून गळलेले, शाळेतून बाहेर पडून मदतनीस म्हणून काम करणारे, व्यवसाय शिक्षणाकडे वळणारे तसेच कुशल तथा अकुशल कामगार म्हणून काम करत असलेले पण औपचारिक प्रशिक्षण नसलेले अशा सर्वांना व्यवसाय शिक्षणाचा लाभ मिळवून देणे कसे आवश्यक आहे हे अधोरेखित केले आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर, म्हणजे आठवीनंतर, ज्यांना पुढे शिकायचे नाही त्यांना व्यवसाय शिक्षणाकडे वळण्याचा पर्याय असायला हवा असं आम्हाला वाटतं. व्यवसाय शिक्षणातही पदवी / पद्व्युत्तर वा पी.एच.डी. पातळीवरचे उच्च शिक्षण घेता यावे यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना किंवा विद्यापिठांतून व्यवसाय शिक्षणासाठी स्वतंत्र विभाग सुरू करायला हवा. व्यवसाय प्रशिक्षण घेतल्यावर पुन्हा अभ्यासाकडे (academics) वळता येईल; तसेच अभ्यासाकडून (academics) व्यवसाय प्रशिक्षणाकडे जाता येईल, अशी सोय असायला हवी.

महत्वाच्या कल्पना


  • राज्यभर व्यवसाय प्रशिक्षण देणार्‍या संस्थांचे जाळे; प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र केंद्रे
  • व्यवसाय प्रशिक्षण व शिक्षण यासाठी स्वतंत्र विद्यापिठे
  • 'कौशल्य हमीपत्र' योजना

कार्यक्रम


यासाठी ३ पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळाचे प्रमाणपत्र ३१९ अभ्यासक्रमांचे पर्याय सध्या उपलब्ध आहे; याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करायला हवा. अभ्यासक्रमांचा विस्तार, तसंच उद्योग-व्यवसायिकांशी त्याची सांगड घालून अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कार्यानुभवाची संधी निर्माण करायला हवी.
यासाठी प्रत्येक जिल्ह्यात व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे उभारायला हवीत. त्या जिल्ह्यातील औद्योगिक व व्यापार धोरण तसेच स्थानिक गरजा ओळखून अभ्यासक्रमांची आखणी करायला हवी.
  • राज्यभर व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांचे जाळे तयार करायला हवे
  • प्राथमिक शिक्षणानंतर व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याची मुभा द्यायला हवी
  • व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची व्यवस्था असायला हवी
  • राज्यात किमान ५ व्यवसाय प्रशिक्षण विद्यापिठे स्थापन करायला हवीत
गरजू व्यक्तींना व्यवसाय शिक्षण घेता यावे म्हणून 'कौशल्य हमीपत्र' (skill voucher) योजना आम्ही सुचवत आहोत. या द्वारे हे हमीपत्र असलेल्या व्यक्तीला त्याच्या पसंतीच्या संस्थेत आपल्या आवडीच्या विषयाचे प्रशिक्षण घेणे शक्य होईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर संबंधित संस्थेने ते हमीपत्र शासनाकडे सादर केल्यास त्या संस्थेस प्रशिक्षणाचा काही खर्च मिळेल. उर्वरित रक्कम संबंधित विद्यार्थ्यास भरावी लागेल.

तळटीप



from.... http://mnsblueprint.org/index.html

Sunday 28 September 2014

महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा by राज ठाकरे - 2

विकास" म्हणजे काय?

आपला हा "महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा" आहे, त्यामुळे आपण आधी " विकास " म्हणजे काय हे पहायला हवं. "विकास" हा शब्द कदाचित मराठीतील सर्वांत जास्त वापरून वापरून गुळगुळीत झालेला शब्द असावा. विकास हा शब्द 'कस' या शब्दापासून बनतो. 'कस' म्हणजे हलणे, जाणे. "विकास" म्हणजे पुढे जाणे. आत्ता आहोत त्यापेक्षा पुढे जाणे. आपलं जीवनमान सर्व बाजूनं सुधारणे. आनंद वाढवणे.

जगभर यावर गेली काही वर्षं खूप विचार झाला. आपण नुसताच "विकास" करणं उपयोगी नाही तर तो सतत चालणारा असला पाहिजे. म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे म्हणून ती कापून खायची नसते तसंच विकासाचं आहे. विकास असा करायचा नसतो की तो क्षणभंगुर ठरेल. विकास असा करायचा नसतो की तो आज होईल पण उद्या होणार नाही. म्हणून जगात हे मान्य झालं की " विकास " म्हणजे "टिकाऊ विकास". "टिकणारा, सतत चालू रहाणारा विकास". "चिरंतन विकास"

विकास अणि पर्यावरण याविषयावर काम करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड कमिशन ऑन एनव्हायर्नमेंट अॅन्ड डेव्हलपमेंट (United Nations World Commission on Environment and Development) या नावाची. या संस्थेने १९८७ मध्ये "टिकाऊ विकासाची" एक सुंदर व्याख्या केली आहे. ते म्हणतात: "जेंव्हा आजची पिढी त्यांच्या आजच्या गरजा भागवताना उद्याच्या पिढीच्या विकास करण्याच्या क्षमतेत बाधा आणत नाही तेंव्हा तो टिकाऊ विकास म्हणायचा ".

"विकास" म्हणजे "टिकाऊ विकास", "चिरंतन विकास" आणि तो करताना काहीही ओरबाडणार नाही, उद्याच्या पिढ्यांना त्रास होणार नाही तो विकास असं आम्हीही मानतो. त्यासाठी आम्ही १० प्रश्न समोर ठेवले आहेत. ज्यांची उत्तरे दिल्यावर विकास झाला की नाही हे ठरेल. ते प्रश्न असे:

1) लोक सुरक्षित आहेत ना?
2) महाराष्ट्रातल्या माणसा-माणसांमध्ये आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक गोष्टींमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना?
3) लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळतंय ना?
4) लोकांना परवडणारी घरं - त्यात शांतता, खाजगी जागा, नळानं पाणी, शौचालय अशा सुविधा - मिळताहेत ना?
5) त्यांना पुरेशा, समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना?
6) ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीनं योग्य असं शिक्षण देऊ शकताहेत ना?
7) त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्य सेवा मिळतीय ना?
8) त्यांना शुद्ध हवा, त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधनसंपत्ती, सोयी-सुविधा आणि मनोरंजनाची साधनं मिळताहेत का?
9) लोकांमध्ये अस्मिता जागृत आहे का?
10) ते भविष्याकडे आशेनी, अपेक्षेनी, महत्वाकांक्षेनी पहाताहेत ना?

अगदी थोडक्यात -

विकास म्हणजे लोकांचा विकास.

विकास म्हणजे लोकांची सुरक्षितता, लोकांचा आनंद.

विकास म्हणजे सर्वांना पुढे जाण्याची संधी.

महाराष्ट्राकडे जे आहे ते वाचवणं, टिकवणं, जोपासणं आणि वाढवणं म्हणजे 'विकास'. मग त्यात निसर्ग आला, संपत्ती आली, नद्या आल्या, माणसं आली, माणसांची क्षमता आली, मराठी संस्कृती आली.

महाराष्ट्राचा विकास म्हणजे महाराष्ट्रातील लोकांचा विकास.

होय. हे शक्य आहे 

शेवटी थोडक्यात –

आनंदी समाज, आनंदी महाराष्ट्र, सुंदर महाराष्ट्र. मूलभूत गरजा भागलेला, नव्या आकांक्षा मनात ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र.

ज्ञानी समाज, ज्ञानी महाराष्ट्र. दर्जेदार शिक्षण, व्यवसाय शिक्षण आणि तंत्रज्ञानानं युक्त असा नव्या युगातला महाराष्ट्र.

खुली अर्थव्यवस्था, मुक्त वातावरण. उद्योगाचं मुक्त वातावरण, शेती खुल्या अर्थव्यवस्थेला जोडलेली असा उद्योजक महाराष्ट्र.

स्वावलंबन – शासनाचे, लोकांचे. नवा आर्थिक विचार, नवी करप्रणाली, बळकट स्थानिक स्वराज्य संस्था.
गुणांवर, मुक्त स्पर्धेला उत्तेजन देणारी व्यवस्था. सर्वत्र दर्जा महत्वाचा, कामात, शिक्षणात, उद्योगात, प्रशासनात, गुणांना वाव देणारी व्यवस्था.

विकेंद्रित रचना – विकासाची, राज्यकारभाराची, प्रशासनाची. स्थानिकांच्या हाती अधिक कारभार आणि जबाबदारी, विकासाचा असमतोल कमी केलेला.

जागतिक नकाशावरचा बलवान महाराष्ट्र प्रागतिक दृष्टी ठेवून, जागतिक स्पर्धेत अव्वल ठरलेला, मराठी महाराष्ट्र.

या घडीला आज आपण हा नवा, उद्याचा, प्रगतीशील महाराष्ट्र उभा करण्याची आकांक्षा मनात ठेवायला हवी. त्यासाठी योगदान देण्याची तयारी हवी.

मला तुमची साथ हवी..

माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, महाराष्ट्र तुम्हाला साद घालतो आहे, त्या हाकेला ओ देण्यासाठी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी तयार रहा, तसंच त्यासाठी कष्ट करण्याची आणि तुमचं योगदान देण्याचीही तयारी ठेवा. लक्षात ठेवा काहीही फुकट मिळत नाही. कष्ट करून मिळवावं लागतं आणि आपल्याला माहीत आहे जे फुकट मिळतं ते टिकत नाही आणि आपल्याला तर टिकाऊ, अनेक वर्ष चालणारा विकास या महाराष्ट्रात करायचा आहे. तुम्हा सर्वांच्या सहकर्याची मी मनोमन अपेक्षा बाळगतो.

सस्नेह जय महाराष्ट्र!

आपला नम्र

राज ठाकरे

http://mnsblueprint.org/

Saturday 27 September 2014

महाराष्ट्राचा विकास आराखडा by राज ठाकरे - 1

महाराष्ट्राचा विकास आराखडा राज ठाकरे ह्यांनी मांडला त्यातील काही भाग आपल्यासाठी मी ह्या ब्लॉग च्या माध्यमातून मांडणार आहे……

विकास आराखडा कशासाठी

राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवानं आपण तशा व्यापक अर्थानं त्याच्याकडे पाहत नाही.
"आपला देश किंवा राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे? याचा विचार मांडणं, त्या विचाराचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं" म्हणजे राजकारण.

म्हणूनच राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं आवश्यक आहे, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार आपण सर्वांनी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वांनी मिळून एका मोठ्या मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पहावं म्हणून हा "महाराष्ट्राचा विकास आराखडा" आम्ही तयार केला आहे.

स्वत:चं राज्य कशासाठी आहे, ते काय करणार आहे याचा आराखडा देणं ही गोष्ट इतिहासाला नवीन नाही. जगात कित्येक राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, पक्षांनी आपला दृष्टीकोन, आपला विचार त्यांच्या त्यांच्या लोकांसमोर ठेवला आहे. आपल्या समाजाला पुढे नेण्याचा आराखडा दिला आहे. आमचाही तोच प्रयत्न आहे.
यातलं सर्वात मोठं उदाहरण आपल्या सम्राट अशोकचं. इसवी सन पूर्व २६४ ते २२७ म्हणजे सुमारे २२५० वर्षांपूर्वी हा राजा होऊन गेला १ . केरळ आणि तमिळनाडूचा काही भाग सोडला तर आजच्या भारताच्या जवळजवळ सर्व भागावर आणि आजच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत सम्राट अशोकचं साम्राज्य होतं. जवळजवळ चाळीस वर्षं हा राजा सत्तेवर होता आणि त्यानं समाजोपयोगी अनेक कामं केली. असं म्हणतात की माणसाच्या इतिहासातला सम्राट अशोक हा पहिला राजा की ज्यानं लोकांचं भलं करणं, आर्थिक विकास करणं आणि समाजात शांतता पसरावी म्हणून प्रयत्न करणं ही कामं केली. एच.जी. वेल्स नावाचे एक फार मोठे इतिहासकार होऊन गेले. त्यांचं एक पुस्तक आहे, The Outline Of History या नावाचं. त्या पुस्तकात ते सम्राट अशोकचा उल्लेख फारच आदरानं करतात. ते म्हणतात - "इतिहासाच्या पानांपानांतील हजारो राजा-सम्राटांमध्ये सम्राट अशोकचं नाव सर्वोच्च स्थानातील एकुलता एक तारा असावा असं आहे २ ."
आणखी एक गंमत म्हणजे याच सम्राट अशोकने आपल्या साम्राज्यात ठिकठिकाणी शिलालेख लिहून आपले विचार, आपली तत्वं किंवा एका अर्थानं "आपली ब्लू-प्रिंट" लोकांसमोर ठेवली. यातीलच एक शिलालेख आपल्या महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यातील सोपारा या गावाजवळ सापडला आहे ३ .

सम्राट अशोक प्रमाणेच काही राजांनी, राष्ट्राध्यक्षांनी, राजकीय विचारवंतांनी आपापल्या परीनं त्यांना काय करायचं आहे, त्यांच्या दृष्टीनं समाज कसा असला पाहिजे याची मांडणी केली आहे. आपल्याकडे चाणक्यानं इसवी सन पूर्व तीनशेच्या आसपास लिहून ठेवलं, १८४८ मध्ये कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एन्जल्सनी कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा लिहिला किंवा १८४९ मध्ये हेन्री डेव्हीड थोरो, ज्यांच्यापासून गांधीजींनी प्रेरणा घेतली आणि जॉन रस्कीन यांनी १८६० मध्ये समाज कसा असावा आणि राज्य कसं चालवावं हे लिहून ठेवलं. लेनिनने रशियात १९०५ मध्ये Two Tactics of Social Democracy in the Democratic Revolution हे पुस्तक लिहिलं किंवा गांधीजींनी १९०९ मध्ये त्यांची आदर्श भारताची संकल्पना "हिंद स्वराज्य" मध्ये मांडली. हिटलरनं लिहिलेलं "Mein Kamph" किंवा "माझा लढा" हे सुद्धा त्याच पठडीतलं लेखन जगानं पाहिलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची २२ तत्वं, माओनी सांस्कृतिक क्रांतीविषयी केलेलं लिखाण, किंवा धरमपाल यांनी १९८३ मध्ये The Beautiful Tree मध्ये लिहिलेल्या एका आदर्श समाजाची कल्पना यातून समाज कसा असावा, कसा चालावा या बाबतीत अनेक विचारवंतांनी, थोर लोकांनी लिहून ठेवलंच आहे. इथे त्यांच्याशी तुलना वगैरे करण्याचा मुळीच हेतू नाही. ही सर्व माणसं मोठीच आहेत, फक्त समाजाला पुढे जायचं असेल तर त्यासाठी विचार असावा, दृष्टी असावी आणि राजकारण हे समाजाला पुढे नेणारं असावं; असं जर असेल तर राजकारणाला पक्क्या विचाराची बैठक असावीच लागते हे मात्र अगदी निश्चित !

त्यामुळे राजकारणाला विचार असावा लागतो, काय योग्य किंवा काय अयोग्य हे ठरवायला लागतं आणि कशा मार्गानं पुढे जायला हवं हे ही सांगावं लागतं. राजकारणाचं काम समाजाला दिशा देण्याचं आहे. जो समाजाला दिशा दाखवतो, पुढे नेतो तो नेता.
आम्ही महाराष्ट्राचा विचार कसा करतो आहोत, या महाराष्ट्रानं आता कुठल्या मार्गानं जायला पाहिजे असं आम्हाला वाटतं या विषयी आमची भूमिका मांडणं हे या "महाराष्ट्राच्या विकासाच्या आराखड्यात" करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
एक प्रश्न तुमच्या मनात नक्की येत असणार की: एवढा गाजावाजा करून, अनेक वर्षं ती बनवण्यासाठी घेऊन ही ब्लू-प्रिंट किंवा हा "महाराराष्ट्राचा विकास आराखडा" लिहिण्याची खरंच काय गरज होती?
एकेकाळचा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेला महाराष्ट्र आज अधोगतीच्या मार्गावर आहे. देशात जे राज्य पुढारलेले व विकसित म्हणून ओळखले जायचे ते राज्य आज केवळ आपल्या गतवैभवाची टिमकी मिरवण्यात गर्क आहे किंवा खरं पाहिलं तर धड त्यातही गर्क नाही. इथे सध्या काही नवीन घडताना दिसत नाही. नवीन निर्मिती होत नाही. कुठल्याच क्षेत्रात नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या प्रयोगांना बळ मिळण्याऐवजी ते आज त्यांच्या अस्तित्वासाठीच धडपडताना दिसत आहेत.
जे राज्य सुधारकांचे राज्य म्हणून ओळखले जायचे ते आज नीतीमत्तेच्या अत्यंत खालच्या पातळीला जाऊन पोचले आहे. समाज सुधारकांचे हे राज्य आज स्त्री-भृण हत्येच्या दुष्कृत्यानं गाजत आहे. किंबहुना या अधोगतीची चिन्हे आज सर्वच क्षेत्रांत दिसत आहेत. राज्याच्या राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत विचार केला तर आजच्या इतके भ्रष्ट व स्वार्थी राजकीय नेते व प्रशासन राज्याच्या इतिहासात कधीही सापडणार नाही. उद्योग क्षेत्रातूनही विशेष ऊर्जा मिळताना दिसत नाही.
राज्य आज कर्जात बुडाले आहे. राज्याच्या तिजोरीत जमा होणारा पैसा सार्वजनिक कामांसाठी वापरला जाण्याऐवजी भ्रष्ट नेते आणि अधिकारी स्वतःच्याच खिशात भरत आहेत. राज्यातील बहुतांश सरकारी - निमसरकारी संस्था (पालिका, ग्रामपंचायती, महामंडळे, सहकारी बॅंका, इ.) आर्थिक दृष्ट्या डबघाईला आल्या आहेत (२०११-१२ मध्ये अकोला महानगरपालिका बुडाल्यामुळे बरखास्त करावी लागली होती). आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडलेली आहे. सर्वत्र एक अंधाराचं, निराशेचं वातावरण आहे.
या बद्दल फार काही सांगण्याची गरज नाही. रोज, वर्तमानपत्रातील अग्रलेखांतून, वाहिन्यांच्या चर्चा सत्रांतून आणि प्रत्यक्ष अनुभवातून आपण हे सर्व ऐकतो आहोत, पाहतो आहोत. अनुभवतो आहोत.
हे सर्व आपल्याला इतक्या खोल दरीत घेऊन गेलंय की आपली स्वप्नं पहायची क्षमताच आपण हरवून बसलो आहोत.
जागतिक पातळीवर मात्र प्रगती, विकास या संकल्पनांचा विचार नव्याने आणि फार झपाट्याने होत आहे. एकीकडे जी-८ या बलाढ्य देशांची आर्थिक परिस्थिती कोसळत आहे. दुसरीकडे हवामान बदलाचे वारे अनिश्चितपणे सगळीकडे वाहत आहेत. आजपर्यंत कधी न जाणवलेला नैसर्गिक साधन संपत्तीचा र्हा्स होत असताना आपण उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत. या सगळ्याची नोंद घेत आज जगात नव्या जीवन पद्धतीचा नवीन विचार मांडला जात आहे. हा विचार तपासून पाहण्यासाठी नवीन नवीन अभ्यास होत आहेत, नवीन सिद्धांत, नवीन कल्पना मांडल्या जात आहेत. अनेक ठिकाणी तर तसे प्रयोगही केले जात आहेत. माणसाला नेहमीच प्रश्न पडले आणि त्यातून त्यानं उत्तरं शोधली. किंबहुना प्रश्न पडले म्हणूनच माणसानं प्रगती केली. आव्हानं आली म्हणूनच त्यानं धडपड केली आणि समाज पुढे नेला. आज सर्वत्र याचा शोध फार गंभीरपणे चालू आहे. आपणच यात काही करत नाही. आपणच डोळ्यांवर झापडं लावून आपल्याच नादात मश्गूल आहोत.
आपल्याला जागं व्हायला पाहिजे. आज आपल्याला देखील एक स्वप्न पडायला पाहिजे.
जे स्वप्न आपल्याला दिशा देईल, सर्वांना एकत्र ठेवेल. एक उर्जा देईल. चारी बाजूनं दाटत असलेल्या गर्द काळोखात एक दिवा पेटवेल.

या दरीतून महाराष्ट्राला बाहेर खेचण्यासाठी काही मूलभूत विचार करण्याची आम्हाला आवश्यकता वाटली आणि विचार करताना तो विचार लांबपल्ल्याचा असावा हे ही प्रकर्षानं जाणवलं. राज्याची बांधणी करताना आपण पुढच्या शतकाचा तरी विचार करायला हवा. आपण जी काही पायाभरणी करु त्यामुळे महाराष्ट्र पुढची १०० वर्ष विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर चालत राहिला हवा. ज्या गोष्टी आपण येत्या दहा वर्षांत उभ्या करू त्यानं मराठी समाज पुढची अनेक दशकं नव्हे तर अनेक शतकं वैभवशाली वाटेनं चालत राहिला हवा.
केवळ या आणि एवढ्याच भावनेनं तुमच्यासमोर हा महाराष्ट्राच्या विकासाचा समग्र आराखडा मांडतो आहोत.
या विकास आराखड्यामुळे काय होईल? त्याचा महाराष्ट्राला काय उपयोग होईल?
खूप गोष्टी होऊ शकतील...

1) सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना, सर्व मराठी समाजाला एक स्वप्न पाहता येईल.

हा आराखडा हा काही एका व्यक्तीचा, एका पक्षाचा नाही. तो आम्ही बनवला असला तरी तो पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे. माणसाचा इतिहास असं सांगतो की अशाच समाजांचा विकास झाला आहे ज्या समाजांना सर्वांचं मिळून एक आणि एकत्र पाहिलेलं स्वप्नं होतं. लिंकन किंवा रूझवेल्टच्या काळातली अमेरिका घ्या, चर्चिलच्या काळातलं इंग्लंड घ्या, माओच्या वेळचा चीन घ्या, महाराजांच्या काळातला महाराष्ट्र घ्या किंवा स्वातंत्र्याच्या काळातला भारत देश किंवा अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळचा महाराष्ट्र घ्या. या सर्व समाजांना त्या त्या वेळी एका स्वप्नानं पछाडलं होतं. वेडं केलं होतं. सर्व समाज एक होऊन एक महान स्वप्न पाहत होता. आज आपणही महाराष्ट्रात असं स्वप्न पाहण्याची गरज आहे.

2) आपण भविष्यात बघायला शिकू

म्हणतात की ज्याला इतिहासाचं भान आहे त्यालाच भविष्य आहे आणि जो भविष्यात पाहतो त्याचंच भविष्य घडतं सुद्धा. आपण भविष्यात पहायला शिकलं पाहिजे. भविष्यवेध घेतला पाहिजे. भविष्याचा विचार करायला सुरुवात केली पाहिजे. आपला मराठी समाज, आपला महाराष्ट्र कसा असला पाहिजे? येत्या काही वर्षांत या समाजापुढे काय आव्हानं असणार आहेत? त्यावर आपण कशी मात केली पाहिजे यावर आपल्यातल्या एक-दोघांनी नव्हे, एखाद्या पक्षानं नव्हे तर सगळ्याच समाजानं विचार करायला पाहिजे. हा आराखडा या सर्वांची उत्तरं देईल असं आम्ही मुळीच म्हणणार नाही पण निदान त्यामुळे आपल्या समाजाचा भविष्यवेध घ्यायची सुरुवात तरी आपल्यामध्ये नक्कीच होईल.

3) "रोजच्या प्रश्नाच्या पलीकडे" जायला लावेल

आपण सगळेच रोजच्या प्रश्नांत गुंतलेले असतो, आहोत. तुमच्या वॉर्डातला कचरा कुंडीचा प्रश्न असेल किंवा तुमच्या मुलीच्या शाळेच्या प्रवेशाचा प्रश्न असेल किंवा तुमच्या गावात, शेतात पाणी नाही असा तुमचा प्रश्न असेल. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाचा प्रत्येक प्रश्न जरी इथे सुटेलच असा दावा आम्ही करणार नसलो तरी या आराखड्यातून "तुमचा प्रश्न कसा सुटेल?" याची दिशा तरी अगदी नक्कीच तुम्हाला दिसेल. ह्या आराखड्यात आम्ही "मोठे", "व्यापक संदर्भ असलेले" प्रश्न घेतले असले तरी त्याचा संबंध रोजच्या प्रश्नांशी, रोजच्या समस्यांशी आहे. आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. मात्र आपल्याला त्या रोजच्या प्रश्नांच्या जंजाळातून सुटून प्रगतीच्या वाटेनं गतीनं सुसाट निघायचं असेल तर तसं करण्याची संधी या आराखड्यामुळे मिळेल.

4) आपलं मूल्यमापन, आत्मपरीक्षण होईल

आज आपण कुठे आहोत हे यामुळे समजेल. जगात अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपला पुढचा समाज कसा असावा यावर सखोल विचार चालू आहे. काही समाजांनी, देशांनी यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रात फार अभिनव पद्धतीनं मार्ग काढत आहेत. त्या संदर्भात, जगाच्या तुलनेनं आप ण कुठे आहोत हे ही आपल्या या आराखड्यामुळे लक्षात येईल. काही प्रश्नांवर जगानं मार्ग काढला पण आपण तसेच मागं राहिलो असं होऊ नये. या विकास आराखड्यामुळे जगाच्या तुलनेत आपण कुठे आहोत आणि काय करायला हवं याची स्पष्टता येईल.

5) समाज चिरंतन टिकावा, संपन्न रहावा याचा विचार होईल

एक छान म्हण आहे. म्हटलंय: "तुम्हाला आत्ता भूक लागली असेल तर समोरच्या झाडावरचं फळ तोडून खा. तुम्हाला पाच वर्षं, सात वर्षं असा विचार करायचा असेल तर झाड लावा, पुढच्या २०, ३० वर्षांचा विचार करायचा असेल तर माणूस पेरा आणि पुढच्या १००-१५० वर्षांचा विचार करायचा तर समाजात विचार पेरा". आपल्याला चिरंतन विचार करायचा आहे. मराठी समाज प्रगतीच्या वाटेनं कायमच चालत रहावा अशी आमची तळमळ आहे, पण त्यासाठी महाराष्ट्रात विचार पेरला पाहिजे. तो विचार पेरण्याचं काम हा आराखडा करेल असं आमचं म्हणणं नाही, पण निदान त्याची सुरुवात तरी करेल किंवा तसा काही विचार चालू असेल तर त्यात हा आराखडा आपलं योगदान देईल.

6) सर्वांगीण, मूलगामी विचार करता येईल

खूपदा आपण पठडीबद्ध विचार करतो. झापड लावून पहात असतो. या आराखड्यामुळे आपल्याला सर्व बाजूनं विचार करता येईल. पर्यावरण आहे, हवामानातील बदल आहेत या गोष्टींपासून ते अगदी शेती, शिक्षण,वाहतुक अशा समाजातल्या सगळ्या अंगांचा आपला अभ्यास या निमित्तानं होईल. खूपदा प्रगतीच्या वाटेनं चालत असताना काही गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. काही भाग मागे पडण्याची शक्यता असते. आपल्याला महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातील समाजाच्या विकासाचा चारी बाजूनं विचार यामुळे करता येईल. आम्ही काही मांडलं असलं आणि आमच्याकडून काही राहिलं असलं तरी तुमच्या सूचना घेऊन आपल्या सर्वांना पुढे जाता येईल.

7) काही जगावेगळा विचार करण्याची संधी मिळेल

असं म्हणतात की जगाचे प्रश्न इतके जटील झालेत, इतके गुंतागुंतीचे झालेत की ते सोडवण्यासाठी काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. ज्याला इंग्रजी मध्ये "out of the box" कल्पना म्हणतात तसा विचार केला तरच मार्ग निघेल. तसं काहीसं करण्याचा प्रयत्न आम्ही इथे केला आहे, पण त्यामुळे मराठी समाजात काही आगळा-वेगळा पण समाजाला अत्यंत लाभदायक विचार ह्यामुळे होऊ शकला तर ते ह्या आराखड्याचं यश म्हणावं लागेल.

8) समाजातील सर्वांचा साकल्यानं, पूर्णपणे विचार करता येईल

आपल्याला समाजातल्या प्रत्येकाचा विचार करायला हवा. अगदी शेवटच्या माणसापर्यंत, त्याच्या झोपडीपर्यंत पोहचायला हवं. छोट्या छोट्या योजनांमध्ये हे शक्य होत नाही. छोटा छोटा विचार केला तर तो आवाका मिळत नाही. इथे मात्र अधिक विस्तारपूर्वक विचार केला असल्यानं समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करता येईल. कुणीही सुटणार नाही, मागे राहणार नाही.

9) महाराष्ट्राला आपला प्राधान्यक्रम ठरवता येईल

आणि, सर्वांत महत्वाचं म्हणजे आधी काय, महत्वाचं काय, काय वाचवलं पाहिजे, काय सोडून देऊन चालेल, कशावर भर द्यायला पाहिजे अशा संवेदनशील, कधीकधी कटू वाटतील अशा गोष्टींना या निमित्तानं हात घालता येईल. आपला महाराष्ट्र इतिहासानं, परंपरेनं खूप श्रीमंत असला, आपल्याकडे चांगली निसर्गसंपत्ती असली आणि थोरा-मोठ्यांचा वारसा आपल्याला असला तरी आपण काही पैशानं, संसाधनानं फार श्रीमंत, संपन्न नाही. त्यामुळे कमी पैशात, मर्यादित साधनांमध्ये आपल्याला प्रगती कशी साधता येईल याचा विचार करायचा तर आपल्याला आपला प्राधान्यक्रम या निमित्तानं ठरवता येईल.

via
http://mnsblueprint.org/

Tuesday 22 July 2014

लोकमान्य.... एक तेजस्वी सूर्य…

लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.
यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी ‘केसरीच्या’ संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवाजी उत्सव’ १५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.
टिळकांनी राजकारणात जहाल मतवादाचा पुरस्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्याच्या न्याय बुद्धीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हिंदी लोकांना अर्ज-विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळू शकणार नाहीत किंवा सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरुन कॉंग्रेसमध्ये ‘मवाळमतवादी’ व ‘जहालमतवादी’ असे दोन गट पडले. त्यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळकांनी केले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही मान्य झाले होते. सन १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटातील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणामी, मवाळ गटाने जहालांची कॉंग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली. २४ जून १९०८ रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुगांत रवानगी करण्यात आली. या सहा वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून १७ जून १९१४ रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि भारतातील प्रातिनिधीक संस्था आधिकाधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १ मे १९३६ रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात ‘होमरूल लीगची’ (स्वराज्य संघाची) स्थापना केली. पुढे सप्टेंबर, १९१६ मध्ये अ‍ॅनी बेझंट यांनी ‘ऑल इंडिया होमरूल लीग’ ची स्थापना केली. टिळकांची होमरुल लीग आणि अ‍ॅनी बेझंट यांची होमरुल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या. परंतु टिळक आणि अ‍ॅनी बेझंट यांच्यात सख्य असल्यामुळे या दोन्ही संघटनामध्ये परस्पर समन्वय होता इतकेच, हे याठिकाणी लक्षात घ्यावे.
इंग्रज सरकारच्या अन्ययी व पक्षपाती धोरणा-विरुद्ध आवाज उठविण्यात लोकमान्य टिळक नेहमीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीडपणाची साक्ष देण्यास त्यांचे ‘केसरी’तील अग्रलेख पुरेसे आहेत. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’? असा सवाल विचारण्याइतकी त्यांची लेखणी निर्भीड व सडेतोड होती. दुष्काळ, प्लेग यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकर वर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये निषेध केला. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतीशून्य वृत्तीवर त्यांनी नेहमीच टिकेची झोड उठविली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवर ते सदैव तुटून पडले. १६ ऑक्टोबर १९०४ रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अमंलबजावणी झाल्यावर त्यांविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.
लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ असेही वर्णन केले जाते. वरील घटकांनी भारतीय जनतेत एकात्मतेची भावना निर्माण केली आहे. तथापि, ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे त्यांचे मत होते. भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सव सुरु केले होते.
लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या ‘चतुःसूत्री’ कार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. या उदिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता. खरे तर, टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी ‘गीता रहस्य’, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दि वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.
लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल मतवादी भूमिका घेतली होती. परंतु समाज सुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहिसे नेमस्त होते. म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन ‘राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्त’ असे केले जाते. समाज सुधारणे बाबत टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे. तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येईल. परंतु आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकत्यांनी आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल. टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमती व विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो, असे त्यांनी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. थोडक्यात, सामाजिक प्रश्नाबाबत टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन समाजसुधारकांना विरोध केला होता.
लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठिण कार्य त्यांनी केले. म्हणूनच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही उपाधी त्यांना मिळाली. हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.
आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड, उतारवयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणाने पूर्ण विश्रांती घेत नसत. काम करण्याची ते पराकाष्ठा करीत. औषधोपचार चालू होते. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण मनातील विविध विचारांच्या वावटळी मुळे तो कृतीत येत नव्हता. सन १९२० जुलैत त्यांना हिवतापानं घेरलं. आता मात्र अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात रहात होते. निष्णात डॉक्टरांचे उपचार सुरु होते. थोड्याच दिवसात त्यांना वाताचे झटकेची येऊ लागले. पुढे त्यांच्या बोलण्यातही विसंगती वाटू लागली. पुढे त्यांच्या आप्तांची काळजी वाढली. चाहत्यांची अस्वस्थताही वाढली. सर्वाची मनःस्थिति चिंतातूर झाली होती.
१ ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला. आजन्म देशसेवेत गर्क असलेला भारतमातेचा सुपुत्र सर्वांना सोडून चिरनिद्रा घेत राहिला. हां हां म्हणता ही घटना सर्व मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. सर्व लोक हळहळले. शहरातील सर्व व्यवहार हरताळ पाळून बंदच होते.
ज्या ठिकाणी मुंबईतील हजारो लोक रोज सकाळ संध्याका्ळ चौपाटीवर फेरफटका मारायला जातात, त्याच ठिकाणी सरकारी परवानगींने लोकमान्य टिळकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व लोकांना चौपाटीवर आल्यानंतर नित्यशः कै. लो. टिळकांचे दर्शन रोज मिळत असतं. त्या अंत्यसंस्काराला अनेक पुढारीही होते. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यादिवशी पं. जवाहरलाल नेहरू ही मुंबईत होते. त्यांनाही ही दुःखद घटना कळल्यावर अतिशय दुःख झालं. ते म्हणाले “भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला. यापुढे देशाची सर्वांनाच चिंता वाटणार आहे, तरीसुद्धा जन्माला आलेल्या कुणालाही मरण चुकलेले नाही. आपण सर्वांनी हे दुःख विसरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी झगडत रहाणं हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल”.