कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...
राजकारणाबद्दल जेव्हापासून वाचायला लागलो, काही नेत्यांबद्दल आदरयुक्त कुतूहल वाटू लागलं. अशी काही व्यक्तिमत्व नेहमीच आदरणीय आहेत. अटलजी, प्रमोद महाजन आणि मनोहर पर्रिकर ही यातील अशी नावं आहेत की वैचारिक मतभेद असो अथवा नसो पण यांच्याबद्दल चुकूनही वाईट विचार येत नाहीत. अजातशत्रू या शब्दाचा खरा अर्थ इथेच समजतो. पण भारतीय राजकारणाचं, भारतीयांचं दुर्दैव हेच की वरील तीनही जण आज हयात नाहीत. काल मनोहर पर्रिकर गेले ही बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. एक चांगला नेता हरपला ही सर्वांचीच भावना होती. पण मला जाणवलेले पर्रिकर पाहता एक चांगला माणूस हरपला हेच राहून राहून मनाला वाटत होतं.
दीड दोन वर्षांपूर्वी पर्रिकरांना live ऐकायचं भाग्य मिळालं. मास्टर्सचं शिक्षण घेत असताना डिफेन्स संदर्भातील एका जागतिक परिषदेत भाग घेण्याचं भाग्य मिळालं आणि मी ती परिषद फक्त पर्रिकरांना live ऐकण्यासाठी attend केली. पर्रिकर तेव्हा देशाचे संरक्षणमंत्री होते. IIT मधून passout झालेले संरक्षणमंत्री अशी एक प्रतिमा त्यांच्याबद्दल माझ्या मनात होती. मनोहर पर्रिकर आणि रघुनाथ माशेलकर यांना live ऐकण्याची इच्छा फार होती आणि त्यातली एक इच्छा त्यादिवशी पूर्ण होत होती. सकाळी 10 वाजता वाशीच्या International Conference Hallमध्ये पर्रिकरांचं भाषण होतं. मिळेल तशी जरा स्टेजच्या जवळची सीटवर बसलो होतो. इतर नेत्यांप्रमाणे पर्रिकर उशिरा येतील अशी सगळ्यांची अटकळ होती आणि तिथेच पर्रिकरांनी सिक्सर मारला. वेळेच्या 10मिनिटं आधीच पर्रिकर आले. बरोब्बर 10 वाजता उदघाटन झालं आणि 10:20ला पर्रिकर सर्वांशी बोलायला उभे राहिले. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम असल्याने समोर सर्व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि कंपन्यांचे एम्प्लॉयी बसले होते. पर्रिकरांनी भाषणाची सुरवातच अभियंता आणि त्यांचं देशातील त्यांच्या योगदानाने सुरु झालं. ज्ञान कसे घ्यावे इथून सुरु झालेलं भाषण मधेच एखादा विनोद करत पर्रिकरांना त्यांच्या कॉलेज जीवनात घेऊन गेलं. IITमधली शिक्षणाची पद्धत, तिथे त्यांनी शिकलेल्या गोष्टींसोबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यावे या विषयावर बोलताना पर्रिकरांनी दिलेलं त्यांच्या वडिलांचे उदाहरण आजही लक्षात आहे. सकाळी 10:20ला सुरु झालेलं पर्रिकरांचं भाषण 10:55ला संपलं. तो 30-35 मिनिटांचा संवाद आजही मनात घर करून आहे. त्यानंतर पर्रिकर कॉन्फरेन्स हॉल मधून Exhibition Hallमध्ये आले. सर्व उपकरणांची आणि इतर प्रोजेक्ट्सची पर्रिकर नीट आणि कुतूहलपूर्वक माहिती घेत होते.
अर्ध्या तासाच्या भाषणादरम्यान आणि Exhibition Hallमध्ये पर्रिकरांना न्याहाळताना त्यांच्यातला माणूस दिसला. जगातल्या सर्वात मोठ्या लोकतंत्र असलेल्या देशाचे संरक्षणमंत्री आणि इतकी साधी राहणी, जाणवतच नव्हतं. निळा हाफस्लीव्हचा शर्ट, काळी ट्राउसर असा पोशाख परीधान केलेल्या पर्रिकरांमधल्या साध्या माणसाचं दर्शन तेव्हा झालं, हल्लीच्या काळात नगरसेवकसुद्धा सुटा-बुटात फिरतात हो. पर्रिकरांचा साधेपणाच सर्वांना भावणारा होता. पर्रिकरांसाठी त्यांच काम आणि देशावरील प्रेम हे सर्वश्रेष्ठ होतं. कर्करोगाने त्रस्त असतानाही ते गोव्याच्या विधिमंडळात उपस्थित होते. माझ्या लेखाचं शीर्षक, "कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती..." याचा अर्थच मुळात हा आहे की स्वतःला सतत देशसेवेच्या कर्तव्यात मग्न ठेवणाऱ्या पर्रिकरांना मृत्यूने विश्रांती दिली. पर्रिकरांना नेताना मृत्यूचेही मन कदाचित हेलावले असेल. पण काय करणार, नियतीपुढे कोणाचे चालते. पण एक मात्र नक्की, पर्रिकर सर, तुमची एक्सिट मन हेलावणारी ठरली.
प्रथमेश श. तेंडुलकर
No comments:
Post a Comment